व्याख्यानमाला-१९७६-४३

शाहू छत्रपतींनी केलेल्या राजकीय, सामाजिक व धार्मिक सुधारणेमुळे चिडलेल्या ब्राह्मण पुरोहितांनी, ब्राह्मण नेत्यांनी नि ब्राह्मण पत्रकारांनी त्यांचे चारित्रहनन करण्याची एकही संधी वाया दवडली नाही शाहू छत्रपती बदफैली आहेत असे त्यांनी त्यांचे अवास्तव व अतिरंजित चित्र नि चरित्र रंगविले. ज्या टिळक सहका-यांनी वा त्या पक्षातील कार्यकर्त्यांनी शाहू छत्रपतींचे चारित्र्यहनन करण्यासाठी त्यांजवर हल्ला चढविला,  त्यांपैकी टिळकांसारखे चारित्र्यवान त्यात किती होते हे टिळकांना माहित नव्हते असे नाही. ब्राह्मण स्त्रियांकडून खोटे अर्ज लेडी मिंटोकडे ब्राह्मणांनी शाहूंच्या विरूध्द पाठविले. पण रेसिडेंटने भारतमंत्र्यापर्यंत कळविले की ‘शाहू हे बदफैली नाहीत-‘ त्यांच्या तीन-चार उपस्त्रिया होत्या हे खरे. त्यापैकी काही गायिका होत्या. ही गोष्ट जगजाहीर होती.

राजांनी झनानखाने ठेवण्याचा तो काळ काही पुढारीसुध्दा त्याकाळी उपस्त्रिया ठेवीत. शाहूंनी अनेक विवाह केले असते. पण अशा काळात शाहूंनी एकच विवाह केला हे लक्षात ठेवले पाहिजे व त्यांचे गृहजीवन सुखी होते.  १९०६ साली शाहूंनी टिळक नि त्यांचे सहकारी यांना आव्हान दिले होते की त्यांनी सहा महिने कोल्हापुरात येऊन राहावे आणि स्वत: सर्व तथाकथित प्रकरणांची चौकशी करावी. चौकशी काळात आपण कोल्हापूर सोडून बाहेर दुसरीकडे राहू. पण जर चौकशी अंती ती प्रकरणे खोटी ठरली तर त्यांनी कोणती शिक्षा भोगावी हे अगोदर ठरले पाहिजे. आपल्यावरील आरोप सिध्द झाले तर ते सांगतील ती शिक्षा भोगावयास आपण तयार आहोत, असे त्याना रेसिडेंटला लिहिले. आपण एकाद्या घराचा विध्वंस केला, कुणाची अब्रू घेतली असे सिध्द झाले तर आपणास चाबकाने चौकात फोडा, असेही ते आपल्या एका मित्रास म्हणाले होते. एकूण हा राईचा पर्वत करण्यात आला होता असेच म्हणावे लागेल.

टिळक, फुले नि आंबेडकर हे चारित्र्याच्या बाबतीत पवित्र पुरुष होते. शाहू त्यांच्या सारखे चारित्र्यवान असते तरी त्यांच्या सामाजिक क्रांतिकार्यामुळे ते निंदेतून सुटले नसते एवढे मोठे बलाढ्य टिळक त्यांना बदनाम करण्याचा खटाटोप ताई महाराज प्रकरणात ब्रिटिशांनी केलाच की नाही ?

आपल्या राज्यकर्त्यांनी महार - मांगादी हरिजनांना व बुध्दजनांना नोक-यात बढती द्यावी तेही इतरांप्रमाणे बुध्दिवान असतात असे मिशन-यांनी आपले मत लिहून ठेवलेले आहे. सैनिक विभागात बढती गुणांवर अवलंबून असावी, कारण, तेथे राष्ट्राच्या जीवनाशी संबंध असतो. तेथे त्यांना गुणवत्तेवरच बढती द्या. पण इतर खात्यांत अनुभवाने ते कोणतेही काम करू शकतात. धनगराच्या मुलाचे ‘मेरिट’ म्हणजे परीक्षेतील गुणांचे प्रमाण पाहू नका. अनेक शतक ज्यांच्यावर विद्येचे संस्कार झालेले नाहीत त्यांना ह्या नवीन जातिभेदाची म्हणजे ‘मेरिट’ ची  कसोटी लावू नका ! तुम्ही स्वत:च्या मुलाच्या शिकवणीसाठी मासिक शंभर रुपये खर्च करू शकता. ती मुले पहिल्या वर्गांत उत्तीर्ण होतात व वैदयकीय, वित्त व विज्ञान विभागात सहज प्रवेश मिळवू शकतात. तरी आत्मपरीक्षण करा ही लबाडी थांबली पाहिजे.

आपल्या राज्यात धरणे व कालवे बांधले पाहिजेत, पावसाच्या लहरीवर जनतेस अवलंबून ठेवू नये असा निर्धार करून छत्रपतींनी हे प्रचंड कार्य हाती घेतले. त्यासाठी लाखो रुपये अनेक वर्षे खर्च केले. ते आपले जीवित कार्य मानले. दुष्काळापासून जनतेला अभय मिळावे म्हणून हा सर्व खटाटोप केला. त्यांनी मुंबई सरकारकडे त्या योजनेसाठी कर्जही मागितले होते. परंतु ते त्यांना मिळाले नाही. ही धरण बांधून त्यांना पुढील हिरव्या क्रांतीचा पाया घालून ठेवला. त्यांनी ज्या कालव्यांच्या योजनेला सहकारी संस्थांची व सहकारी पतपेढ्यांची जोड दिली. त्यामुळे शेतकरी व कामगार ह्यांना सावक-यांच्या व पठाणांच्या कचाट्यातून सोडविले, सहकारामुळे शेतकरीही संघटित झाले. त्याना कर्ज मिळू लागले.