व्याख्यानमाला-१९७९-८

विधवा विवाह शास्त्रसंमत आहे की नाही या संबंधी निवाडा देण्यासाठी सनातनी आणि सुधारक यांच्या मध्ये बोलणी होऊन एक लवादमंडळ नेमण्याचे ठरले. या मंडळामध्ये विधवा विवाह शास्त्र समंत आहे असे म्हणणारी पाच मंडळी, विधवा विवाह शास्त्र समंत नाही असे म्हणणारी पाच मंडळी आणि या दोघांच्या मान्यतेने एक अध्यक्ष. अशा प्रकारचं एक अकरा जणांचं लवादमंडळ नेमण्यात आले. पुण्याला दोहोंपक्षाकडून युक्तिवाद करुन अखेर कोण जिंकेल त्या प्रमाणे वागायचे असे ठरविले. विष्णुशास्त्री पंडित हे विधवा विवाह शास्त्रसंमत आहे असे म्हणणा-या पक्षाचे नेतृत्त्व करीत होते व नारायणाचार्य गजेंद्रगडकर विधवा विवाह शास्त्रसमंत नाही अशा पक्षाचे नेतृत्व करीत होते. लवाद मंडळाचे अध्यक्ष म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे वडिल यांची नेमणूक झालेली होती, परंतु या नेमणूकीच्या बाबत सनातनी पक्षाने आक्षेप घेतला होता. त्याचे कारण असे की केव्हा तरी एखदा कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी पुण्यामध्ये युरोपियन मंडळीच्या समवेत फलाहार केलेला होता. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी ख्रिश्न लोकांच्या बरोबर फलाहार केल्यामुळे ते बाटलेले आहेत. त्यांनी प्रायश्चित्त घेतल्याशिवाय व त्यांना शुद्ध करुन घेतल्याशिवाय या लवाद कोर्टावर काम करता येणार नाही असा सनातन्यांनी आग्रह धरला. शेवटी कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी पाचशे रुपये दंड भरल्यानंतर गोमूत्र आणि गोमय प्राशन करुन प्रायश्चित्त घेतल्यानंतर त्यांच्यावरची बंदी उठविण्यात आली. त्यांना लवाद कोर्टावर बसायला परवानगी दिली. त्यावेळी दुसराही असाच एक गमतीदार प्रसंग घडून आला. प्राच्यपंडित डॉ. रामकृष्णपंत भांडारकर हे संस्कृत पंडित. संस्कृत भाषेचा त्यांचा गाढा व्यासंग असल्या कारणाने विधवा विवाह सशास्त्र आहे असे म्हणणा-यांची बाजू बळकट होणार होती. म्हणून त्यांचं नांव सुचविलं गेलं होतं. परंतू सनातन्यांनी डॉ. भांडारकरांच्या नावालाही आक्षेप घेतला. त्याचं कारण असं की डॉ. भांडारकर हे संस्कृत पंडित असले तरी ते सारस्वत जातीत जन्माला आले होते. आणि ब्राम्हणमंडळी सारस्वतांना ब्राम्हणेत्तराप्रमाणेंच शूद्र समजत असत. म्हणून डॉ. भांडारांकरच्या नावाला त्यांनी आक्षेप घेतला. लवाद कोर्टाचे काम ८-९ दिवस चालले होते. त्यावेळी सनातनी पक्षाने लाचलुचपत देऊन सुधारक पक्षातल्या एका व्यक्तीला आपल्याकडे फितूर करुन घेतले त्यामुळे बहुमताने विधवा विवाह शास्त्रसमंत नाही असा निर्णय लागला. ज्या दिवशी हा निर्णय लागणार होता त्या दिवशी सकाळी कृष्णशास्त्री चिपळूणकर घाईघाईने सभेच्या ठिकाणी यावयास निघाले होते. सकाळची वेळ आणि त्यांचा पोषाख पाहून रस्त्याने जाणायेणारी मंडळी त्यांचेकडे बघून हसू लागली. लोक हा हसतात हे त्यांच्याही लक्षात येईना. कृष्णशास्त्री चिपळूणकर हे पुण्यात रंगेलपणाबद्दल प्रसिद्ध होते. त्यांच्या 'अंगवस्त्राच्या' घरातून बाहेर पडताना त्यांनी अंगावर शाल घेण्याच्या ऐवजी तिला शालू घेऊन त्याची भाळ मारली होती. ही गोष्ट त्यांच्याही ध्यानात आली नाही. परंतू अर्ध्या वाटेवर गेल्यानंतर जसे लोक चौकसपणाने त्यांचेकडे बगू लागले आणि फिदीफिदी हसू लागले तशी ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. परंतू घराकडे परत येऊन शाल घेण्याचा प्रयत्न न करता ते अंगावरील शालूसह सभास्थानी उपस्थित झाले. सभास्थानी जमलेल्या लोकांनाही आश्चर्य वाटले. त्यापैकी कोणीतरी त्यांना ओरडून सांगितले की आपल्या अंगावर शाल नसून शालू आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकर हे प्रसंगावधानी व हजरजबाबी गृहस्थ होते. त्यांनी उत्तरं दिलें. आज विधवा विवाह शास्त्र संमत आहे की नाही याचा अखेरचा निर्णय लागणार आहे. जो पक्ष हरेल त्याल पक्षाला हा शालू भेट देण्याचे ठरवून मी तो मुद्दाम अंगावर घेऊन आलो आहे.

फदफितुरी मुळे विधवा विवाह शास्त्र संमत आहे असं म्हणणा-या पक्षाला पराभव झाला. पण तरी सुद्धा विष्णुशास्त्री पंडित प्रभूती मंडळी त्या पराभवाने खचली नाहीत. त्यांनी आपले काम नेटाने तसेच चालू ठेवले. खुद्द विष्णुशास्त्री पंडितांची पत्नी निधन पावली. त्यावेळी विष्णुशास्त्री पंडित हे आपल्या विचारांप्रमाणे एखाद्या विधवेशी पुनर्विवाह करतात की काय याबद्दल सुधारक मंडळी व सनातनी मंडळी यांच्यामध्ये सारखीच उत्सुकता निर्माण झाली होती. परंतू त्रिष्णुशास्त्री पंडित त्या कसोटीला पुरेपुरे उतरले आणि पत्नीच्या निधनानंतर त्यानी पुनर्विवाह केला तो एका विधवेशीच. १००-१२५ वर्षापूर्वी हे केलेलं धाडस म्हणून त्याला विशेष महत्त्व आहे.