व्याख्यानमाला-१९८९-१३

भारतीय समाज व्यवस्थेसंबंधीचं त्याचं आकलन अचूक आहे. सामाजिक विषमतेनं बरबटलेली हजारो जाती जमातीमध्ये वाटलेली, श्रेष्ठत्व आणि कनिष्टत्वाच्या भावनेवर तरलेली सामाजिक, सांस्कृतिक अन्यायानी जिचा पाया पक्का आहे त्या जन्मतत्त्वाचं मूळ शोधणा-या व्यवस्थेसंबंधीचं अचूक असं भान त्यांच्या विवेचनामध्ये आहे. त्यांच्या मताशी शंभर टक्के कोणी सहमत होईल न होईल हा प्रश्न नाही त्यांनी समाज व्यवस्थेसंबंधीचा नीटपणे विचार केला होता. मुळात जाऊन भारतीय समाजव्यवस्था तपासली होती. हा जो अस्तित्वात असलेला समाज आहे. तो अन्याय आणि शोषणावर आधारीत आहे. म्हणून हा समाज आम्हाला नको आहे, हे सांगतांना जोतिरावांनी नवा समाज कसा असेल या संबंधीचं चित्रही आपल्या मानवतावादी विचारांतून स्पष्ट केलं. समाजाची पुनरचना झाली पाहिजे. हा त्यांचा आग्रह होता. शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे निव्वळ पशुतुल्य जीवन होय, हे त्यांचं मत होतं. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे बहुसंख्य लोकांचं पारतंत्र्यच होय, असा त्यांचा विचार होता. ज्ञानाशिवाय मुक्ती नाही आणि मुक्तीशिवाय स्त्रीत्वाला अर्थ नाही आणि त्यासाठी स्त्रीशिक्षणाशिवाय पर्याय नाही अशी त्यांची धारणा होती. ज्या समाजव्यवस्थेचा पाया सामाजिक समता आहे तोच चांगला समाज होय. ज्ञानाचं स्वातंत्र्य हीच त्या समाज जीवनाकडे यायची पाऊलवाट आहे. यावर त्यांचा विश्वास होता. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कुणाचीच मक्तेदारी नको म्हणून त्यांनी ज्ञानाच्या मक्तेदारावर वैचारिक तोफा डागल्या आणि ज्ञानावर जगणारा नवा समाज निर्माण करणं यातच त्यांनी आपलं जीवनध्येय मानलं. कारण ज्ञानावर जगणारा समाज निर्माण केल्याशिवाय स्वातंत्र्यावर जगणारा समाज निर्माण होत नाही याचं त्यांना भान होतं. ज्ञान हे मूर्तिपूजेपेक्षा श्रेष्ठ आहे हा जोतिराव फुले यांच्या शैक्षणिक विचाराचा प्राण होता.

जोतिराव फुल्यांनी धर्मग्रंथावर टिका केली. नवमानवतावादावर आधारित समाजरचना हवी हा आग्रह धऱला. आणि आपले ध्येय गाठण्यासाठी सत्यशोधक समाज ही संघटना  उभी केली. या तिन्ही गोष्टी जोतिराव  फुल्यांनी धर्मग्रंथावर टीका केली. नवमानवतावादावर आधारित समाजरचना हवी हा आग्रह धरला. आणि आपले ध्येय गाठण्यासाठी सत्यशोधक समाज ही संघटना उभी केली. या तिन्ही गोष्टी जोतिराव फुल्यांनी केल्या. भारतीय समाजाचं व्यवस्थित आकलन करुन घेतलं. तिच्यासंबंधीच्या टीका-टीपणी तयार केल्या. गुलामगिरी हा ग्रंथ जर पाहिला तर भारतातील स्त्रिया आणि बहुसंख्य दलित आदिवासी समाजाचा तो स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. तो जर मुळातून आपण वाचला. त्यातील नवमानवतावादाचा, मानवी मुक्तीचा, शोषण मुक्तीचा आशय गाळून बोलता येत नाही. भाषा रांगडी आहे, नांगरी आहे. ती तर नेहमी म्हणतो, प्रत्येकाने आपल्या आईबापाच्या भाषेच बोललं पाहिजे. संस्कृती या शब्दाची फोड जोतिराव फुल्यांनी अशी केली, जी सर्वकृत असते ती संस्कृती होय. जगातील प्रत्येक भाषा लोक निर्माण करतात. आणि आम्ही साहित्यिक मग तिला थोडीशी झळाळी देऊन, कलाकुसर करुन, रंगरंगोटी करुन तिला आम्ही ग्रंथिक भाषा बनवितो. 'गुलामगिरी' हा स्त्रियांचा , दलितांचा आदिवासींचा, काम करणा-या माणसांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. त्यांनी संबंध व्यवस्थेची चिरफाड केली की तुमचे वेद, तुमच्या श्रुती, स्मृती या कशा लबाड आहेत. भटशाही  गुलामगिरीच्या पडद्याआड आणि सुधारलेल्या इंग्रजी राज्यात कशी चालू आहे. या संबंधीचा एक विध्वंसक विचार, बंडखोरीला लागणारी सगळी वैशिष्टये गुलामगिरीमध्ये पडद्याआड आणि सुधारलेल्या इंग्रजी राज्यात कशी चालू आहे. या संबंधीचा एक विध्वंसक विचार, बंडखोरीला लागणारी सगळी वैशिष्ठये गुलामगिरीमध्ये आहेत. जोतिराव फुले फक्त उदारमतवादी नव्हते, ते समग्र क्रांतीवादी होते. याच व्यासपीठावर आमचे स्नेही माजी आमदार कै. पी. बी. साळुंखे यांनी फार सुंदर विवेचन केलेलं आहे. १८१८ ला पेशवाई बुडाली आणि नातूंच्या हस्ते युनियन जॅक शनिवारवाड्यावर चढविण्यात आला. १६०१ ला पहिलं पुस्तक प्रकाशित झालं ते ख्रिश्चन धर्मावर आधारित पुस्तक आहे. आणि १६०१ ला ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. १८३२ ला मराठीतील पहिलं वर्तमानपत्र 'दर्पण' निघालं १८३७ ला 'दिग्दर्शन' निघालं बाळशास्त्री जांभेकरांनी ते काढलं. मराठीतील ते पहिलं वर्तमानपत्र होय.

बाळशास्त्री जांभेकरांनी हिंदू समाजातील आणि धर्मातील उणीवांच्यावर नेमके  बोट ठेवले. विशेषत: स्त्रियांच्यावर होणारे अत्याचार ही हिंदूधर्मातील मूल्यांची झालेली लक्तरं होती. स्त्री-शूद्रांच्या शिक्षणाची सुधारलेल्या इंग्रजी राज्यातही परवड होत आहे. हे जोतिराव फुले यांच्या प्रमाणेच जांभेकरांना पटले होते. स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे या जोतिराव फुले यांच्या विचारांशी त्यांचं साधर्म्य होतं. 'गुरुणांमाता गरीयेशी' या वचनाची थोरवी फुले प्रमाणेच त्यांना पटली होती. म्हणूनच त्यांनी बाल विवाहाला विरोध, विधवा विवाहाचा पुरस्कार, संमती विवाहाचा आग्रह इत्यादि बाबींचा हिरीरीने पुरस्कार केला .