इतिहासाचे एक पान. ८०

चव्हाण हे अधिका-यांच्या कामांत अकारण हस्तक्षेप करणारे मंत्री नव्हते. त्यांच्यावर विश्वासून काम करण्याची त्यांची पद्धत असे. परिणामीं अधिका-यांच्या ठिकाणीं त्यांच्यविषयी विश्वासाची भावना निर्माण झाली. चांगल्या कामाबद्दल शाबासकी देण्यासाठी त्यांनी कधी कुचराई केली नाही किंवा जरब बसावी म्हणून शिक्षा करण्याची घाईहि कधी केली नाही. परस्पर आदराचे संबंध यामुळे कायम राहिले. मंत्रिमंडळांतल्या अन्य सहका-यांशीहि त्यांनी आपले संबंध स्नेहपूर्ण असेच ठेवले. राजकारणांत सदा सर्वकाळ कठोर भूमिका लाभदायक ठरत नाही, त्याप्रमाणे शासकीय काम करतांना लोकांच्या अडीअडचणी, तक्रारी यांबाबत सतत नकारघंटा वाजवूनहि चालत नाही. एखाद्या कामाबद्दल नकार देण्यांतच कित्येक मंत्री किंवा अधिकारी आपला मोठेपणा मानतात. चव्हाणांचा स्वभाव असा की, आडमुठेपणांन आणि मोठेपणाच्या भलत्याच हव्यासानं ते चुकूनहि कडवटपणांनं कुणाशीं बोंलणार नाहीत किंवा तुसडेपणानं वागणार नाहीत. त्यांच्या या स्वभावामुळे आणि राज्यकारभारांतील चोखपणामुळे ते मोरारजींच्या विश्वासास पात्र ठरले आणि त्या दोघांमध्ये अधिक सलोखा निर्माण झाला.

या संदर्भांत भाऊसाहेब हिरे आणि चव्हाण यांच्यासंबंधी त्या काळामध्ये नकळत चर्चा सुरु राहिली. चव्हाण आणि हिरे यांचे स्वभाव अगदी विरुद्ध टोकाचे होते. हिरे यांचा स्वभाव कांहीसा संशयी आणि ताबडतोब मत बनवणारा, अफवांवर विश्वास ठेवणारा असा होता. हाताखालच्या लोकांच्या कामांत हस्तक्षेप करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे कामांत गोंधळ निर्माण होत असे. स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दल त्यांच्या कांही विशिष्ट कल्पना होत्या. त्यामुळे त्यांच्या वागणुकींतून लोकांची मनं दुखावली जात असत. मोरारजीचं या सर्वांकडे लक्ष होतं. त्यांच्या गुप्त यंत्रणेव्दारा हें सर्व त्यांच्यापर्यंत पोंचत असें. त्यामुळे त्या दोघांमधील अंतर सतत वाढत राहिलं. चव्हाणांची जवळीक आणि हिरे यांच्या संबंधांतील नाराजी यांबाबतहि मग कांही वावड्या उडूं लागल्या आणि हिरे यांच्या नेतृत्वाला कमीपणा आणण्याचा हा एक डाव आहे, असे आरोपहि केले जाऊं लागले. सत्यस्थिति वेगळीच होती. हिरे यांचं नेतृत्व वाढावं अशी ज्यांची भावना होती त्यांनी हिरे यांना सावरलं असतं किंवा त्यांच्या स्वभावांत बदल घडेल असा सल्ला दिला असता, तर ते पुढच्या काळांत नेते झालेहि असते. पण तसं न घडतां मोरारजी, चव्हाण यांना दोष चिकटवण्यांतच कांहीनी इतिकर्तव्यता मानली.

भाऊसाहेबांनी आपलं व्यक्तिमत्व राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या फार मोठं संपन्न बनललेलं नसलं तरी त्यांनी शिक्षणक्षेत्रांत केलेल्या मोठ्या कार्याची पुण्याई त्यांच्या पाठीशीं होती. बहुजन सामजातल्या गरिबांच्या मुलांना शिक्षणाचं क्षेत्र उपलब्ध करुन देण्यांचं कार्य ते प्रामाणिकपणें करत होते. राजकारणी मुत्सद्दी म्हणून लोकांसमोंर त्यांची प्रतिमा विशेषत्वानं उभी नव्हती आणि विवेकानं वर्तावं अशीहि त्यांची वागणूकहि घडत नव्हती. शत्रुत्वाचं कडं आपणच आपल्या कृतीनं स्वतःभोंवतीं उभं करावं असं त्यांच्या बाबतीत घडत राहिलं आणि याचा परिणाम पुढे नेता निवडण्याच्या वेळीं त्यांना अनुभवावा लागला.

मोरारजींचं मंत्रिमंडळ तसं संघटितपणें काम करत होतं. गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागांतल्या आमदारांमध्ये एकोपा नांदत होता. राज्याची सर्व बाजूंनी प्रगति होत राहिली होती. दोन तीन वर्ष राज्यकारभाराचा गाडा असा सुलळीत चालला असतांनाच भाषिक राज्य पुनर्रचनेचे वारे वाहूं लागले आणि फाजसअली-कमिशनचा त्या संबंधांतील अहवाल प्रसिद्ध झाला. १९५५ च्या आँक्टोबरमध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला आणि महाराष्ट्राची सारी घडीच पुढच्या काळांत विसकटली.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा हा प्रारंभकाळ ! १९५५ मध्ये फाजलअल्ली कमिशनचा अहवाल जाहीर झाला. तेव्हापासून तो पुढे संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्ष अस्तित्वांत येईपर्यंतच्या पांच सहा वर्षांच्या काळांत यशवंतरावांच्या कर्तृत्वाची, बुद्धिमत्तेची, मुत्सद्दीपणाची सर्वांगानं कसोटी लागून गेली. संशय, गैरसमज, विश्वासघात, मतलबी टीका, शह-काटशह इत्यादींचे घाव त्यांना अंगावर झेलावे लागले. या आंदोलनाच्या काळांत महाराष्ट्राला लाभसेसं नेतृत्व सर्व प्रकारच्या राजकीय कसोट्यांतून तावून सुलाखून निघालं.