व्याख्यानमाला-१९७९-५

पेशवाईमध्ये सगळाच रंग पालटला. संकुचित वृत्ती निर्माण झाली. विशेषत: उत्तर पेशवाईमध्ये समुद्रपर्यंटन केलं की करणा-याने प्रायश्चित घेतलं. पाहिजे अशा प्रकारचा प्रघात सुरु झाला. याचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो राघोबादादा पेशवे यांनी आपल्याला पेशवेपद मिळावे म्हणून भले-बुरे सारे प्रयत्न चालविले होते परंतु त्यात त्यांना अपयश आले. निदान आपल्याला काहीतरी पेन्शनं मिळावी म्हणून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडे प्रयत्न चालविले. ईस्ट इंडिया कंपनीची मुख्यकचेरी इंग्लंडमध्ये होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाबरोबर बोलणी करण्याकरिता आपला वकील आबा काळे याला जहाजातून इंग्लंडला पाठविला. त्याने शिष्टाई केली आणि तो पुण्यास परत आला. पुण्यातल्या भटाशिक्षुकांनी आबा काळे यांच्या विरुद्ध काहूर उठविले. आबा काळे यांने समुद्र पर्यटन केलं असल्याकारणाने त्याने प्रायश्चित घेतल पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरला. कसल्या प्रकारचे प्रायश्चित घ्यावयाचे असा प्रश्न विचारल्यानंतर या गुन्ह्यांला देहांत प्रायश्चित आणि पुनर्जन्माशिवाय दुसरा मार्ग नाही असं त्याला सांगण्यात आले. त्यातून काही मार्ग निघतोय का काय याची चाचपणी केल्यानंतर त्या शिक्षुकांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तो मार्ग असा :-

माणसाचा जन्म स्त्री योनीतून होत असतो तेव्हा या भिक्षुकांनी आबा काळे याला सांगितले की एक भलं मोठं सोन्याचं स्त्रीलिंग तयार करा ते स्त्रीलिंग एक खड्डा खणून त्यावर ठेवा. त्या खड्यात आबा बाळे याला बसवा आणि मग खड्यात बसलेल्या आबा काळे यास त्या स्त्रीलिंगातून बाहेर काढून घ्या म्हणजे मग त्याचा पुनर्जन्म झाला व त्याचे प्रायश्चित मिळाले. हे स्त्रीलिंग सोन्याचंच केलं पाहिजे ही त्यांची अट.

इतिहासकालातला तो माणूस वयानं नाही म्हटलं तरी ४०-४५ वर्षाचा खास असेल. अशा माणसाला स्त्रीलिंगातून बाहेर काढावयाचे म्हणजे ते स्त्रीलिंग किती मोठं करावं लागलं असेल याचा आपण विचार करा. मला वाटते नाही नाही म्हटले तरी हजार बाराशे तोळे सोने खचित लागले असेल. आजच्या बाजारभावाने म्हणजे तोळ्याला सुमारे हजार रुपये अशी किंमत धरली तरी ती १० लाखाचे घरात सहज जाईल. अशा प्रकारचं, इतक्या मोलाचं, इतक्या तोळ्याचं, स्त्रीलिंग तयार करुन खड्यात बसविलेल्या आबा काळे याला दोन चार शिक्षुकांनी त्या स्त्रीलिगातून बाहेर घेतला आणि त्याचा पुनर्जन्म झाला. योग्य ते प्रायश्चित घेतले असं त्यांनी जाहीर केले. त्या ठिकाणी जमलेल्या प्रायश्चित देणा-या भिशुकांनी ते सुमारे दहा लाख रु. किंमतीचं सोन्याचं स्त्रीलिंग आपसात वाटून घेतलं आणि प्रायश्चिताची पूर्तता झाली. शिक्षुकांना पैसा किती दिला, द्रव्य किती दलं, सोनं किती दिलं, नाणं किती दिलं याच्यावर प्रायश्चिताचे दर ठरलेले असत. असल्या प्रकारच्या या अंद्धश्रद्धा हिंदुधर्माला काळीमा लावत होत्या. अशाच प्रकारच्या काही गोष्टी आपल्या धर्मामध्ये प्रचलित होत्या. बालविवाह, स्त्रीशिक्षण, केशवपन, विधवा विवाहाला बंदी, जरठकुमारी विवाह, सतीची चाल या आपल्या धर्माच्या विटंबना करणा-या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात प्रचलित होत्या. त्या नष्ट केल्या पाहिजेत असे पाश्चात्य शिक्षण घेऊन तयार झालेल्या आणि पाश्चात्य संस्कृतीशी संबंध आलेल्या पहिल्या पिढीतील काही विचारवंत तरुणांना कटाक्षाने वाट लागले. मुंबई हे त्यावेळी सामाजिक चळवळीचं महाराष्ट्रांतील मुख्य केंद्र होते. बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग, जगन्नाथ शंकर शेठ, डॉ. भाऊदाजी लाड, वगैरे मंडळी आपल्या धर्मामध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्रयत्नशील होती. यापैकी बाळशास्त्री जांभेकर हे शास्त्री घराण्यात जन्माला आले होते. इंग्रजी शिक्षण घेतल्यानंतर तुलनात्मकदृष्टया आपल्या धर्मामध्ये काहीतरी चुकते आहे, काहीतरी दोष आहेत, काहीतरी उणीवा आहेत आणि त्या दूर करणे आवश्यक आहे म्हणून त्यांनी त्या दिशेने प्रयत्न करण्यास सुरुवात केली. १९३२ साली 'दर्पण' नावाटं मराठी आणि इंग्रजी भाषेतलं पहिलं पाक्षिक त्यांनी सुरु केलं इथल्या प्रजाजनांची दु:खे काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत हे ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटीश सरकार यांना कळण्यासाठी इंग्रजी मजकूर आणि इथल्या लोकांना कळण्यासाठी मराठी मजकूर असे हे दोन भाषेतील पाक्षिक त्यांनी जाणून बुजून सुरु केले. यापाक्षिकांने द्वारे त्यांनी सामाजिक सुधारणा स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार विधवा विवाहाला उत्तेजन आणि बालविवाहाचे व जरठकुमारी विवाहाचे निषेध करणारे लेख लिहिले. हे करीत असताना भिक्षुक, सनातती आणि शास्त्री पंडितांच्या अंगाचा तीळपापड झाला. हा कोणीतरी आपला धर्म बुडविण्यासाठी निर्माण झालेला चांडाळ आहे अशी त्यांची प्रामाणिक समजूत होती. बाळशास्त्रींनी पुरस्कारलेल्या सुधारणा महाराष्ट्रातील लोकांना संपूर्णपणे अपरिचित होत्या. पाळण्यात सुद्दा लग्ने लावली जात होती. सहा महिन्याची मुलगी आणि पाच सहा वर्षांचा मुलगा यांची लग्ने होत असत. एखादा लहान मुलाला आई-बापांनी कौतुकानं तुझं लग्न ठरलं आहे म्हणून सांगितलं तर ते लहान मुल आईबापांना विचारायचं की बाबा माझं लग्न ठरलंय माझ्या लग्नाला मला तुम्ही घेऊन जाल काय? इतक्या अल्लडपणानं विचारणा केली जात असे. अशाप्रकारची ही जी लग्ने होत त्याचा परिणाम बाल विधवांची संख्या वाढण्यात होई. मुलग्याचा पुनर्विवाह होत असे पण मुलीच्या पुनर्विवाहाला धर्माची बंदी होती.