इतिहासाचे एक पान. ३१

ते महाराष्ट्रांत आले आणि सरळ लष्करी नोकरींत दाखल झाले. गणपतराव तिथे एकटेच राहिले. पैशाचं पाठबळ नाहीं, परका प्रांत, अशा अवस्थेंतहि गणपतराव दिवसामागून दिवस ढकलत तिथेच राहिले. इकडे कराडांत, कुटुंबांतील लोकांना त्यांची कांहीच माहिती कळेनाशी झाल्यानं सर्वजण चिंतेंत पडले. दरम्यान गणपतराव तिथे एकटेच असून आजारी असल्याचं कळतांच, कराडच्या लोकांनीं त्यांना परत. बोलावलं आणि एक दिवस जमिनीचा लोभ सोडून गणपतरावहि तिथून बाहेर पडले. गरोठला ते मलेरियानं आजारी पडले होते आणि त्यामुळे त्यांना कमालीचा अशक्तपणा आला होता. त्या अवस्थेंतच ते घरीं येण्यासाठी निघाले. कराडांत घरी पोंचले तेव्हा अतिशय खंगलेले, अंगावर धड कपडा नाही अशा अगदी विपन्नावस्थेंत त्यांना आलेलं पाहून यशवंराव कळवळले. कांही दिवस प्रकृति सुधारण्यांत गेल्यावर. गणपतराव मग नोकरीच्या मागे लागले. इस्लामपूर येथ त्यांना अखेर नोकरी मिळाली.  दरम्यान ज्ञानोबांची, थोरल्या बंधूंची नोकरी संपली होती. त्यामुळे यशवंताच्या शिक्षणाची जबाबदारी गणपतरावांनाच सांभाळावी लागली. कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी मग ते कराडला आले आणि एक-दोन वर्षं जकात-नाक्यावर आणि नंतर लँड मॉर्गेज बॅंकेंत कारकुनाची नोकरी करीत राहिले.

कराडांत असतांना गणपतराव सामाजिक कार्यांत भाग घेऊ लागले होते. गणपतराव आणि यशवंतराव यांचा राजकीय तत्त्वज्ञानाच्या बाबतींत क्वचितच सख्य जमलं. कराडांत सार्वजनिक कामांत भाग घेऊं लागल्यानंतर गणपतरावांनी एकदा म्युनिसिपालिटीची निवडणूक लढवण्याचं ठरविलं. योगायोग असा की, काँग्रेस-उमेदवाराच्या बाजूनं यशवंतरावांचा प्रचार आणि गणपतराव हे काँग्रेस-विरोधांतील उमेदवार असं चित्र निर्माण झालं. दोघांनींहि कसोशीनं प्रचार केला; परंतु निवडणुकीचा जो निकाल जाहीर झाला त्यामध्ये गणपतराव पराभूत झाले होते. काँग्रेसनिष्ठेनं यशवंतरावांनी आपल्या सख्य्या भावासच प्रभावी प्रचारानं पराभूत केलं होतं. निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र यशवंतराव मनांतून हबकले. भावाचा पराभव केल्यानंतर त्यांना तोंड दाखवावं कसं ! मनाच्या उद्विग्न अवस्थेंत ते बाहेरच फिरत राहिले. निकाल ऐकून गणपतराव घरीं गेले होते. रात्रीं जेवणवेळ टळून गेली तरी यशवंता घरीं फिरकला नाही तेव्हा गणपतरावहि अस्वस्थ झाले आणि त्यांच्या शोधासाठी बाहेर पडले हिंडता हिंडतां, एक ठिकाणीं आपला भाऊ विमनस्क मनानं बसून राहिल्यांच त्यांनी पाहिलं आणि स्वत: त्याला घरीं आणून मग दोघांनी एकत्र भोजन केलं. आपल्या पराभवानं खचून गेलेल्या यशवंताला त्यांनी दोष मात्र दिला नाही. उलट  जिद्दीनं विजय संपादन करणा-या आपल्या भावाबद्दल त्यांना अभिमान वाटत होता. यशवंताला त्यांनी शाबसकीच दिली. आईची आणि त्या खालोखाल गणपतरावांची प्रतिमा यशवंतरावांच्या मनावर कोरली गेलेली आहे. गणपतराव हे मनानं उमदे होते. महत्त्वाकांक्षी होते. यशवंतानं मोठं व्हावं हा त्यांचा ध्यास असे काँग्रेसच्या विरोधांत असतांना, ज्या भावानं पराभूत केलं त्यालाच त्यांनी असेंब्लीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे उभं राहिलंच पाहिजे अशी प्रेमाची सक्ती पुढच्या काळांत केली आणि यशवंतरावांना विधायक राजकारणाचा रस्ता मिळवून दिला. १९४१ पर्यंत, म्हणजे यशवंतराव वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत गणपतराव नोकरी करीत राहिले. त्यांच्या शिक्षणाला मदत केली. यशवंतराव वकील झाले असले तरी, वकिलीच्या व्यवसायाकडे त्यांचं लक्ष नव्हतं. मागोमाग बेचाळीसचं 'चले जाव' आंदोलन सुरु झालं आणि यशवंतराव त्या वेळीं भूमिगत झाले.