• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य २२४

७३

विदर्भ साहित्य संमेलन

(रौप्यमहोत्सवी संमेलनाच्या उद्‍घाटन - प्रसंगीचे भाषण : २६ डिसेंबर, १९६४)

साहित्य संमेलनात, कोणत्याही मराठी भाषक माणसाला भाग घेण्याची संधी मिळणे ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. या संमेलनासाठी आपण मला आमंत्रण देऊन आपल्याशी चार गुजगोष्टी करण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी आपणां सर्वांचा हार्दिक आभारी आहे. मराठी साहित्याची मी काही महत्त्वाची सेवा केली आहे आणि म्हणून माझी या वेळी आठवण करण्यात आली आहे, असल्या कोणत्याही भ्रमात मी नाही. मी केवळ एवढेच म्हणू शकतो की, माझ्याबद्दल आपणांस वाटणारा जिव्हाळा आणि मराठी भाषा, तसेच, मराठी भाषकांबद्दल माझ्या मनात असलेली नितांत श्रद्धा यांमुळेच आजच्या ह्या प्रसंगी मला आमंत्रित करण्यात आले आहे; आणि केवळ या एकाच भावनेने मी आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केला आहे.

साहित्य संमेलन भरवून आपण एका प्रकारे विस्मृत इतिहासाला उजाळाच दिला आहे. व-हाड - मराठवाड्याची ही भूमी मराठी भाषेची जननी आहे, हे आपणां सर्वांना माहीतच आहे. शेकडो वर्षे येथील जनजीवनात घडलेल्या घटनांचा व संघर्षांचा परिणाम म्हणून मराठी भाषेला येथेच अंकुर फुटले, या भूमीतच तिचे पालन-पोषण झाले आणि एक स्वतंत्र भाषा म्हणून मराठी भाषेने नेत्रदीपक विकास केला. याचे कारण पण स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर इतिहासाची जास्त कडक नजर राहिली आहे. आर्य आणि अनेक आर्येतर जातींची पद-चिन्हे आजही येथील भूमीवर अंकित झालेली आढळतात. नाग, अभीर, सातवाहन, यादव, मुसलमान, मराठे या सर्वांच्या राजवटींत जेवढी परिवर्तने झाली, त्या सर्वांचा परिणाम येथील बोल-भाषांवर झाला. मराठी भाषेच्या स्वरूपासंबंधी विचार केल्यास, असे म्हणता येईल की, गेल्या दोन हजार वर्षांतील सर्व घटनांचा परिणाम या भाषेच्या विकासावर झाला आणि त्यातूनच मराठीचे आधुनिक रूप साकार झाले. तेव्हा या प्रदेशात राहणार्‍या लोकांच्या स्वभावातील सर्व गुणविशेष मराठीत दिसले, तर याबद्दल आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. साहित्यात प्रादेशिकता काही अंशी असते, असे वाटते. जमिनीचा कस वेगळा असला, की पिकाचे प्रमाण व प्रकार बदलतात, तसेच काही अंशी साहित्यनिर्मितीचे असते. म्हणून विदर्भाच्या साहित्यात येथील मूल्यांचा, येथील परंपरेच्या संस्कारांचा अंश असणे अपरिहार्य आहे. साहित्याची समृद्धी यामुळेच वाढते. महाराष्ट्र या दृष्टीने भाग्यशाली आहे. त्यातील विविध विभागांच्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्यामुळे त्याची भाषा संपन्न झाली आहे. विदर्भ साहित्य संमेलनाकडे मी याच दृष्टीने आकर्षित झालो. तेथील साहित्याचे नवे उन्मेष समजावेत, ही माझी इच्छा आहे.

महाराष्ट्राच्या भोवताली अनेक भाषांचे वर्तुळ आहे आणि या भाषांशी नेहमीच संबंध येत राहिल्याने त्याचा मराठीवर परिणाम होणे साहजिकच आहे. इ. स. पूर्वकाळात आर्यांचा दक्षिणापथ प्रदेशाबरोबरच संबंध होता. त्याचा असा परिणाम झाला की, मुसलमानांचे आक्रमण होण्यापूर्वी, महाराष्ट्रातील जनतेचा संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंश ह्या आर्य भाषांशी संबंध आला व त्याचा त्यांच्यावर प्रभाव पडून त्यांना या भाषांचा परिचय झाला.

मराठी भाषेला इतिहासाने वस्त्र दिले, तर भूगोलाने ते शिवून मराठी भाषेच्या अंगावर घातले व तिच्या रूपात भर टाकली, असे म्हणावे लागेल. प्राचीन काळापासून या प्रदेशाची अशी भौगोलिक स्थिती होती की, उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोघांमध्ये एका सेतूची भूमिका या प्रदेशाने पार पाडली. उत्तरापथमधील रहिवासी ह्या प्रदेशाला दक्षिणापथ म्हणत असत. तर दक्षिणेकडील लोक या प्रदेशाला उत्तरेकडील अंतिम ठाणे समजून, ह्या प्रदेशाकडे एक जवळचा शेजारी या नात्याने पाहत असे.