यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ५७

या सामर्थ्यांच्या जोरावर व्यक्ती आणि राष्ट्र यास आपापल्या जीवनात अनेक संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळत असते. यासाठी साहित्याकडून ते अशी अपेक्षा व्यक्त करतात,"आमच्या ज्या सुप्त शक्ती आहेत, त्या सुप्त शक्तींना आवाहन करून त्या जागृत करून, आम्ह आमचे सामर्थ्य वर्धिष्णू करू. सामर्थ्य संवर्धनाचे हे काम आज साहित्यिकांनी केले पाहिजे. साहित्यिकांची ही भूमिका असली पाहिजे." मराठी साहित्यातून जाणीवपूर्वक विश्वासाहित्याचा व्यापक व सखोल अभ्यास व्हावा. या साहित्याबाबत आपण उदासीन असता कामा नये. यशवंतरावांची साहित्याकडून ही अपेक्षा आहे. मराठी साहित्य हे विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित राहता कामा नये. या मर्यादा आणि सीमा पार करून श्रेष्ठ साहित्य निर्माण व्हावे. त्यामध्ये अस्सल असे अनुभवविश्व आले पाहिजे. या संदर्भात ते म्हणतात, "एका अनुभूती आणि एक विचार राबविण्याचे हे जे काम आहे, ते अविभाज्य आहे. ते केवळ मराठीचे, बंगालीचे, तेलगुचे किंवा कानडीचे काम नसून भारतातील सर्वच भाषांचे ते काम आहे. ही अविभाज्यता, ही एकरुपता अनुभवाला आली पाहिजे. - आणि हा अनुभव साहित्यिकांना त्यांच्या जीवनामध्ये आला तरच तो ते जनतेपर्यंत पोहोचवू शकतील. परंतु ही आजच्या घडीची मागणी आहे, आजच्या घडीची ऐतिहासिक अपेक्षा आहे." सर्व भाषिक साहित्यिकांनी संस्कारसंपन्न साहित्य निर्माण करून मानवी जीवनावर संस्कार करून मानवी समाज सुसंस्कृत करण्याला मदत करावी अशी इतर भाषेतील साहित्यिकांकडून ते अपेक्षा करतात.

प्रत्यक्ष कार्याची जोड

यशवंतराव चव्हाणांची २२ डिसेंबर १९६० रोजी साहित्य व संस्कृती मंडळाचे उद्घाटन नागपूर येथे केले. या मंडळाची स्थापना म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर सांस्कृतिक क्षेत्रात झालेली एक महत्त्वपूर्ण घटना होय. सर्वांचीच बौद्धिक भूक भागविण्यासाठी, साहित्य आणि संस्कृतीच्या विकासासाठी या मंडळाची निर्मिती झाल्याचे ते सांगतात. या मंडळाच्या वृद्धीसाठी व संवर्धनासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली विद्वज्जनांची एक यंत्रणा उभारली. १७ मे १९६२ रोजी वाई येथे साहित्य व संस्कृती मंडळाने स्थापन केलेल्या विश्वकोश कार्यालयाचे उद्घाटन यशवंतरावांच्या हस्ते झाले. साहित्य व संस्कृती मंडळाच्या निर्मितीचे स्पष्टीकरण करताना ते सांगतात, "स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकजीवन समृद्धी करण्याची जी प्रतिज्ञा आपल्या देशाने केली तिचेच ते पुनरुज्जीवन एक भाग असून भाषिक राज्यांच्या निर्मितीमुळे या पुनरुज्जीवनाच्या कार्यासाठी आम्हाला एक नवे साधन प्राप्त झाले आहे." यातूनच या मंडळाची निर्मिती झाल्याचे यशवंतराव सांगतात, मराठी भाषेच्या जडणघडणीसाठी, उत्तमोत्तम ग्रंथांच्या निवडीसाठी, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यसाठी या मंडळाची निर्मिती झाल्याचे सांगतात.

महाराष्ट्राच्या मातीत आणि संस्कृतीत वाढलेल्या यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या लोकजीवनाच्या आणि लोकसंस्कृतीच्या उन्नयनाचा नेहमीच विचार केला. त्यासाठी सदैव नवीन विचार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वैचारिक, साहित्यिक व सांस्कृतिक धनामुळे देश ओळखला जातो. समाज जिवंत राहतो तो त्याच्या जवळील भौतिक सामर्थ्याने नव्हे तर त्या समाजाजवळ असलेल्या सांस्कृतिक मूल्यांवर आणि विचारधनावर, असा दाखला ते देतात. असा मानवी जीवनमानाची उंची वाढवणारा नवा विचार यशवंतराव समाजाला देतात. यशवंतरावांना विद्वानांचा व विचारवंतांचा नेहमीच आदर होता. त्यांच्या कार्यावर आणि त्यांच्या ज्ञानावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. अशाच विचारवंतांच्या कार्यावर  देश, राष्ट्र जगत असते. म्हणून विद्वानांनी निर्माण केलेले शब्दधन जपून ठेवणे हे समाजाचे व शासनाचे कर्तव्य आहे. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, वेद, पुराणे इ. मुळे भारत ओळखला जातो. हाच आमचा सांस्कृतिक ठेवा असल्याचे ते सांगतात. पंडितांची, विचारवंतांची, साहित्यिकांची अक्षरवाणी ही देशाला चैतन्यमय बनवत असते. त्यांच्यात राष्ट्र अभिमान निर्माण करते आणि राष्ट्र भावनेचा विकास घडविते.  त्यामुळे कोणत्याही देशातील साहित्यिक जिवंत राहतात. अमर होतात. मोठे मोठे सम्राट येतात आणि जातात पण शब्दधन, विचारधन हे चिरतरुण व चिरंजीव असते. म्हणूनच सम्राट संपतात आणि शेक्सपिअर अमर होतो. तुकारामाचे अभंग बुडविणारे मातीमोल होतात. तुकारामांचे समाजमानसातील स्थान अभंग राहेत. ते म्हणतात, "मानवी मनात अनेक मूक आशा, आकांक्षा, कल्पना असतात आणि त्यांच्या प्रकटीकरणासाठी, व्यक्तिमत्त्वासाठी एक प्रकारे हाक मारीत असतात. शब्दांसाठी त्या भुकेलेल्या असतात. तहानलेल्या असतात. त्यांच्या हाकेला ओ देऊन लेखक, विचारवंत, संशोधक व शास्त्रज्ञ त्यांना लेखनाद्वारे शब्दरुप देत असतात. मराठी भाषिक जनतेच्याही अशा काही आशा. आकांक्षा, इच्छा असून त्या विविध प्रवाही असतात. त्यांना आपण लेखनाद्वारे शब्दरूप केले पाहिजे." अशा रीतीने अतिशय मोलाचा व महत्त्वपूर्ण विचार यशवंतराव येथे मांडतात. यशवंतरावांनी साहित्य आणि साहित्यिक यांच्या विषयीचे अगदी नेमकेपणाने केले आहे.