व्याख्यानमाला-१९७९-६

एखादी मुलगी बालविधवा म्हणून घरात राहिली तर तिला काडीची किंमत नसे. घरातील सांदी कोप-यात तिला स्थान असे त्यातून पुढारलेल्या ब्राम्हण समाजमध्ये तिचे केशवपन करुन अधिकच विटंबना करीत असत. बाकीच्या समाजामध्ये केशवपन करण्याची पद्धत नव्हती. तरी ब्राह्मण समाजातील विधवांप्रमाणेंच त्या समाजातील विधवांच्या हाल अपेष्टा होत असत. कारण पुनर्विवाह हा धर्मंबाह्य होता. अशा स्थितीत पुनर्विवाहाची चळवळ जोरात सुरु करावी, बाल विवाहाला प्रतिबंध करावा, जरठकुमारी विवाहाला आळा घालावा. या दृष्टीने महाराष्ट्रातले पहिले-वहिले जे सुधारक होते त्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे प्रयत्न करायला सुरवात केली. या सुधारकांच्यामध्ये दोन प्रकारची मंडळी होती. एक विचारवंत आणि दुसरे कर्ते सुधारक. विचारवंत म्हणजे आपले विचार प्रत्यक्षपणे त्याला अंमलात आणता आले नाहीत तरी ते कोठे ना कोठे तरी आणि केव्हा ना केव्हातरी रुजल्याशिवाय रहात नाहीत. कम्युनिझमचा आद्य पुरस्कर्ता कार्लमार्क्स यांने १८४८ साली, 'जगातील कामगारांनो एक व्हा' अशा प्रकारची घोषणा दिली आणि वर्गकलहाचं एक नवीन तत्त्वज्ञान शोधन काढलं. 'वर्गकलहाचं' व 'विरोध विकासवाद' या नावाचे एक नवीन त्त्वज्ञान शोधून काढले. हे तत्त्वज्ञान अंमलात आणण्यासाठी कार्ल-मार्क्स कोठे चळवळ करण्यास किंवा क्रांती करायला गेला नाही. इंग्लंडच्या ग्रंथालयात बसून त्याने आपल्या 'कॅपिटाल' या ग्रंथामध्ये वरील विचार व्यक्त केले आहेत. त्याने आपले हे हवेत फेकलेले विचार होते. ते विचार लेनिन आणि स्टॅलिन यांनी आत्मसात करुन १९९८ साली रशियामध्ये राज्यक्रांती केली व कामगारांचे राज्य स्थापन केले. म्हणून नुसत्या विचारवंतांचे सुद्धा समाजात महत्त्व असते. परंतु विचारवंत तेच विचार आचरणात आणत असेल तर अधिकस्य अधिकम् फलम् ।

मी आपल्याला सांगितले की बाळशास्त्री जांभेकरांनी 'दर्पण' नावाचं पाक्षिक त्यानंतर त्यांनी 'दिगदर्शन' नावाचं एक मासिक काढलं. या मासिकात व पाक्षिकात त्यांनी सुधारणाविषयक लेख लिहायला सुरुवात केली. त्यांना त्यांच्या या कार्यात भाऊ महाजन हे मदत करीत असत.

बाळशास्त्री जांभेकरांचे जीवनामध्ये एक प्रसंग असा आला होता की श्रीपाद शेषाद्री या नावाचा हैद्राबाद येथील देशस्थ ब्राह्मणसमाजातील एक मुगला बाटून त्याने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. त्यावेळी बाळशास्त्री जांभेकरांनी पुढे होऊन इतर लोकांचा विरोध असताना त्याला हिंदू करुन घेतला. मी आधीच सांगितल्याप्रमाणे, शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर यांना हिदू करून घेतले. त्याच प्रमाणे त्या नंतर ख्रिश्चन धर्मातून हिंदूधर्मात एक बाटलेल्या मुलास आणण्याचे पहिले कार्य हे बाळशास्त्री जांभेकरांनी केले. आजच्या काळात ही गोष्ट आपल्याला तितकीशी महत्त्वाची वाटत नाही. परंतु १८४० च्या सुमारास त्यांनी हे घडवून आणलेले धर्मांतर सनातन्यांच्या विरोधाला न जमानता फार मोठ्या धैर्याने केले. सनातनी मंडळी या मुळे जांभेकरांच्यावर चिडून होती. त्यांनी त्यांना शिव्या-शाप द्यायला सुरुवात केली. सनातनी मंडळीच्या सुदैवाने आणि बाळशास्त्रींच्या दुर्देवाने बाळशास्त्री हे वयाच्या ३४ व्या वर्षीच १८४६ साली निधन पावले आणि मग सनातन्यांनी एक गिल्ला करायला सुरुवात केली की बाळशास्त्री आमच्याच शापामुळे मेला.

बाळशास्त्र्या प्रमाणेच बाकीची मंडळीही आपापल्या परीने सुधारणा करण्यात मग्न होती. मराठीचे पहिलें व्याकरणकार ज्यांना गौरवाने मराठीचे पाणिनी असे म्हटले जाते ते दादोबा पांडुरंग त्यांनी मानवजाती समानताधर्म या नावाची संस्था काढली व निरनिराळ्या जाती जमातींचे लोक निरनिराळ्या धर्मांचे लोक एकत्र बोलावून मनुष्य तेवढा एक मानून धर्मांची आणि जातींची बंधने झुगारुन देऊन सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी या संस्थेच्या नेतृत्वाखाली केला. परमहंससभा नावाची दुसरी एक संस्था त्यांनी काढली. त्यावेळी जी सुशिक्षित आणि समंजस मंडळी होती त्यांना एकत्रित आणून जातिभेदातील अशी सामाजिक चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला. ही सर्व मंडळी एके ठिकाणी जमत आणि बटलरच्या हातचा चहा आणि पाव खावयाचा असा त्यांचा उपक्रम असे. ख्रिशन माणसाच्या हातचा पाव खाणे ही त्या वेळी फार मोठी सुधारणा समजली जात होती. परंतू ही गुप्त गोष्ट एकदा चव्हाट्यावर आली आणि वर्तमानपत्रांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यामुळे यातील काही मंडळींचा धीर गळाला. त्यानंतर दादोबा पांडुरंग यांनी न्या. रानडे, डॉ. भांडारकर वगैरे मडळींच्या सहकार्याने प्रार्थना समाजाची स्थापना करुन समाज सुधारणा करण्याचे प्रयत्न चालविले प्राथमिक शिक्षण देण्याच्या बाबतीत त्यानी प्रयत्न चालू केले. मुंबईला १८२० साली जगन्नाथ शंकर शेट यांच्या प्रयत्नाने प्राथमिक शाळा स्थापन झाली. आपल्या या सातारा जिल्ह्यामध्ये सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी १८३० साली मुलींच्यासाठी शाळा काढली होती. मुलींना शिकविण्यासाठी शिक्षक मिळत नव्हता म्हणून त्यांनी एक ख्रिश्चन मिशन-याला शिक्षक नेमले. मुलींनाही शाळेत पाठविण्यास कोणी पालक धजत नव्हते. म्हणून महाराजांनी आपल्या घरापासून सुरुवात केली व आपल्या सख्या बहिणीला त्या शाळेत पाठविल्यानंतर हळूहळू मुली जमा होऊ लागल्या. अशा प्रकारचे प्रयत्न ठिकठिकाणी चालू होते आणि समाजाकडून त्यांना तीव्र विरोधही होत होता.