• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (69)

या आनंदात पुष्कळदा मीही सहभागी झालो आहे. या शर्यतीत रेठरे गावचे नावाडी-आंबेकरी हमखास यश मिळवीत.

कृष्णाकाठावर उभे राहिल्यानंतर स्वच्छ जीवनाचा तो प्रशांत प्रवाह आणि तीरावरील हिरवागार सुंदर निसर्ग पाहत राहणे याचा आनंद काही वेगळाच. अंत:करणात तो बसून राहतो आणि स्मरणमात्रे अंतश्चक्षूंसमोर उभा राहतो. लहानपणापासूनच कृष्णाकाठचे प्रेम माझ्या मनात भरून राहिले आहे.

दहा-बारा वर्षांचा असेन मी. असाच एकदा वाईच्या खो-यात असलेल्या मेणवली गावी गेलो होतो. मेणवलीला नाना फडणविसांचा टोलेजंग वाडा आहे. तो मी पाहिला. पण मेणवलीच्या कृष्णाकाठावर, कृष्णेच्या घाटावर पोहोचलो मात्र; पाय तिथेच खिळून राहिले. मेणवलीला कृष्णेच्या घाटाचे शिल्प मोठे सुंदर आहे. कलापूर्ण आहे. या घाटावर उभे राहिले, की कृष्णामाईचे लांबच लांब पात्र दिसते आणि महाबळेश्वर सोडून निघाल्यानंतर ज्या डोंगर-द-यांतून कृष्णामाई झेपावत पुढे येते, ते खोरे समोर उभे दिसते. नितांतसुंदर, रम्य असे हे ठिकाण. माझ्या ते चांगलेच लक्षात राहिलेय्.

महाबळेश्वरात एकाच ठिकाणाहून पाच नद्या उगम पावतात आणि डोंगरातून वेगवेगळ्या अंगांनी वाटा काढीत, सपाटीवरून धावताना दिसतात. या पाच भगिनींचे एकमेकींवरचे प्रेम मोठे अमर्याद. जन्माच्या ठिकाणी त्या आपले आगळे अस्तित्व दाखवतात. पण ते क्षणभरच. फुगडीचा फेर त्यांनी धरला आहे, असे दिसावे, तोच त्या एकजीव होऊन जातात आणि गोमुखातून बाहेर उडी घेतात. उडी घेताना यांतील कृष्णा कोणती, वेण्णा कोणती, कोयना कोणती किंवा भागीरथी, सरस्वती कोणती, हे ओळखता येत नाही; दिसते, ती एक धार. गोमुखातून ही स्वच्छ धार कुंडात उडी घेते आणि पुन्हा जमिनीच्या खालून वाटा काढीत पाच बाजूंनी पाच भगिनी निघून जातात. पुढे कुठे तरी मग डोंगरावरून खाली उडी घेताना दिसतात. भागीरथी आणि सरस्वती गुप्त मार्गाने वाहत राहूनच आपल्या मोठ्या बहिणीला रस्त्यात कोठे तरी भेटतात, अशी आख्यायिका आहे. परंतु एक गोष्ट मात्र खरी, उगमापासून काही मैलांच्या अंतरावरच पाचही भगिनींचा मिलाफ होतो आणि कराडपासून पुढे या सर्वजणी कृष्णामय बनूनच सागराला भेटायला जातात. जरा थोराड अंगाची कोयना कराडला आपल्या भगिनीला - कृष्णामाईला कडकडून भेटते. संगमावर मग आनंदाचा कल्लोळ होतो. या ठिकाणी पोचलेल्या या सर्व जणींचे पंचामृत मोठ्या पात्रात साठते आणि चविष्ट, सुगंधित बनून पांथस्थांची तहान शमविण्यासाठी पुढे आणि पुढेच, महाराष्ट्र ओलांडून आंध्रात पोहोचते. पाचही भगिनींचे सागराशी मग एकाच वेळी मीलन होऊन जाते.