व्याख्यानमाला-१९८०-५६

म्हणून मी म्हणतो की, एक सामाजिक सुधारणेचे काम म्हणून आपल्यापैकी काही लोकांनी ह्या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे. हे काम मी स्वखुशीने स्वीकारले होते. पण दुदैवाने आमदार झालो आणि सगळं विसरून गेलो. नाहीतर हा उद्योग करायचा, या व्यवसायाबद्दल लोकांमध्ये जागृती करायची, म्हैस न पाळता गाय का पाळायची, याची गावोगाव फिरून व्याख्याने द्यायची खेड्यामध्ये जाऊन बसायचे, चार शेतकरी भोवती बोलवावयाचे व त्यांना समजूतदारपणे या व्यवसायाकडे वळवायचे असे मी ठरविले होते. पण सगळ्याच गोष्टी ठरविल्याप्रमाणे होतात असे, नाही आणि नेमके माझ्या बाबतीत तसे घडले आहे, परंतु या व्यवसायाकडे जाणीवपूर्वक पहाण्याची जबाबदारी समाजातल्या काही शहाण्या माणसांनी, जाणत्या माणसांनी, ज्यांना आपला समाज सुधारला पाहिजे, त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे असे वाटते; त्याने हे काम करण्याची व्रतस्थ म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची फार मोठी गरज आहे. आज आमचे जे सुशिक्षित तरुण, बेकारीची लेबले लावून नोकरीसाठी गावोगाव फिरतात, नामोहरण होतात, बिचा-यांचे वय निघून जात आहे, त्यांना समर्थ बनविण्याचा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा, एक नवा व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे त्यांना वळविण्याची गरज आहे. मला वाटते या प्रश्नावर आणखी खूप बोलता येण्यासारके आहे. परंतु मी कारणापुरते बोललो आहे. या व्यवसायाची आवश्यकता, त्याचे फायदे, आणि तोटे या व्यवसायाची आजची स्थिती या संदर्भात माझी मते, मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

हा व्यवसाय खचलेल्या नामोहरण झालेल्या शेतकरी समाजाला माणूस म्हणून समर्थपणे जगावयाला एक साधन बनेल, असा माझ्या सारख्याचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून विश्वास आहे. म्हणून हे काम कोठेतरी चांगल्या माणसांनीच एखादे गाव, एखादा मोहल्ला, एखादी आळी, गल्ली वाटून घेऊन, किंवा पाच पंचवीस तरुणांचे गट घेऊन एक सामाजिक कार्य, राष्ट्रीय कार्य म्हणून त्या कामाला वाहून घेतले पाहिजे. असे वाहून घेण्याचा जर प्रयत्न झाला तर मला खात्री आहे की, महाराष्ट्रातला हा एक चांगला व्यवसाय म्हणून त्याला मान्यता प्राप्त होईल हजारो तरुणांना आधार देणारा व्यवसाय मिळेल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की, त्यामुळे उत्पादन वाढले व उत्पादनाबरोबर लोकांची गरज सुद्धा वाढेल. आज गरिबांच्या घरामध्ये अजूनही दूध खाण्याची, दूध पिण्याची किंवा लहान मुलांना दूध देण्याची सवय गरिबीमुळे नष्ट झालेली आहे. जे लोक बेकारीच्या रेषेखालील जीवन जगतात त्यांच्या घरामधले दूध खाण्याचे प्रमाण नाममात्र आहे. दूध मिळते म्हटल्यानंतर ग्राहक ते घ्यायला तयार होतो. पूर्वी आपण कोठे आइस्क्रीम कात होतो, कुठे थॉमसन सिडलेस द्राक्षे खात होतो, पूर्वीची कोणती ती जात-भोकरी की काय? कदाचित आमच्या लहानपणी आम्ही खाल्ली. पण आता मिळतात म्हणून सर्रास थॉमसनच खातात. पूर्वी गावामध्ये सिनेमा पहाणारी किती माणसे होती? पण जवळ सिनेमाची टॉकिज आल्यानंतर आपण पहातोच की नाही! त्यांनाही गि-हाईक मिळते. तसेच या दूध धंद्याचेही आहे. हा धंदा चैनीचा म्हणून नाही, तर माणसाच्या जीवनामध्ये ते पूर्ण अन्न म्हणून खाण्याची सवय वाढविली पाहिजे. माणसाच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी, सतेज मनोवृत्तीसाठी त्याला जेवढे चांगले घटक असलेले दूध मिळेल तेवढे फायदेशीर आहे. ते इतर कोणत्याही अन्नामधून, कृत्रिम किंवा नॅचरल अन्नामधून मिळणार नाही. म्हणून दुधाचा वापर अधिकातअधिक वाढविला पाहिजे. समाजातल्या सामान्य माणसापर्यंत एक पूरक अन्न म्हणून दूध जेव्हा पोहोचेल, तेव्हा शारीरिक दृष्ट्या संपत्ता अशी नवी पिढी, आरोग्यदायक पिढी निर्माण व्हायला मदत होईल. निरोगी मनाची, निकोप मनाची तरुण पिढी स्वतःबरोबरसमाजाचे आणि राष्ट्राचे भवितव्य उज्वल केल्याशिवाय रहाणार नाही.

मला वाटते यापेक्षा ज्यास्तवेळ बोलून आपला वेळ घेणे काही उचित होणार नाही. आपल्या अध्यक्षांनी मला मोठ्या प्रेमाने येथे बोलाविले आणि माझे आपले जे बनलेले विचार, अनुभव होते ते मांडण्याची आपल्यासमोर सांगण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार, मी अपेक्षा करतो की यातल्या काही लोकांनी जरी मनावर घेतले, आणि या कार्याचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी काही मित्रांनी वाहून घेतले तर त्यातून टक्काअर्धा टक्का का होईना मी येथे येण्याचे सार्थक झाले असे मी मानीन. यापेक्षा जास्त काही न बोलता आपल्या अध्यक्षांचे, उपाध्यक्षांचे आमि जमलेल्या सर्व बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो आणि माझे चार शब्द पुरे करतो.

जयहिंद.