शैलीकार यशवंतराव १२३

यशवंतरावांच्या ललित लेखनामध्ये विविधता आढळते.  'बांधिलकी कलम करता येत नाही' या लेखामध्ये साहित्यिकाने बांधिलकी स्वीकारावी काय ?  या विषयावर त्यांनी विचार मांडले आहेत.  अनेक साहित्यिकांच्या बदलत्या लेखनाची रूपे या लेखकाने संवेदनशील वृत्तीने टिपली आहेत.  डोळसपणे न्याहाळली आहेत.  याची जाणीव त्यांच्या या लेखातून होते.  शंकरराव खरातांच्या साहित्यात त्यांना बांधिलकी दिसते.  तसेच भालचंद्र नेमाडे, चि. त्र्यं.खानोलकर, विजय तेंडुलकर, प्रभू देसाई, ग.त्र्यं.माडखोलकर, केशवसुत यांच्या साहित्यात प्रेरणांच्या व जीवनाच्या अनुभवावर अधिष्ठित बांधिलकी आहे तर राजकीय कादंबरीमध्ये अरुण साधूंच्या कादंबर्‍या प्रचारकी थाटाच्या आहेत.  कानेटकरांच्या नाटकात अभिप्रेत असलेली बांधिलकी नाही असे स्पष्टपणे नमूद करतात.  मनाची प्रौढता, उंची वाढविण्यासाठी वैचारिक वाङ्‌मयाची गरज आहे या संदर्भात ते लिहितात, ''वैचारिक बांधिलकी ललित लेखकाच्या लिखाणातून उतरावीच असा माझा आग्रह नाही.  परंतु लेखकाची वैचारिक बांधिलकी खरीखुरी असेल, तिच्याशी तो प्रामाणिक असेल - चांगले साहित्य निर्माण करणारा स्वतःशी प्रामाणिक असतोच, तेव्हा ही बांधिलकी त्याच्या लिखाणात स्पष्ट रूपाने व्यक्त झाल्याशिवाय राहीलच कशी ?  बांधिलकी हा लादून घेण्याचा प्रश्न नाही, तर तो असण्याचा प्रश्न आहे; आतून येण्याचा पन आहे.  बांधिलकी उत्स्फूर्त असावी लागते, उत्स्फूर्त वाङ्‌मयाच्या निर्मितीला ती प्रेरणा कारणीभूत होते, त्यात बांधिलकीची बीजे असतातच.  तेव्हा 'बांधिलकी' ही 'कलम' करता येत नसते.  प्रतिभेइतकीच ती उपजत असावी लागते.''  लेखन हे सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतूनच लिहिले पाहिजे.  समाजप्रबोधनाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवूनच यशवंतरावांनी येथे वरील विचार मांडले आहेत.  समाज हा यशवंतरावांचा प्रेमाचा व सर्वांगीण चिकित्सेचा विषय आहे.  लेखनासाठी आवश्यक असलेली तात्त्वि बैठक आणि कृती यामुळे त्यांचे हे वैचारिक लेखन भारदस्त झाले आहे.

यशवंतरावांच्या समग्र साहित्याची मूळ पीठिका समाज चिंतन व समाजप्रबोधन हीच आहे.  कोणतातरी महत्त्वपूर्ण विचार समाजाला देणे हेच त्यांच्या या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.  सामाजिक जबाबदारी या लेखात ते लिहितात, ''आपणही समाजाचे घटक आहोत, समाजाचं आपल्यावर ॠण आहे.  ही भावना मनात आणली, तर तुम्हाला या समाजासाठी कितीतरी गोष्टी करता येतील.  समाजॠण हे केवळ पैसा देऊनच फेडायला लागतं, असं नाही, तर काही प्रेमाचे शब्द, आपुलकीची भावना, थोडे फार कष्ट आणि याबरोबरच समाजाविषयीची तळमळ असली, तरी कितीतरी कामं करता येणं सहज शक्य आहे.''  ज्या समाजात, ज्या देशात आपला जन्म झाला त्यासाठी आपण माणूस म्हणून काहीतरी सामाजिक कार्य केलं पाहिजे.  ते कार्य कोणत्या रीतीने करायला हवे त्याचा वेध घेतला पाहिजे.  त्यासाठी विचारांचे आंदोलन उभे केले पाहिजे.  त्यासाठी समाजात भक्कम वैचारिक बैठक असणे अगत्याचे आहे.  

यशवंतरावांच्या काळात मराठी पत्रकारितेला मोठा बहर आला होता.  महाराष्ट्रातील फार मोठी माणसे त्या काळात वृत्तपत्रात अत्यंत तेजस्वी लेखन करत होती.  साहजिक पत्रकारितेचे महत्त्व यशवंतरावांना उमगले होते.  त्यांनी 'मराठी वृत्तपत्रांचे स्वातंत्र्यलढ्यातील कार्य' या विषयावरील लेखात पत्रकारितेचे महत्त्व विशद केलेच शिवाय अनेक वृत्तपत्रांचा व वृत्त्पत्र लेखकांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.  सुबुद्ध मराठी समाजाच्या वैचारिक घडणीचे कार्य या काळात वृत्तपत्रांनी केले.  या काळात अनेक वाद निर्माण झाले.  पण त्यामुळे वैचारिक सहिष्णुता वाढली.  सहिष्णुता व राजकीय जागरुकता लोकशाहीत रुजविण्यासाठी आवश्यक असते.  हे कार्य मराठी पत्रांनी केले.  वृत्तपत्रांना आणखीही एका दृष्टीने महाराष्ट्रात महत्त्व आहे.  त्यांनी ज्ञानाच्या खिडक्या उघडल्या.  त्यातून पुरोगामी विचार समाजापुढे आले.  वैचारिक, आर्थिक, सामाजिक विचारांची मूलभूत चर्चा त्यांनी केली, अशा समर्पक शब्दात ते वृत्तपत्रांचे कार्य स्पष्ट करतात.