व्याख्यानमाला-१९८९-६

"अजून देशातल्या सगळ्या रयतेला कोंडयाची भाकरी मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. असं सांगणारा हा राजा लोकांना सुखी करून मी स्वत:हून पेन्शन घेईन असा ठणकावणारा राजा आज कुठे दिसत नाही. उपाशी लोकांना कोंड्याच्या भाकरीची सोय करण्याअगोदर आज दहांच्या पोळीवर साजूक तूप वाढा असा ओरडा करणा-यांना रयतेची कळकळ कितपत आहे हे उघड आहे" असे सांगणारे शाहू महाराज भारतीय लोकशाही येण्याच्या कितीतरी वर्षे अगोदर ठणकावून सांगत होते." राजवैभव थोर असो, पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता  त्या वैभवाहूनही थोर आहे " हे राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातलं मुख्य सूत्र होय. भारताच पाचशेच्यावर राजेलोक होते. पण लोकांचा राजा म्हणून शाहू-महाराजांचाच उल्लेख करावा लागतो. "ज्या सनदा मी महार-मांग-चांभार इत्यादि लोकांना दिल्या. त्याच जर ब्राह्मण, कायस्थ, सारस्वत अशा लोकांना दिल्या असत्या तर काहीच गवगवा झाला नसता व तशा दिल्या तेव्हा झालाही नाही. मॅट्रिक पास झालेले व इंग्रजी चांगले शिकलेले महार-मांग यास वरिष्ठ दर्जाच्या धंद्यात आणताच ब्राह्मणी समाज खवळून गेला." असं प्रतिपादन शाहू महाराजांनी नागपूर येथे भरलेल्या बहिष्कृत समाजाच्या परिषदेच्या अध्यक्षपदावरुन बोलतांना केले होते.

अस्पृश्यता निवारण, मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, विद्यार्थी वसतीगृहांची व्यवस्था, गंगाराम कांवळे या अस्पृश्य व्यक्तिला काढून दिलेले हॉटेल, धरणे बांधून हरितक्रांतीचा केलेला आरंभ, राज्यकारभारात कामगारांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून रशियन राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमिवर कामगार संघटना काढण्यासाठी कामगारांना त्यांनी दिलेली प्रेरणा, दत्तोबा पोवार या पहिल्या अस्पृश्य व्यक्तीस कोल्हापूर नगरपालिकेचे अध्यक्षपद, ज्ञानोबा घोलप या अस्पृश्य समाजातील व्यक्तीस मुंबई असेंब्लीत प्रतिनिधीत्व, मल्ल विद्येला दिलेले उत्तेजन, चित्र-संगीत-ललितकलांना आणि कलावंताना दिलेला आश्रय, रंगभूमिच्या विकासासाठी केलेले प्रयत्न ही सर्व कार्ये पाहाता राजर्षी शाहू महाराज समग्रकांतीचे पुरस्कर्ते होते.

राजर्षी शाहू महाराजानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीच्या चळवळीला अधिक मूलगामी सर्वव्यापी अन् खोलवर रुजविण्याचा प्रयत्न केला. दलितांच्या मुक्तीचा खरा मार्ग त्यांनी दाखविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजात आत्मतेज, आत्मविश्वास आणि स्वाभिमान व माणुसकीचे नवचैतत्य निर्माण केले.

बुद्धकालापासून तो फुले पूर्वकालापर्यंत शूद्र-अतिशूद्र, अस्पृश्य आणि स्त्रिया यांच्या अमानुष गुलामगिरी बद्दल बंड करणारे कोणी थोर पुरुष झालेच नव्हते. बुद्धाने जाती संस्थेला पहिला हादरा दिला होता. ब्राह्मणांनी बुद्धी प्रामाण्यवाद गाडून वेद प्रामाण्यवाद केवळ आपल्या पोटाचे साधन म्हणून निर्माण केला होता. संतांनी सुद्धा आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्यापुरतीच हालचाल केली होती. इतर माणसाप्रमाणेच माणूस असलेला ब्राह्मण श्रेष्ठ कां ईशरभक्त श्रेष्ठ असा जो लढा होता. ब्राह्मण श्रेष्ठ ही शूद्र माणूस श्रेष्ठ हा प्रश्न मुळातून सोडविण्याच्या भरीरस साधुसंत पडले नव्हते. ब्राह्मण आणि ईश्वरभक्तांच्या लढ्यात साधूसंतांचा जर जरूर झाला. आणि भक्ताचे श्रेष्ठत्व ब्राह्मणाला मान्य करावे लागले. रामदासा सारख्या संतांनी देखिल ब्राह्मण धर्म, वर्णवर्चस्व आणि ब्राह्मण जातीची महती गाण्यातच आपली सारी ह्यात घालविली.

"गुरु तो सकळांसी ब्राह्मण । जरी तो झाला क्रियाहीन ।।
तरी तयासीच शरण । अनन्यभावे असावे ।।
ब्राह्मण वेद मूर्तिमंत । ब्राह्मण तोची भगवंत ।।
पूर्ण होती मनोरथ । विप्रवाक्ये करुनी ।।
असो ब्राह्मणा सुरवर वंदिती । तेथे मानव बापुडे किती ।।
जरी ब्राह्मण मूढमति । तरी तो जगद्वंध ।।
अंत्येज शद्बज्ञाता बरवा । परी तो नेऊन काय करावा ।।
ब्राह्मणासन्निध पुजावा । हे तो न घडे की ।।"

ज्ञानेश्वर स्वत:ला जातिभेद न मानाणा-या नाथपंथाचे अनुयायी होते. त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीच्या बाजूने प्रस्थापिताविरुद्ध बंड केले आणि शंकराचार्याप्रमाणेच वर्णाश्रमधर्म सावरुन धरला.