इतिहासाचे एक पान.. २

पुरस्कार

ज्यांच्या जीवनाचा शोध घ्यावा, महत्ता अजमावण्याचा प्रयत्न करावा अशा, आधुनिक भारतांत निरनिराळ्या प्रदेशांत राष्ट्रीय जीवनांत वैशिष्ठ्यपूर्ण स्थान प्राप्त झालेल्या, अनेक व्यक्ति आहेत; त्यांपैकी कांही थोड्या व्यक्ति अशा आहेत की, त्यांच्या जीवनांत वर्तमान युगाचा गर्भितार्थ सूचित होतो; वर्तमान युगाच्या प्रेरणा, ध्येयवाद, स्थित्यंतरें आणि महत्त्वाच्या घडामोडी यांचा ध्वन्यर्थ उमटलेला असतो; अशा थोड्या व्यक्तींपैकीच यशवंतराव चव्हाण हे होत.

भारताची गेलीं दीडशे-दोनशे वर्षे हें एक महत्त्वाचें युग आहे. पूर्वीच्या अनेक शतकांच्या किंवा सहस्त्रकांच्या इतिहासापेक्षा भारतांत संपूर्णपणे वेगळ्या युगाचा उदय या दीडशे–दोनशे वर्षांत झालेला आहे. अस्तित्व किंवा जीवन हें नित्य परिवर्तनशील असतें. जग म्हणजे नित्य बदलणारें अस्तित्व. एका घटनेपाठीमागून दुसरी घटना होत जाणें, हेंच जीवनाचें स्वरूप असतें. ही गोष्ट वैयक्तिक जीवनाप्रमाणे सामाजिक वा राष्ट्रीय जीवनालाहि लागू आहे; परंतु एका घटनेपाठीमागून दुसरी घटना होणें म्हणजे इतिहास नव्हे. कांही विशिष्ट घटना किंवा विशिष्ट घटनांच्या मालिकाच इतिहास या संज्ञेस प्राप्त होतात. कांही घटना ऐतिहासिक महत्त्वाच्या असतात, कांही नसतात. समाजांत किंवा राष्ट्रांत गुणात्मक, अर्थपूर्ण वैशिष्ट्ययुक्त होणारा बदल म्हणजेच इतिहास होय. इतिहास घडतो, असें जे म्हणतात, तो अशा घटनांच्या मालिकांमुळेच.

या दृष्टीने या चरित्रविषयक पुस्तकाचे अभिधान ‘यशवंतराव – इतिहासाचें एक पान’ हें अत्यंत अर्थपूर्ण आहे, असें म्हणतां येतें. मात्र एक पान की अनेक पानें, हें भावी इतिहासच ठरवील. सर्वांगीण ऐतिहासिक परिवर्तनें हीं भारताच्या या दीडशे-दोनशे वर्षांच्या नव्या युगाचा गाभा आहे. त्यामुळेच हा कालखंड युग या संज्ञेसच प्राप्त होतो. निराळेच युगचैतन्य यांत क्रमाक्रमाने प्रगट होऊं लागलें आहें. हें युगचैतन्य चव्हाणांच्या जीवनयात्रेंत प्रतिबिंबित झालेलें दिसतें. हें प्रतिबिंब म्हणजे अत्यंत स्वच्छ बिलोरी आरशांतील परावर्तित झालेला प्रकाश आहे. हें केवळ प्रतिबिंब नाही. त्यांत कारकशक्तीहि आहे. प्रकाश, बिंब की प्रतिबिंब, कसाहि असो, त्यांत कारकशक्ति असते.