व्याख्यानमाला-१९८९-१०

सर्वसामान्य जनांना विद्येची संधी नाही. म्हणून त्यांचा बौद्धिक विकास होत नाही. बुद्धीचा विकास नाही म्हणून जीवनविषयक नीतीपासून ते दूर आहेत. म्हणून त्यांच्यात प्रगती नाही आणि गतीही नाही. सर्व सामान्य जनांच्या अधोगतीचं कारण एका अविद्येच्या तत्त्वामध्ये आहे. यावरुन मी जोतीराव फुले यांना Philosopher of the masses (रयतेचा तत्त्ववेत्ता ) असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

शिक्षणाच्या समान संधीच्या शिवाय पारंपारिक ग्रामीण समाजामध्ये परिवर्तन होऊ शकणार नाही. याची खात्री जोतिराव फुले यांना झालेली होती. शेतीवर जगणा-या समाजाला फक्त शेती संस्कृतीचं ज्ञान असते. शेतकरी माणस प्रत्यक्ष जीवनातील अनुभव, रोजचं निरीक्षण, अनुमान आणि अंदाज यातून मानवी जीवनाचं ज्ञान मिळवतात. शेतीवर जगणारा हा समाज जीवनाच्या प्रत्यक्ष संघर्षात असतो. शेती संस्कृतीत रममाण झालेल्या थोर कवयित्री बहिणाबाई अगदी सहज उत्स्फूर्तपणे तत्त्वज्ञान बोलून जातात.

"आला सास गेला सास । जीवा तुझ रे न्यारं तंतर ।।
जीवन मरण म्हणजे । दोन सासातील अंतर ।।

जीवनाविषयीचं प्रचंड आकलन झाल्याशिवाय अगदी सोप्या पद्धतीनं बोलणं कठीण आहे. बहिणाबाई एका कवितेत म्हणतात.

"सोन्या चांदीनं मढला मारवाड्याचा बालाजी ।
शेतक-याचा इठोबा पानाफुलांमंदी राजी ।।
आरे बालाजी इठोबा एक जर देव ।
गरीबीनं समरितीनं केला भेद भाव ।। "

मार्क्सचे एक पुस्तक न वाचणारी बहिणाबाई आमच्या समाजाच्या वर्गभेदावर नेमके बोट ठेऊन जाते. त्याचे कारण ग्रामीण संस्कृतीमध्ये ज्ञान आहेच. शिक्षणाचा अभाव असणा-या या समाजामध्ये व्यावहारिक शहाणपणातून आलेली निकोप अशी जीवनदृष्टी आहे. जोतिराव फुले यांना ग्रामीण समाजापर्यंत नवीन तंत्र आणि तंत्रज्ञान पोहोचवून परिवर्तन करायचं आहे. अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाला नव्या तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर ग्रामीण समाजात परिवर्तन होऊ शकेल ही त्यांची खात्री होती.

जोतिराव फुले रांगड्या ग्रामीण भाषेत त्यांचे सारे विचार मांडतात हे त्यांचे वैशिष्टय आहे. ज्या समाजात परिवर्तन हवं आहे. त्या समाजाचा परिवर्तनाचा विचार त्यांच्याच भाषेत त्यांना सांगितला पाहिजे, याची जाणीव त्यांना होती. यावेळी मला गौतमबुद्धांनी बौद्ध भिखू महासंघाला सांगितलेल्या विचाराची आठवण होते. बुद्ध म्हणाला.

"तुम्ही तुमचे विचार लोकांच्याच भाषेत सांगत चला"

जोतिरावांनी आपले सारे विचार लोकांच्याच भाषेत सांगितलेले आहेत. भाषा विचाराचे कसोटीवर त्यांचे विचार श्रेष्ठ आहेत. दलित वाड्मय श्रेष्ठ कां आहे.  कारण ते आपल्या स्वत:च्या भाषेत बोलते म्हणून. नाहीतर आमच्याकडे काय पद्धती

" जे जे आपणासी ठावे । ते ते संस्कृतात लपवावे ।। अज्ञानी करुन सोडावे । बहुजन ।। ' 'ही आमची पद्धत होती. इंग्रज आल्यानंतर ते ही बदललं' 'जे जे आपणासी ठावे । ते ते इंग्रजीत लपवावे ।। लोकापासून ज्ञान दूर ठेवावे  । लोक  शाही ही ।। अशी एक बाजूला संस्कृत भाषा आमच्या डोक्यावर होती. आणि डोक्यात फक्त अज्ञान होतं ती देवाची भाषा होती, आणि वेद हे अपौरुप होते.  त्यामुळे भारतीय समाजजीवनांत वैचारिक क्रांतीच्या सा-या वाटा अशा रीतीनं बंद करुन टाकल्या होत्या. सत्त्याण्णव टक्के रयत अज्ञानाच्या काळोखात पशुतुल्य पातळीवर तडफडत होती. शोषण, शोषण हेच तिचं जीवन झालं होतं.