• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (147)

लोक मला विचारतात, काँग्रेससाठी नवा कार्यक्रम काय? माझे त्याला उत्तर आहे, की गरिबांवर, मग तो शेतकरी असो वा शेतमजूर असो, हरिजन असो किंवा आदिवासी असो, यांपैकी कोणावरही अन्याय होऊ नये, यासाठी तरुणांनी, कार्यकर्त्यांनी कंबर बांधून उभे राहिले पाहिजे. गरिबांची संघटना उभी करून गरिबांचे, दलितांचे प्रश्न हाती घेऊन त्यांच्यावर होणा-या अन्यायाविरुद्ध उभा राहणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष, असे प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले पाहिजे. हे सिद्ध करावयाचे, तर गरिबांचे शोषण करणारे जे असतील, त्यांना जाब विचारणारे कोणी नाहीत, असे चित्र दिसून येता उपयोगी नाही. कार्यकर्त्यांनी याची जाण ठेवली पाहिजे, की शोषकांच्या मागे जातीची, पैशाची, परंपरेची शक्ती उभी असते. त्याच्या बळावरच तो श्रीमंत वा शोषक, जमीनदार गरिबाला, हरिजनाला जमिनीवरून दूर ढकलण्यास सिद्ध असतो. अशा वेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेसची संघटनेची शक्ती गरिबांच्या, दलितांच्या पाठीशी उभी करावयास हवी.

गरिबांच्या पाठीशी शक्ती उभी करावयाची, ती त्यांचे शोषण होऊ नये, यासाठी तर खरेच, परंतु त्याचबरोबर आर्थिक विषमता हे या सर्व अन्यायाचे मूळ आहे, हे लक्षात घेऊन विषमतेचे ते मूळ छाटण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. विषमतेचे मूळ छाटावयाचे, याचा अर्थ विकासाच्या नवनवीन कार्यक्रमांत गरिबांना, दलितांना सहभाग दिला जाईल, यासाठी धोरणात्मक जपणूक करावयास हवी. म्हणजे असे, की विकासाकरिता नवीन कार्यक्रम हाती घेतला जाईल, तेव्हा त्यासाठी नवीन संस्था निर्माण होतील, अशा वेळी गरीब व मागासलेल्या वर्गाच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे लागेल. सहकारी चळवळीवर तर याची विशेष जबाबदारी आहे. छोट्या जमातीच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन, विधायक दृष्टिकोणातून सहकारी चळवळीने त्यांचे प्रश्न हाताळले पाहिजेत. गावात नवी संस्था सुरू होत असली किंवा गावातील जुन्या संस्थेचे कार्यक्षेत्र वाढविण्याची संधी प्राप्त झालेली असेल, किंवा विकासाच्या प्रगतीतून रोजगाराची नवी संधी निर्माण होत असेल, तर अशा वेळी रोजगाराची संधी उपलब्ध करून देताना एक पथ्य जरूर पाळले गेले पाहिजे, की त्या गावातील ज्या घरात मिळवता कोणी नसेल, अशा घरातील तरुणाला अग्रक्रमाने ही संधी दिली जाईल. याकडे जागरूकपणे लक्ष ठेवले पाहिजे. अशी संधी देत असताना, जात-पोटजात, रक्ताचे नाते, असा विचारसुद्धा करता कामा नये. ग्रामीण भागात काय किंवा नागरी विभागात काय, गरिबी ही अमुकच एका जातीपुरती मर्यादित नाही. या देशातील साठ टक्के जनता दारिद्र्य-रेषेखाली आहे, अशी आकडेवारी जेव्हा आपण उद्धृत करतो, त्याचा अर्थच हा, की गरिबीला जात-पोटजात-धर्म-पंथ असे काही नसते.