इतिहासाचे एक पान. २७५

युद्धसमाप्ति झाली त्या वेळीं पाकिसातानचा ७४० चौरस मैलांचा मुलूख भारतानं जिंकला होता. भारताच्या २१० चौरस मैल क्षेत्रावर पाकिस्तानचा ताबा होता. या युद्धांत पाकिस्तानला फार मोठं नुकसान सोसावं लागलं. खेमकरण आणि सियालकोट या दोन ठिकाणच्या युद्धांत त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. युद्धसमाप्तीनंतर आयूबखान यांनी पाकिस्तानच्या लष्करांतील जनरलच्या हुद्यावरील ११ अधिकारी आणि कर्नलच्या हुद्दयावरील ३० अधिकारी यांना सेवानिवृत्त केलं, यावरूनच पाकिस्तानची या युद्धानं काय अवस्था निर्माण केली असेल याची कल्पना येऊं शकते. भारतालाहि छांब, खेमकरण, वाघासेक्टर या भागांतील लढाईंत मोठं नुकसान सहन करावं लागलं; परंतु एकूण हिशेब पाहतां, युद्धसमाप्ति ही भारतापेक्षा पाकिस्तानलाच वरदान ठरली.

युद्धसमाप्ति अंमलांत आली तरी या दोन देशांमध्ये शांततेचं वातावरण निर्माण झालेलं नव्हतं. या दोन राष्ट्रांत समझोता करून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न रशियाचे पंतप्रधान कोसिजिन यांना, प्रत्यक्ष युद्धसमाप्तीपूर्वी सप्टेंबरच्या मध्यावरच सुरू केले होते. त्यासाठी दोन्ही प्रमुखांना त्यांनी ताश्कंदला येण्याचं पाचारण केलं होतं. अखेरीस युद्धसमाप्तीनंतर, पुढे ४ जानेवारी १९६६ ला, शास्त्रीजी आणि आयूबखान यांना चर्चेसाठी ताश्कंदला एकत्र आणण्यांत कोसिजिन यांना यश आलं, या चर्चेच्या वेळीं संरक्षणमंत्री यशवंतराव हेहि शास्त्रीजींसमवेत ताश्कंदला चर्चेसाठी गेले होते.

ताश्कंदमध्ये शास्त्रीजींच्या बरोबरीनं यशवंतरावांनी चर्चेत भाग घेतला. संरक्षणाच्या आणि लष्करी प्रश्नाच्या संदर्भांत शास्त्रीजींना आवश्यक तो सल्ला देण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांनी या वाटाघाटींच्या वेळीं केलं. ताश्कंदमधील चर्चेच्या वेळीं यशवंतराव सातत्यानं शास्त्रीजींच्या सान्निध्यांतच होते.

या चर्चेंमध्ये काश्मीर –प्रश्नाविषयाची चर्चाउपस्थित केली जाऊं नये असा शास्त्रीजींचा आग्रह होता, तर आयूबखान यांना राजकीयदृष्या, काश्मीरच्या प्रश्नाचा निकाल या चर्चेमध्येच करायचा होता. त्यामुळे तिथल्या वाटाघटींत कांहीसा पेंच निर्माण झाला. परंतु या दोन्ही राष्ट्रांच्या दरम्यान शांतता निर्माण होण्याचा प्रश्न सर्वांत अधिक महत्त्वाचा होता. अखेरीस रशियाचे पंतप्रधान कोसिजिन यांच्या मुत्सद्देगिरीच्या मध्यस्थीमुळे आणि त्यांनी स्वीकारलेल्या तडजोडीच्या भूमिकेमुळे १० जानेवारीस, भारत पाकिस्तान दरम्यानच्या मुख्य  प्रश्नासंबंधात सलोखा घडवण्यांत त्यांनी यश संपादन केलं.

ताश्कंदच्या वाटाघाटींमध्ये सलोख्याच्या ज्या अटी उभयतांनी मान्य केल्या आणि जें संयुक्त पत्रक काढण्यांत आलं त्यानुसार २५ फेब्रुवारी १९६६ पूर्वी दोन्ही देशांनी आपापलं सैन्य ५ ऑगस्ट १९६५ ला ज्या ठिकाणीं होतं तिथपर्यंत मागे घ्यावं, दोन्ही देशांनी युद्धबंदीच्या अटींचं आणि युद्धबंदी-रेषेचं पालन करावं, दोन्ही देशांनी आपापसांत राजनैतिक संबंध प्रस्थापित करावेत आणि आर्थिक व सांस्कृतिक संबंध पूर्ववत् सुरू ठेवावेत अशी तडजोड निश्चित झाली.

या सर्व वाटाघाटींच्या वेळीं यशवंतरावांनी भारताचे संरक्षणमंत्री म्हणून तर भूमिका बजावलीच, परंतु त्यापेक्षाहि भारताच्या पंतप्रधानांचे एक विश्वासू सहकारी आणि व्यवहारी मध्यस्थ या नात्यानं त्यांची प्रतिमा अधिक उठावदार अशी निर्माण झाली.

ताश्कंदमध्ये वाटाघाटी झाल्या, दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या स्वाक्षरीनं संयुक्त पत्रक निघालं आणि भारत-पाकिस्तान यांच्यांतील उभं वैर तात्कालिक स्वरूपांत का होईना, कमी करण्यांत, आशिया खंडांतील या भागांत शांतता निर्माण करण्यांत रशियाच्या मध्यस्थीला यश आलं, इथपर्यंत सर्व गोष्टी सुरळीत पार  पडल्या.