यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २२-२

यशवंतरावांच्या ठिकाणी जे कलाप्रेम होतं, रसिकता होती, तेवढढं प्रेम आणि रसिकता मला अन्य राजकारणी मंडळींत क्वचितच आढळली.  राजकारणातलं त्यांचं स्थान, श्रेष्ठता आणि त्यांचं कलाप्रेम, रसिकता या दोन्ही गोष्टी संपूर्ण वेगळ्या होत्या.  त्यांची माझी भेट झाली तर त्यांच्याकडून चौकशी व्हायची ती गाण्याची, कलेची.  सध्या नवीन काय, कधी ऐकवणार याची विचारणा.  गाणं ऐकण्यासाठी येण्याची त्यांची एक शिस्त होती.  संपूर्ण मैफल ऐकण्याइतका वेळ असेल तरच ते मैफलीच्या ठिकाणी यायचे.  गाणं ऐकायचं तर संपूर्ण, हा त्यांचा शिरस्ता ठरला होता.  मैफल अर्धवट सोडून ते कधी उठायचे नाहीत.  दिल्लीत एकदा असं घडलं.  खासदार सोहनलाल यांनी स्वतःच्या घरी एक कार्यक्रम आयोजित केला.  यामिनी कृष्णमूर्ती आणि मी असे आम्ही दोघेच होतो.  खा. सोहनलाल यांनी विद्युतदीपांचा झगझगाट नको म्हणून सर्वत्र शांत प्रकाशाच्या, समया ठेवल्या होत्या.  कार्यक्रमासाठी अत्यंत निवडक मंडळींनाच आमंत्रणे होती.  सुरुवातीला यामिनी कृष्णमूर्ती आणि नंतर मी अशी योजना होती.  रात्री दहाच्या

( पान क्र. १९९ नाही आहे )

पान क्र. २०० पासून पुढे चालू....

रामनाम कायमचे स्मरणात राहील असे झाले.  नंतर यशवंतराव मोठ्या खुषीने सर्वांना भेटले.  त्यामुळे राजधानीतला तो आनंदसोहळा द्विगुणित झाला.

कलावंत यापेक्षाही व्यक्ती म्हणून माझा त्यांचा जो संबंध आला, त्या प्रत्येक वेळी हा एक निगर्वी, उमदा रसिक, कला आणि कलावंत यांच्याबद्दल जिव्हाळा असलेला थोर मनाचा माणूस याचंच दर्शन घडलं.  त्यांची बोलण्याची एक वेगळीच ढब असायची.  एखाद्याला त्याच्या मनाविरुद्ध काही सांगायचं असलं तरी आदरपूर्वक बोलत असत.  त्यांनी कधी लागट भाषा वापरली नाही.  कोणी कितीही जवळीक दाखविली तरी कधी दर्जा सोडला नाही.  निःपक्षपाती राहून माणसं सांभाळण्याची हातोटी त्यांना साध्य झाली होती.  त्यांचं माझं काही नातं-गोतं नव्हतं परंतु त्यांनी भावापेक्षा अधिक प्रेम केलं.  दिल्लीत कसलीही अडचण येवो, आम्ळाला त्यांचं घर हे हक्काचं घर होतं.  लागेल ती मदत करण्याची त्यांची तयारी असे.  त्यांचे स्वीय सहायक श्री. डोंगरे हेही तसेच.  अडचणीसाठी धावून येण्यास नेहमीच तयार आणि तत्पर.  यशवंतराव स्वतः दिल्लीत नसले आणि सौ. वेणूताई असल्या तरी आदरसत्कारात किंवा अडचण निवारण करण्यात कधी कसूर केली नाही.  

राजकारणी असूनही यशवंतरावांसारखा सावध, प्रसंगावधानी, सुसंस्कृत, अष्टपैलू असा दुसरा कोणी राजकारणी मी पाहिला नाही.  त्यांना एकदा भेटले की, पुन्हा भेटावे असे वाटायचे.  ते दिल्लीत असतील त्या वेळी मी असलो तर समक्ष किंवा फोनवर भेट व्हायची.  ते चौकशी करायचे.  मी विमानतळावर जाण्यासाठी निघणार असलो तर आपली मोटार पाठवीत असत.  शासकीय झेंडा फडफडणार्‍या त्यांच्या त्या मोटारीतून विमानतळाकडे जाताना किंवा तेथे पोहोचल्यावर आमचा रुबाब काय वर्णावा !

मानसिक दृष्ट्या त्रासलेले असले किंवा अन्य काही कारणाने व्यथित असले तर गाणं ऐकणं हा त्यांचा विरंगुळा असायचा.  ''लोकांना तुम्ही गाणं ऐकवता, गाण्याचा आनंद देता, फार चांगलं काम करता तुम्ही'' असं मला भेटले की म्हणायचे.  त्यावर ''देव आमची निवड एकदाच करतो, आम्हाला पुन्हा निवडणूक नसते'' असं मी म्हटलं की मनसोक्त हसायचे.

सौ. वेणूताई गेल्या आणि हा उमदा माणूस उदास बनला.  कधीमधी भेट होई.  तेव्हा त्यांचं उदासपण पाहून मनाला यातना व्हायच्या.  वेणूताईंच्या

( पान क्र. २०१ व २०२ नाही आहे )

पान क्र. २०३ पासून पुढे चालू....

बर्‍याच गोष्टी आल्या.  ते सांगत होते त्याला फार मोठा अर्थ होता.  अमेरिकेत असतानाच 'बेस्ट सेलर' म्हणून 'प्रिन्सेस' या कादंबरीची कीर्ती त्यांच्या कानावर आली होती.  एका मराठी माणसाची गाजलेली इंग्रजी कादंबरी म्हणून ती त्यांनी विकत घेऊन वाचली होती.  मराठी लेखकाच्या इंग्रजी लेखनाबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटला होता.