व्याख्यानमाला-१९८९-९

जोतिराव फुले काय अथवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय? या दोघांचे  विचार म्हणजे एकोणीस आणि विसाव्या शतकातील जणू हे दोघे दोन सूर्य आहेत. सामान्य माणसाला जीवनवादाचा प्रकाश देणारे हे दोघे प्रकाशयात्री आहेत. " ज्ञान म्हणजे प्रकाश असं बुद्धानी अडिच हजार वर्षापूर्वी सांगितलं होतं." फुले आणि आंबेडकरांनीही ज्ञानाचं अमोघ शस्त्र वापरल्याशिवाय शोषणापासून मुक्ती नाही हे  सांगितलं. ज्ञानाशिवाय इथलं माणूसपण वाढणार नाही. हा शोध त्यांच्या चळवळीचं मुख्य सूत्र होतं. नाहीतर आपल्या देशात काय परंपरा होती. बहुसंख्य लोकांनी अज्ञानाची परंपरा चालवायची संस्कृती निर्माण करणा-या सामान्य जनांनी संस्कृतीच्या लाभापासून दूर राहायचं हीच आमची परंपरा होती. तिला धर्माची बैठक होती. धर्माचा आधार होता. जातीसाठी माती खावी ही प्रवृत्ती होती. जाचक रुढी आणि दैववाद यांच्या साखळदंडात समाजाचे पाय बांधून ठेवलेले होते. सामान्य माणसाच्या कष्टातून निर्माण झालेल्या संस्कृतीवर मूठभर वर्गाची मांड घट्ट बसलेली होती. या वर्गाने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक भूईकोट निर्माण केले होते. आणि या जन्मजात तत्त्वावर आधारलेल्या भुईकोटाचे किल्लेदार स्वत:ला भूदेव म्हणून घेणारे लोक होते. या भूईकोटाच्या पायाखाली सामान्य माणूस गाडला गेलेला होता. त्यानेच निर्माण केलेल्या संस्कृतीपासून तो तोडला गेला होता. अगदी साध्या आणि सामान्य गरजेपासून तो मोडला गेला होता. अशा सामान्य माणसांच्या स्मशानावर आमची धार्मिक आणि सामाजिक विषमतेची संस्कृती उभी होती, वर्णवर्चस्व होतं सामाजिक विषमता होती. स्त्री दास्य होतं, आर्थिक अन्याय होता. सर्व त-हेची गुलामगिरी बहुसंख्य समाजावर लादलेली होती. सर्व त-हेचं आणि सर्व पातळीवरचं लोकांच हे शोषण होतं.

ब्राह्मणांच्या इशा-यावर  नाचणारी आमची देव संस्था गरिबांचा निवद खाप गप्पा होती. देव आणि दैववाद गरिबांच्या मानगटीवर बसवून हा पोटार्थीवर्ग सावलीत बसून तूप पोळी खात होता. सर्वसामान्य माणसाच्या शोषणाचा परिणाम मूठभर वर्गाचं स्वर्गीय सुख हेच होतं. जात आणि धर्माचे लोढणे सर्वसामान्यांच्या गळ्यात बांधून हा मूठभर वर्ग सांस्कृतिक मिरासदारीवर जगत होता. चातुर्वर्ण्याच्या पायावर उभ्या राहिलेल्या सामाजिक विषमतेला पहिला लढा बुद्धांनी दिला होता विषमतेमध्ये वाकल्या गेलेल्या समाजाला मोडून काढून समतावादी नवा-समाज निर्माण करण्याचं स्वप्न हे बुद्धांनी पाहिलं होतं. माणूस एकमूल्य आहे. हे ही बुद्धाना सांगीतलं. मी देव मानत नाही.  स्वर्ग नावाची गोष्ट अस्तित्वात नाही आणि ती सर्वज्ञ नाही. हे सांगत माणसाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी बुद्ध लढया. माणसाच्या स्वाभाविक समतेचा आग्रह बुद्धांनी धरला आणि ही सामाजिक विषमता माननिर्मित आहे. म्हणून ती संपवली पाहिजे असा पहिला हादरा-पहिला सुरुंग सामाजिक विषमतेच्या पायाशी बुद्धांनी लावला होता. " माणसाच्या सर्व प्रश्नांची मुळं त्याच्यातल्या अज्ञानामध्ये आहेत" हे ही बुद्धानं सांगीतलं होतं. भारतीय समाजाला जडवादी आणि मानवतावादी तत्त्वज्ञानाची परंपरा फार जुनी आहे. त्यात चार्वाकाचा विचार आहे, सांख्य तत्त्वज्ञान आहे. बुद्धाचं सामाजिक तत्त्वज्ञान आहे, त्याबद्दल आज मला काही बोलता येणार नाही. कारण तो विषय वेगळा आणि मोठा आहे. या सर्व वैचारिक पार्श्वभूमीवर जोतिराव फुले ज्ञानाच्या बाबतीत काय म्हणतात ते पाहिलं पाहिजे. जोतिराव फुले म्हणाले.

"विद्येविना मती गेली । मती विना नीति गेली
निति विना गती गेली । गती विना वित्त गेले.
वित्त विा शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले.

अगदी कमीत कमी शब्दात ज्ञानाच्या प्रकाशाची महत्ता आणि शूद्रांवर झालेल्या अनर्थाचं कारण त्यांनी अगदी अर्थपूर्ण पद्धतीने सांगीतलं आहे. ते पुढे म्हणतात.

"सर्वाचा निमित्त आहे एक धनी । त्याचे ऋण मनी धरा सर्व ।।"

शूद्र आणि अतिशूद्र समाजाच्या सर्वस्पर्शी शोषणाविरुद्ध आणि गुलामगिरी विरुद्ध घणाघाती हल्ला करणारा भारतातील पहिला क्रांतिकारक म्हणूनच जोतिराव फुले यांचे मूल्यमान करावं लागेल.