विविधांगी व्यक्तिमत्व-१४

ग्रंथ हे ग्रेट कम्पॅनियन ‘नि’ मास्टर्स आहेत. विल्यम कॉवेट हा नांगर धरणारा पण एका वर्षात त्याने वाचनालयाची सारी पुस्तके वाचून फस्त केली. त्यांनी लिहिले की ‘भोजन खर्चात काटकसर केली पण वाचन बुडविले नाही.’ ‘ग्रंथ हेच बुद्धीचे खाद्य आहे.’

कविवर्य बा. भ. बोरकर म्हणतात, माझा व पुस्तकांचा ऋणानुबंध जडला होता. कुणी मला निराशेत आशेचे किरण दाखविले होते. कुणी माझ्या निद्रिस्त प्रतिमेला जाग आणली होती. कुणी माझ्या जखमेवर गार पाण्याची धार धरली होती. कुणी माझ्या अंधारलेल्या जीवन पथावर ऐनवेळी प्रकाश पाडला होता. कुणी माझे हरवलेले बाल्य परत आणून दिले होते. कुणी माझ्या तारूण्याला वेळोवेळी उजाळा दिला होता. कुणी माझ्या झोपाळू ध्येयवादास वरच्यावर अंकुश लावला होता.

व्यवहाराच्या विशिष्ट साहित्यकृतीची अविट गोडी चाखण्यासाठी वाचन कौशल्य मिळविले पाहिजे. ‘ग्रंथ हे माणसाचे आयुष्यभराचे सांगाती असतात.’

पुस्तक आणि वाचक यांच्यामध्ये नाते निर्माण होते कारण पुस्तकातील विचारामुळे आपल्या विचारांना दिशा मिळते. दर्जेदार साहित्याच्या वाचनामुळें विचारात परिपक्वता येते. त्याचबरोबर विचारसरणीचाच नव्हे तर संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकासहि होतो. भरपूर वाचनाच्या बळावर स्वत:ची मते बनविण्याचा आणि ती इतरांपुढे मांडण्याचा आत्मविश्वासहि निर्माण होतो. प्रभावी वाचन निवेदन, भावशैली विकसित करता येते. आपल्या आवडी-निवडी, ध्येय आणि महत्त्वाकांक्षा, जीवनाचे तत्त्वज्ञान आणि नैतिक विचारसरणी या सर्वांवर सकस/ निकस वाचनामुळे वेगळे वळण मिळू शकते.

चरित्र वाचनाची आवड निर्माण झाल्यावर यशवंतरावांची जिज्ञासेची क्षेत्रेही वाढत गेली त्याचप्रमाणे त्या त्या क्षेत्रांशी संबंधित स्त्री-पुरूषांच्या जीवनाविषयी औत्सुक्येही वाढत जातात, त्यांच्या विषयी आपुलकीची व आदराची भावना निर्माण होते.

ग्रंथ वाचनातूनच क्रांती झाल्याचे दिसेल. म. गांधी, थोरो, रस्कीन अशा थोर थोर व्यक्तिंची चरित्रे पाहिली तर एकेका पुस्तकांनी त्यांचे जीवन घडविले असे दिसेल. ध्येयाचा मार्ग ग्रंथांनी दाखविला.

‘कृष्णाकांठ’ या आत्मचरित्रामध्ये यशवंतराव खांडेकरांच्या ‘दोन ध्रुव’ या कादंबरी वाचनाची एक आठवण सांगतात. खांडेकराची दोन ध्रुव कादंबरी मी प्रथम कोल्हापूरमध्ये वाचली. १९३४-३५ साली मी कोल्हापूरला प्रथम आलो होतो. ‘दोन ध्रुव’ ही नवीन कादंबरी हातात आली तेव्हा आषाढ-श्रावणाचा पाऊस धो-धो पडत होता. कॉलेजमध्ये गेलं नाहीतरी चालेल असे मनाने ठरविले होते आणि खोलीमध्ये थंडी जाणवते म्हणून निमित्त करून अंगावर हलकेसे पांघरूण ओढून मी खांडेकरांची दोन ध्रुव ही कादंबरी पहिल्यांदा वाचली. तुम्हाला एक गंमत सांगू-जर पुस्तक वाचण्याचा तुम्हाला नाद असेल तर आपल्याला आवडलेले पहिले पुस्तक पहिल्यांदा कसे आणि केव्हा वाचले याची आठवण मनात ताजी असते. ते पुस्तक आपल्या हातात घेऊन कसे करवाळले, हे आईला आपले मूल झाल्यावर कुरवाळताना कसे वाटले असेल हे विचार म्हणजे कळेल. कोल्हापूरातल्या भूसारी वाड्यातील खोलीत त्या पावसाळी दुपारी मी कादंबरी कशी वाचली हे आजहि माझ्या लक्षात आहे. नव्या कोर्‍या पुस्तकाला येणारा सुरेखसा वास कसा येतं होता याचीसुद्धा मला आठवण आहे.

यशवंतराव यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीशी जसा त्यांचा सभोवती घडणार्‍या प्रसंगाचा संदर्भ आहे तसेच त्यावेळच्या प्रसिद्ध व्यक्तींच्या वैचारिक जीवनाचा आदर्शहि त्यांच्याशी संलग्न आहे आणि या दोन्ही गोष्टी व्यतिरिक्त अखंड वाचनातून त्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचाहि फार मोठा वाटा आहे. साहित्यातील सर्व वाङ्‌मय प्रकारांशी त्यांचा संबंध आलेला आहे. त्यांनी ललित कृतीचे वाचन केले आहे. तसेच त्यावेळी गाजलेल्या समाजवादावरील पुस्तकांचेहि वाचन केले आहे. निरनिराळ्या लोकांशी संपर्कआल्यामुळे वाचनांच्या व विचारांच्या कक्षा रूंदावल्या. बहुजन समाजाला आपल्या प्रगतीसाठी शिक्षणाचीच कास धरणे आवश्यक आहे असले तरी कोठल्या जातीचा द्वेष केला पाहिजे हा विचार पटत नव्हता. त्यासाठी अधिक मोठ्या शहाण्या लोकांशी संभाषण, संवाद करायला हवा याची जाणीव त्यांना या काळात झाली.