यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- संपादकीय निवेदन

संपादकीय निवेदन

कै. यशवंतराव चव्हाण यांच्या अचानक निधनाने आधुनिक महाराष्ट्राचा प्रमुख शिल्पकार नाहीसा झाला आहे.

१९६२-८४ या २२ वर्षांत यशवंतराव राष्ट्रीय पातळीवर वावरत होते.  या २२ वर्षांतील त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या राजकीय जीवनातील चढ उतारांचा, वादळांचा इतिहास त्यांच्या आत्मचरित्राच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या खंडात ते सांगणार होते.  कृष्णा-कोयनेचा हा सुपुत्र आता 'कृष्णाकाठा'वर कायमचा विसावला आहे.  त्यामुळे मराठी साहित्य एका विदग्ध आत्मचरित्राला मुकले आहे.  भारतीय इतिहासाचे एक प्रकरण लुप्‍त झाले आहे.

या कालखंडाचे यशवंतरावांच्या निकटवर्तीयांच्या सहाय्याने चित्रण करावे असे उत्कटतेने मला वाटते आणि त्यातून अशा सामूहिक चित्रणाची कल्पना मनात उद्‍भवली.  हा इतिहास संबंधितांकडून मिळवून संग्रहित केला पाहिजे असे वाटले.

यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व कॅलीडोस्कोप सारखे होते.  ते पाहाणार्‍याला त्यांच्या वेगवेगळ्या रंगाकृती दिसत.  अशा व्यक्तित्वाचा शोध हे अत्यंत कठीण काम आहे.  असे असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक रंग मनात भरत.  या पुस्तकात त्यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वाचे हे रंग, त्यांचे विविध पैलू, लेखांतून आणि आठवणींतून दाखविण्याचा प्रयत्‍न केला आहे.

यशवंतराव हे सत्ताधीश राजकारणी असल्यामुळे त्यांचे राजकारण आणि सत्तेतील जीवन असे त्यांच्या राजकीय जीवनाचे दोन भाग पडतात.  सत्तेचे राजकारण हा रोचक, औत्युक्स व उत्कंठा निर्माण करणारा भाग असतो.  पण सत्ताधीश मंत्री म्हणून त्याने केलेले उपक्रम आणि कार्य उपेक्षित राहते.  राजकारणी स्पर्धेच्या आणि वादांच्या दृष्टीने यशवंतराव हे विवाद्य व्यक्तित्व असले तरी स्वातंत्र्योत्तर काळातील उत्तम, कार्यक्षम आणि लोकाभिमुख राजकीय प्रशासक म्हणून त्यांनी केलेले कार्य निर्विवाद आहे.  अधिक सखाल अभ्यास करण्यासारखे आहे.  या दृष्टीने 'मंत्रालयातील वर्षे' हा स्वतंत्र विभाग केला आहे.  त्यात यशवंतरावांच्या मुलाखतीच्या आधारे लिहिलेले लेख आहेत.  तसेच त्यांच्या बरोबर विविध खात्यांत काम केलेल्या काही सनदी व संरक्षण अधिकार्‍यांचे लेख, मुलाखती विभाग ३ आणि ५ मध्ये आहेत.

संरक्षण आणि गृहमंत्रालयात असताना चव्हाण यांनी जे कार्य केले ते भारताच्या विविध समस्यांचा इतिहास म्हणून आजही अभ्यासणे आवश्यक आहे.  असा अभ्यास केला तर चव्हाणांचे या क्षेत्रातील योगदान काय होते ते नेमके कळेल.

चव्हाणांनी घेतलले राजकीय निर्णय किंवा सत्तेच्या राजकारणातील डावपेच यासंबंधी आपापली मते सांगणारे राजकीय नेत्यांचे लेख दुसर्‍या, पाचव्या विभागात आहेत.  नेता (लीडर) आणि नेतृत्व (लीडरशिप) याचे मूल्यमापन स्वतंत्रपणे व्हावयास हवे.  तसे ते झाले तर चव्हाणांच्या लोकशाही नेतृत्वाचे गुण स्पष्टपणे दिसू शकतील.  या दिशेने अभ्यास करण्यासाठी काही लेख उपयोगी पडतील.  चव्हाणांच रसिक, सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व आणि त्यांची साहित्यसाधना, ज्ञानसाधना हे त्यांच्या जीवनाचे अनुकरणीय भाग आहेत.  त्याची माहिती विभाग चारमधील लेखांतून मिळेल.  माणुसकी न हरवलेला कुटुंब-वत्सल राजकारणी ही त्यांची प्रतिमा विभाग पाच मधील लेखातून उमजेल.  या संग्रहात काही अप्रकाशित मुलाखती आणि नवी माहिती काही लेखातून देण्यात आली आहे.  सारांश, विवाद्य व्यक्तिमत्त्वातील वादातील गुणांचा हा शोध आहे.

या संग्रहासाठी लेख पाठविण्याची विनंती ७५ संबंधित नेते, सरकारी अधिकारी, पत्रकार, साहित्यिक, कलावंत आदींना केली होती.  लेख लिहिण्याची सर्वांची इच्छा असली तरी वेळेच्या अभावी काहीजणांना जमलेले नाही.  तरीही पुष्कळांनी प्रतिसाद दिला.  ज्यांनी लेख लिहिले, ते यशवंतरावांचे समिप दर्शन घडविणारे आहेत.  त्या सर्व लेखकांचा मी अत्यंत ॠणी आहे.  त्या सर्व लेखकांचीही सामूहिक श्रद्धांजली असली तरी ती डोळस आहे.  तसेच या ग्रंथातील प्रत्येक विभागात, यंदा प्रसिद्ध झालेल्या विशेषांकातील काही आठवणी पुर्नमुद्रीत केल्या आहेत.