यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ५९

इ.स. १९६४ साली यशवंतरावांनी विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटनपर भाषण केले. 'व-हाड-मराठवाड्याची ही भूमी मराठी भाषेची जननी आहे.' हे सांगून मराठी भाषेला येथेच अंकुर फुटले. या भूमीतच तिचे पालनपोषण झाले आणि एक स्वतंत्र भाषा म्हणून मराठी भाषेने नेत्रदीपक विकास केला असे स्पष्ट केले. या प्रसंगी ते म्हणाले, "जनतेच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्राच्या उत्थानासाठी आणि भारतीय जनतेच्या महान महत्त्वाकांक्षा साकार करण्यासाठी संतांची वाणी, शिवाजीची ललकार, तसेच आगरकर, चिपळूणकर आणि टिळक अशा विचारवंत देशभक्तांचे विचार मराठी भाषेला न मिळते, तर आज मराठी साहित्य इतक्या उन्नत स्थिती आढळते असते का?" असा सवाल त्यांनी साहित्यिकांना केला. वृद्ध आणि महावीर यांच्या वाणीने लोकभाषेचे पंखच दिले असे सांगून संस्कृत भाषेचा विशाल तट ओलांडून प्राकृत आणि पाली या भाषा जैन आणि बौद्ध भिक्षुकांच्या मदतीने सर्व देशभर पसरल्याचे सांगतात.  ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संतांच्या जीवन साहित्याचा प्रदेशापुरते मर्यादित राहणार नाही याची दखल साहित्यिकांनी, लेखकांनी घेतली पाहिजे असा आग्रही विचार ते मांडतात.

यशवंतरावांनी मराठी भाषेबाबत व साहित्याविषयी ज्याप्रमाणे आपले स्पष्ट मत नोंदवले आहे त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रभाषेविषयीची भूमिका मांडली आहे. भारतामध्ये सध्या जवळपास २० भाषा अधिकृत प्रादेशिक भाषा म्हणून मानल्या जातात. अनेक बोलीभाषांचा वापर आज भारतात होतो. शिवाय प्रमाण भाषा आणि घटना बाह्य भाषा वेगळ्याच आहेत. एवढी भाषिक विविधता भारतात आढळते. प्रत्येकवर्षी १००० हून जास्त ग्रंथनिर्मिती त्या त्या भाषेत होत असते त्यामुळे भारत हे नाना धर्माचे नाना जातीचे आणि विविध भाषा बोलणारे राष्ट्र आहे म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांतरचनेची निर्मिती झाली आणि वेगवेगळ्या भाषांना राजभाषेचा दर्जा मिळाला. या भाषिक श्रीमंतीचा जगातील इतर राष्ट्रांना हेवा वाटतो. पण संपूर्ण देशातील लोकांना समजू शकेल, देशातील संपूर्ण जनतेशी संपर्क ठेवू शकेल. अशा भाषेची आवश्यकता असते. अशी संपर्कभाषा किंवा राष्ट्रभाषा म्हणून यशवंतराव हिंदी भाषेकडे पाहतात. इतर सर्व भाषांपेक्षा राष्ट्रभाषेची जबाबदारी पेलण्याची क्षमता हिंदी भाषेत आहे. म्हणून बहुभाषिक राष्ट्रात एक दुस-याचे विचार समजून घेण्यासाठी व देण्यासाठी या भाषेचे महत्त्व त्यांना अधिक वाटते. या भाषेमध्ये राष्ट्रीय ऐक्याची वाढ करण्याची ताकद आहे म्हणून हिंदीच्या प्रगतीबरोबर देशाच्या एकतेतही वाढ होईल असे त्यांना वाटते. आज कुठल्याही प्रांतिक भाषेपेक्षा हिंदी भाषिकांचे प्रमाण जास्त आहे. म्हणून या भाषेला राष्ट्रभाषेचा मान मिळाला आहे. तो टिकविण्यासाठी हिंदी साहित्यिकांना ते सांगतात, " परंतु त्याहीपेक्षा हिंदी भाषेतील शब्दसंपत्ती आज अशा प्रकारे वाढवली पाहिजे की. ज्यामुळे आधुनिक विचारप्रवाह, शास्त्रीय व तांत्रिक विषय आणि त्याचप्रमाणे राज्यकारभार यांची संपूर्ण गरज ती चांगल्या प्रकारे भागवू शकेल." हिंदी भाषा अधिकाधिक समृद्ध व विकसित होत गेली पाहिजे असे त्यांना वाटते. तसेच तिचा प्रसार व प्रसार व्हावा. विज्ञानाची पुस्तके, माहिती या भाषेत यावी. ही भाषा संपन्न होण्यासाठी तिचा शब्दसंग्रह वाढावा. अन्य भाषेतील चांगले साहित्य हिंदीत अनुवादित व्हावे व हिंदीतील साहित्य इतर भाषेत अनुवादित व्हावे. त्यामुळे विचारांचे व आचारांचे दळणवळण वाढते. या विचारांच्या आदानप्रदानातून भाषा समृद्ध होते. तसेच अशा प्रकारच्या साहित्य निर्मितीतून साहित्य एकात्मता निर्माण होईल. राष्ट्रीय ऐक्याची वाढ होईल असा विश्वास ते मुंबई प्रांतिक राष्ट्रभाषा प्रचार सभेचा २२ व्या पदवीदान समारंभाच्या वेळी व्यक्त करतात.

भाषा व संस्कृती

यशवंतरावांनी मराठी भाषेवर जेवढे प्रेम केले तितकेच त्यांनी इंग्रजी, हिंदी या भाषाभगिनीवरही प्रेम केले. या भाषेतील शक्तिस्थाने आणि सौंदर्यस्थाने यांची त्यांनी ओळख करून घेतली. एकात्मिक भावनेच्या दृष्टीने त्यांनी या भाषांकडे पाहिले. अनेक भाषा एक संस्कृती असा विचार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भाषेच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या जवळ आले पाहिजे. या भाषेच्या माध्यमातून संपूर्ण भारताचे ज्ञान समाजाला व्हावे. इतर भारतीय भाषांतील गुणसंपन्न साहित्याचा परिचय व्हावा आणि वाङ्मयविषयक जाणिवा समृद्ध व्हाव्यात असा त्यांचा या भाषेबाबत दृष्टिकोन होता. 'आसामी'सारखी भाषा येत नसली तरी ती भारतीय भाषा आहे. म्हणून ती आपली सर्वांची भाषा आहे असे सर्वांना वाटले पाहिजे. म्हणजे भाषिक तंट्याचे मूळ निघून जाईल. भारताचा सांस्कृतिक विकास भाषिक समाजांच्या कर्तृत्वाने होऊन धर्म, भाषा, प्रदेश यांची भिन्नता व विविधता हे आपल्या राष्ट्रजीवनाचे वादातील प्रश्न नाहीसे होतील असा त्यांना विश्वास वाटतो. सर्व भारतीयांच्या मनात सर्व भाषांविषयी व सर्व भाषिक प्रदेशांविषयी ममत्व निर्माण झाले पाहिजे. असे झाले तर बहुभाषी भारत हा शाप न ठरता तो वैभवशाली होईल असा आशावाद ते व्यक्त करतात. "मराठीच्या अभ्यासाबरोबर राष्ट्रभाषा म्हणून सर्व भाषांची मायभाषा व आपल्या प्राचीन संस्कृतीची भाषा म्हणून संस्कृत व आंतरराष्ट्रीय व्यवहाराची भाषा म्हणून इंग्रजी या भाषेचा अभ्यास करणे आपल्याला आवश्यक आहे.