व्याख्यानमाला-१९८९-४

यशवंतराव चव्हाण ही व्याख्यानमाला मी गेल्या ६-७ वर्षापासून तिच्यासंबंधी वाचतोय, ऐकतोय. ही व्याख्यानमाला केवळ व्याख्याने घडवून आणत नाही तर या व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर जे विचार मांडले जातात त्या विचारांचे संकलन करुन एक पुस्तक सुद्धा आपण काढता आहात आणि या व्याख्यानमालेत जे सहभागी असे श्रोते होऊ शकले नाहीत. जे आमच्या सारखे सर्वदूर असलेल्या रसिकांच्या हातात ते पुस्तक आपण देत आहात. पाटील साहेब आपण हे फार मोठं चांगलं काम करता आहात. प्रबोधनाचं हे काम आहे. तुमचं राजकारण तुमच्या राजकारणाच्या अंगानं चालत राहील, पण राजकारणाच्या धकाधकीत राहूनसुद्धा तुम्ही ही जी समाजाची विवेकबुद्धी वाढविण्याचे काम करता आहात ते मला फार मोलाचं वाटतं आणि ते तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या नांवानं करता ते फार मोलाचं आहे. यशवंतरावजी आज आपल्यात नाहीत, पण त्यांचा वैचारिक वारसा, त्यांचे अनेक विषयावरचे चौफेर विचार यशवंतरावांचा प्रत्येक प्रश्नासंबंधीचा स्वत:चा विचार  होता. तळातल्या माणसांच्या प्रश्नांची त्याना समज होती. त्यांची स्वत:ची त्या प्रश्नाकडे बघण्याची दृष्टि होती. माझं दुर्दैव असं आहे की मी त्यांच्या सहवासात फार उशीरा आलो तो वयाचाही भाग आहे. पण यशवंतराव गेल्यानंतर आज आम्हाला असं वाटतं की ज्यांच्याकडे अपेक्षेने बघावे, आशेने बघावे, वडीलकीच्या आधाराने बघावं असा माणूस महाराष्ट्रात दिसत नाही. आता वसंतरावदादाही गेलेले आहेत.

मी सातारा जिल्ह्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा हा जिल्हा कर्तृत्वशाली माणसांची एक मोठी खाणच वाटतो, क्रांतिसिह नाना पाटील यांचे नाव माझ्यासमोर येतं. आण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील या जिल्ह्यामध्ये, जोतिराव फुले या जिल्ह्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचे माहेर या जिल्ह्यामध्ये, वसंतदादा पाटील जुन्या सातारा जिल्ह्यातले, बाबासाहेब देसाई या जिल्ह्यातले, यशवंतराव चव्हाण या जिल्ह्यातले. किती मोठी आणखीन नांवे विसरली असतील. अशी एक मालिकाच आहे. महाराष्ट्राचा 'रोल ऑफ ऑनर' या जिल्ह्याने दिलेला आहे. आणि म्हणून या जिल्ह्यातलं जे कर्तृत्व आहे, वक्तृत्व आहे, कला-साहित्य-संगीत जे सगळं हे या जिल्ह्यानं महाराष्ट्राला दिलंय. आणि त्या रसिक माणसाच्या समोर तुमच्या सारख्या जाणत्या मंडळीसमोर एक माझ्यासारखा तरुण माणूस या विषयाकडे जो पाहतो आहे स्वत:च्या कुवतीने, स्वत:च्या विचाराने पाहातो. यासाठी पाहतोय की या चळवळीमुळं मी तुमच्यासमोर इंथ उभा आहे.

जोतिराव फुले नसते तर आंबेडकरांचा विचार फार जोरात पुढे आला असता की नाही मला ठाऊक नाही, जोतिराव फुल्यांना डॉ. आंबेडकरांनी आपला गुरु मानलेलं आहे. जोतिराव फुले डॉ. आंबेडकर यांचा संबंध विचार उचलून धरला कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराजांनी आणि राजदंड हा केवळ भूषण नाही तर ते सेवेचे साधन आहे, तो केवळ मानदंड नाही, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे एक प्रभावी हत्यार आहे. म्हणून हा लोकांचा राजा राजवाड्यातून महारवाड्यात गेला, मांगवाड्यात गेला, झोपड्यात गेला, त्यांच्या सोबत कांदाभाकर खात होता. मग ही चळवळ अशी पुढे पुढे येत कर्मवीर भाऊराव पाटील पुढे येतात. कर्मवीर भाऊराव पाटील संबंध महाराष्ट्राला सांगतात की नांगर आणि लेखणीचा संबंध मला जोडायला आहे. नांगराच्या सोबत मला लेखणी आणायची आहे. जो पर्यंत नांगर हाकणा-या माणसाकडे आम्ही कोणत्या भूमिकेने पाहात होतो, दोन बैलं आणि त्याच्या पाठीमागे नांगर हांकणारा तिसरा बैल म्हणून. निरक्षर अडाणी, अनपढ असा माणूस म्हणून. आमच्या डायनिंग टेबलावरल्या स्टेनलेसस्टीलच्या ताटामध्ये जी गरमगरम पोळी येऊन पडते, ते तूप येऊन पडते, त्या त्या अन्नाला तो निर्माण करतो. त्या निर्माण होणा-या अन्नाला त्याच्या घामाचा वास असतो हे आम्हाला कळायला सुद्धा साहित्यच वाचावं लागतं. विचारच ऐकावे लागतात. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सांगितल की माझ्या दाढीच्या केसात जेवढे केस आहेत तेवढे मी ग्रॅज्युएट उभे करीन महाराष्ट्रान. महाराष्ट्राच्या काळयाशार शेतामध्ये नांगराच्या पाठीमागे मी एक पदवीधर उभा करेन, मुलांना ते सांगू लागले मुलांनो "स्वावलंबनातूनच उद्धार आणि तेच शिक्षण असते." गिट्टी फोडा हाच तुमचा उद्याचा डॉलर आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, सयाजीराव महाराज पुढे येतात. पंजाबराव देशमुख पुढे येतात आणि संबंध महाराष्ट्र असा ढवळून निघतो.