• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (91)

हा लढा देण्यासाठी गांधीजींशिवाय कोणताही नेता त्या काळात पुढे येणे अशक्य होते. एका सामान्य शेतक-याच्या निमंत्रणावरून गांधीजी तेथे गेले, खेडुतांमध्ये मिसळले, आफ्रिकेत आपल्याला ज्या तंत्राचा शोध लागला होता, त्या सत्याग्रहाच्या अस्त्राचा त्यांनी वापर करण्याची तयारी केली. इंग्रज अधिका-यांजवळ व गो-या शेतमालकांजवळ बोलणी केली, आत्मक्लेशाची सारी सारी सिद्धता केली - अन् काही तरी चमत्कार झाला. इंग्रज कलेक्टरने माघार घेतली व गांधीजींचा विजय झाला. परंतु त्यातूनच गांधीजींच्या विधायक कार्याची सुरुवात झाली. आपल्या आश्रमातील अनेक मंडळी ते तेथे घेऊन गेले. कस्तुरबा गेल्या. इतर स्त्रियाही
गावक-यांच्या शिक्षणासाठी, सेवेसाठी गेल्या. प्रगतीसाठी नव्या त-हेच्या चळवळीची मुहूर्तमेढ रचण्यात आली.

गांधीजींच्या कार्याची व व्यक्तिमत्त्वाची एक नवी झलक भारताला त्या वेळी दिसून आली. राजकीय नेता कसा असावा, याची विवक्षित कल्पना त्या वेळी लोकांपुढे होती. लोक असा शब्द जो मी वापरला, त्यात तत्कालीन शिक्षित वर्गाचाच समावेश मला प्रामुख्याने करावयाचा आहे. त्या वेळचे राजकारण हे बहुतांशी शिक्षित वर्गाचेच राजकारण होते. या शिक्षित वर्गामधून दोन प्रकारचे नेतृत्व देशभर निर्माण झाले होते. एका नेतृत्वाचा घाट लोकमान्य टिळकांच्या विचारांचा होता. दुस-या नेतृत्वाचा घाट नामदार गोखल्यांच्या विचारांचा होता. योगायोगाने हे दोन्ही सर्वमान्य, देशमान्य नेते मराठीच होते. परंतु या दोन प्रकारांपेक्षा वेगळ्या व तिस-या प्रकारचे नेतृत्व वर येईल, अशी अपेक्षा त्या काळातही कोणी केली असेल, असे वाटत नाही.

म्हणून गांधींच्या रूपाने एक चमत्कारच भारतीय राजकारणात घडला, असे म्हणावे लागेल. गांधीजींच्या मृत्यूनंतर आईन्स्टिन म्हणाला, की
'गांधींसारखा माणूस या अवनितलावर होऊन गेला, यावर आगामी पिढ्यांचा विश्वासही कदाचित बसणार नाही.'

आईन्स्टिनला जर असे वाटले, तर गांधींचा उदय ज्या पिढीने पाहिला, त्या पिढीला काय वाटले असेल, याचा विचारच केलेला बरा !

युगपुरुष जेव्हा आपल्या युगप्रवर्तक कार्याची सुरुवात करतो, तेव्हा असेच काही तरी होणे स्वाभाविक मानले पाहिजे. व्याकरणाचे जुने नियम तो जणू फेकून देतो. जुनी फूटपट्टी तो मोडून टाकतो. स्वत:च्या गायकीला साजतील, असे नवीन स्वर अन् ताल बसवितो आणि नवे सूर आळवू लागतो. गांधीजी जेव्हा भारतात प्रथम कार्य करू लागले, तेव्हा ते नेमके कोणत्या क्षेत्रात उतरणार, याबद्दल जाणकारांनी वेगवेगळे अंदाज केले असणे शक्य आहे. कोणाला वाटले असेल, की गांधीजी सामाजिक कार्याला वाहून घेतील, कोणाला वाटले असेल, की ते राजकीय कार्याला प्राधान्य देतील. 'आधी सामाजिक सुधारणा, की आधी राजकीय चळवळ' असा एक मोठा वाद महाराष्ट्रात त्यापूर्वी रंगून गेला होता व त्याचे खोल परिणाम महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या सार्वजनिक जीवनावर उमटले होते.