यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ८०

राष्ट्रीय बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. चीन-पाकिस्तान या दोन देशांच्या वेळची युद्धजन्य परिस्थिती हाताळली. यशवंतरावांनी समाजजीवनाच्या सर्व अंगांविषयी रस घेऊन राजकारण, समाजकारण केले. यासाठी आवश्यक असणारे संभाषणचातुर्य व वक्तृत्वकला त्यांना अवगत होती. बोलण्यात मनाचा मोकळेपणा व प्रामाणिकपणा होता. बुद्धी आणि संस्कृती यांचा मनोहर समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्वात होता. त्यांच्या सानिध्यात आलेला कोणताही माणूस त्यांच्या पारदर्शक जीवनाने आणि मधूर भाषणाने मोहित झाल्याखेरीज राहात नसावा. राजकारणाच्या दाहक वातावरणामध्येही एखाद्या फुलपाखराप्रमाणे आपल्या जीवनातला आनंद आणि कोमलता कायम ठेवण्यासाठी ते साहित्यिकांच्या संपर्कात राहिले. या त्यांच्या सर्व कार्यकर्तृत्वात त्यांच्या अमोघ वाणीचा वाटा फार मोठा आहे. त्यांच्या पुढे शब्द हात जोडून उभे असत. या वाणीच्या जोरावर ते लोकांच्या हृदयाला हात घालत. त्यांना मंत्रमुग्ध करत. त्यांच्या अंतरीच्या भावना आणि संताप व्यक्त करत. असे वक्तृत्व त्यांच्याजवळ होते. अशा त्यांच्या सर्व वक्तृत्वाचा अथवा भाषणांचा आढावा संशोधनविस्तार भयास्तव घेणे अशक्य आहे. तरीपण त्यांच्या काही मोजक्या इतर भाषणांतील शैलीच्या व आशयाच्या दृष्टिकोनातून संक्षिप्त असा अभ्यास येथे अभिप्रेत आहे. कारण राजकारण, समाजकारण, परराष्ट्र धोरण, अर्थनीती, सहकार, विकासाच्या दिशा, प्रशासन, लोकशाहीतील नियोजन, शेती, नागरिकीकरण यासारख्या असंख्य विषयांवरील त्यांचे चिंतन हे स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल. एवढे विचारांचे सामर्थ्य यामध्ये आहे. यामुळे काही भाषणांचाच विचार मर्यादित अर्थाने येथे केला आहे.

विष पचविणारे महादेव निर्माण व्हावेत.

यशवंतरावांनी इ. स. १९५६ मध्ये राज्यपुनर्रचना विधेयकाची विधानसभेच्या सभागृहात जोरदार शिफारस केली. राज्यपुनर्रचना प्रश्नावरील कायद्याचा मसुदा सभागृहामध्ये मत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. भौगोलिकदृष्ट्या मुंबई महाराष्ट्रात असणे किती महत्त्वाचे आहे हे सांगून त्यांनी एक राज्यात एका भाषेला एकत्र आणण्याचा हा प्रवाह आहे असे नमूद केले.  याविषयी बोलताना राज्यात कोणती परिभाषा वापरावी याबद्दलची त्यांची मनोवस्था ते अशी व्यक्त करतात, "शब्दांनी भावना पूर्णतया व्यक्त होतातच असे नाही आणि कधी कधी शब्दांनी गैरसमज व गोंधळ वाढण्याचा प्रकार घडतो, असा माझा अनुभव आहे. म्हणून शब्दांचा वापर करताना मी काळजी घेत आहे. " यशवंतराव शाब्दिक सामर्थ्याबाबत किती सापेक्षी आहेत हे यावरुन स्पष्ट होते. यशवंतरावांसारखा निष्ठावान पुरूष केवळ कृत्रिम व मानभावापणाने भाषणकरताना आढळत नाही. तसेच कोणत्याही संकटांना भिऊन अथवा प्रलोभनाने मोहित होऊन आपला वक्तृत्व विक्रम करतानाही आढळत नाहीत. योग्य शब्दांची निवड करून वक्तृत्वपूर्ण शैलीयुक्त भाषणांनी जनमनांना आकर्षून घेण्याची करामत यशवंतरावांनी केली. कोणतीही असंतोषाची चळवळ पेटविणा-या मार्गाने सोडविता कामा नये. असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यामुळे "मुंबई कोणाची हा प्रश्न भौगोलिक प्रश्नावर सोडवावा लागेल कारण इतिहास काही गोष्टी दडवून ठेवत असेल पण भूगोल काही दडवू शकत नाही. म्हणून महाराष्ट्रात मुंबई घातली नाही तर महाराष्ट्राचे आकल्याण होईल. " असा सावधानतेचा इशारा ते सभागृहास देतात. तेव्हा महाराष्ट्रीय माणसांच्या अंत:करणात काय आहे हे जरी त्यांना सांगता आले नाही तरीही त्यांच्या शब्दांवरून व त्यांच्या अर्थावरून काय दिसते त्या भावना त्यांनी सांगितल्या तेव्हा हा प्रश्न सोडवला पाहिजे. तो प्रश्न निकालत काढायचा की नाही की तसाच ठेवायचा त्याचे उत्तर सहज सांगता येत नाही. याबद्दलचे त्यांचे चिंतन ते असे प्रकट करतात, "जगातील अवघड प्रश्नांची उत्तरे पुस्तकामध्ये लिहून ठेवलेली नसतात. ती तशी ठेवली असती तर आपणा सर्वांचे काम सोपे झाले असते. तेव्हा जीवनामध्ये ज्या निरनिराळ्या बिकट समस्या निर्माण होतात त्याला योग्य विचार करून उत्तर देणे किंवा ते देण्याचा प्रयत्न करणे यात खरा पुरुषार्थ आहे. भाषिक वादाचे तत्त्व एका टोकाला गेल्यामुळे त्यातून विष निर्माण झाले ही गोष्ट खरी आहे, पण हा अवघड प्रश्न कोणीतरी सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यापासून बाजूला राहता येणार नाही. तेव्हा देशातील कोणीतरी मोठ्या व्यक्तींनी पुढे येऊन त्यातून मार्ग काढला पाहिजे. आणि जरी विष निर्माण झाले असले तरी कोणीतरी ते प्याले पाहिजे. समुद्रमंथनातून निर्माण झालेले विष प्राशन करण्यासाठी महादेवांना पुढे यावे लागले किंवा विष प्याल्यामुळे महादेव निर्माण झाले असे सांगण्यात येते.