• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (7)

मनाच्या कोंडवाड्यातून बाहेर पडावे, धडपड करावी, शिकावे, आईचे ओझे हलके करावे, असे नेहमी वाटे; परंतु जागच्या जागी पंख फडफडविण्याव्यतिरिक्त मी काही करू शकत नव्हतो. परिस्थितीचे कुंपण चारी बाजूंनी उभे होते. एरवी, कुंपणात शिरणा-यांना काटे बोचतात. ते बोचावेत, अशीच ती व्यवस्था असते. कुंपणाच्या आत जे असेल ते स्थिर राहावे, अशासाठी ती योजना असते. परंतु मला कुंपणात स्थिर व्हायचे नव्हते, तशी स्थितीच नव्हती, हीच खरी अडचण होती. परिस्थितीच्या कुंपणातून बाहेर पडताना अंगाला काटे बोचतात, अंग फाटून निघते, याचाही अनुभव माझ्या गाठी नव्हता. आहे त्या कोंडीतून बाहेर निसटायचे, एवढेच माझ्या समोर होते.

- आणि मी जेव्हा प्रत्यक्षात बाहेरच्या जगात पाय ठेवला, त्या वेळी मी अधिक दुबळा बनतो की काय, असे मला वाटू लागले. बाहेर समाजातल्या ज्या वातावरणाकडे मी पाहत होतो, ते मला शुद्ध, स्वच्छ  वाटत नव्हते. हिमालयाच्या अंगावरून स्फटिकशुभ्र पाण्याचे झरे स्वच्छंद धावत असतात. श्रमिक पथिकांचे लक्ष ते झरे तेव्हाच वेधून घेतात. तहानलेला पथिक त्याचा मनमुराद आस्वादही घेतो; परंतु नंतर मात्र त्याच्या अंगाचा दाह होऊ लागतो. असे सांगतात, की तेथील अनेक झरे जे वाहत येतात त्यांच्या मार्गात विषारी वृक्ष असतात. त्या वृक्षांच्या मुळांतील विष त्या पाण्याबरोबर नेहमीच वाहत असते आणि ते शुभ्र 'जीवन' अनेक पथिकांचा जीवनप्रवाह गोठविण्यास कारणीभूत ठरते. त्या स्वच्छंदी झ-यासही त्याची कल्पना नसते - तो आपला वाहतच असतो.

आमच्याकडील समाजपुरुषाच्या मनातही त्या वेळी विचारांचे जे झरे पाझरत होते, ते मला काहीसे असेच वाटत होते. परिस्थितीची कोंडी फोडण्यासाठी मी बाहेर पडत होतो खरा; परंतु दुसरी एक वैचारिक कोंडी माझ्याभोवती तयार होऊ पाहत होती. आमच्या भागात त्या वेळी ब्राह्मणेतर चळवळीची एक वावटळ उठली होती. घरात आणि घराबाहेरचे वातावरण या चळवळीने वेढलेले होते. आजूबाजूला मी जे पाहत होतो, ऐकत होतो, अनुभवीत होतो, ते काही प्रसन्न नव्हते. सत्यशोधकांचे मी जे वाचीत होतो, तेही एकांगी वाटत होते. किंबहुना, जे वाचत होतो, त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असे दुसरे मोठे पवित्र काही आहे आणि ते समाजासमोर हिरिरीने का ठेवले जात नाही, असेही वाटत होते. त्या वेळचा काळ मोठा वैचारिक गोंधळाचा होता; आणि त्या सर्वांतून मी वेगळा कसा राहिलो, याचे मला कधी कधी आश्चर्य वाटते. ब्राह्मणेतर चळवळीचे विशेष असे आकर्षण माझ्यावर फार काळ टिकले नाही. ते का टिकले नाही, याचे उत्तर देणे हे मला आजही बुचकळ्यात टाकते; परंतु माझ्या मताने त्याचे एक कारण असू शकेल, ते म्हणजे अवतीभोवती विचारांची वेटोळी पडलेली असतानाही मी त्याशिवाय वेगळे असे काही वाचीत होतो.