भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-३५

सन्माननीय सभासद श्री. एन्.डी.पाटील ६७ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यांनी एका सोसायटीने केलेल्या पत्रव्यवहाराला सरकारकडून उत्तर देण्यास फार विलंब लागला असे सांगितले. ह्याही बाबतीत चौकशी करून योग्य ती काळजी घेतली जाईल, असे मी त्यांना सांगू इच्छितो.

शिक्षकांच्या बाबतीत जे मुद्दे ह्या ठिकाणी उपस्थित करण्यात आले होते त्यांना नामदार शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलेच आहे. युनिव्हर्सिटयांच्या बाबतीत जो प्रश्न आहे त्या बाबत सरकारकडे रिपोर्ट आलेला आहे. ह्या बाबतीत सरकारने शेवटचा निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय ह्या सभागृहाला कळविण्यात येईल. इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मी एक वास्तववादी मनुष्य आहे. तुमच्या आमच्या जीवनाचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने मी युनिव्हर्सिटयांच्या प्रश्नाकडे पहात असतो. त्या दृष्टिकोनातून इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी काढण्यासाठी आपण काय केले पाहिजे, त्यासाठी लागणारी तांत्रिक माणसे पुरेशा प्रमाणात मिळू शकतील की नाही, त्यासाठी आवश्यक असलेले सामान मिळू शकेल की नाही, ह्या गोष्टींचा आपल्याला विचार करून मग हा निर्णय घ्यावा लागेल. आपल्यापुढे मुख्य प्रश्न आहे तो हा आहे की, एक्स्पान्शन ऑफ् एज्युकेशन आणि त्यातून निर्माण होणारे जे प्रश्न आहेत त्यांचा व्यवहाराच्या दृष्टीने युनिव्हर्सिटीजनी विचार केला पाहिजे. ह्या बाबतीत शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला घ्यावयाचा म्हटले तर एका तज्ज्ञाचा आणि दुसर्‍या तज्ज्ञाचा विचार एक असू शकत नाही. तेव्हा सर्व विचारांची गोळाबेरीज करूनच सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.

यानंतर एक मुद्दा असा उपस्थित करण्यात आला की, खडकवासला डॅमसाठी जो खर्च केला जाणार आहे तो प्लँड एक्स्पेंडिचरमधून केला जाणार आहे की नॉन-प्लँड एक्स्पेंडिचरमधून केला जाणार आहे? याला उत्तर अगदी सरळ आहे. हा खर्च प्लँड एक्स्पेंडिचरमधून केला जाणार. हा खर्च नॉन-प्लँडमधून कसा केला जाईल? खडकवासला धरण हीसुध्दा एक प्लँड योजना आहे, तेव्हा हा खर्च प्लँड एक्स्पेंडिचरमधूनच करावा लागणार. अर्थात याचा परिणाम इतर योजनांवर होईल आणि त्यांच्यासाठी कदाचित पैसा कमी पडेल की काय अशी भीती व्यक्त करण्यात आली. कदाचित तसे होईलही. एखादी योजना स्टेजेसनी होणार असेल तर त्या योजनेच्या एखाद्या स्टेजवर याचा परिणाम होईल, नाही असे नाही. पण खडकवासल्याची योजना ही प्लँड योजना आहे. नॉन-प्लँड नाही एवढे मात्र खरे.

यानंतर सन्माननीय सभासद श्री. गोगटे यांचे भाषण नेहमीप्रमाणेच झाले. आम्ही काम करण्याची पराकाष्ठा करीत असताना त्यांनी ते काम टोट्ल फेल्युअर झाले आहे असा शब्द वापरला. मला असे म्हणावयाचे आहे की, एखाद्या प्रश्नाबाबत कोणाच्या कितीही तीव्र भावना असल्या तरी शब्द वापरताना त्याचा अर्थ समजून वापरला पाहिजे. ह्या रीहॅबिलिटेशनचे काम चालू असताना काही लोकांना त्रास सोसावा लागला असेल, नाही असे मी म्हणत नाही. सन्माननीय सभासद श्री. गोगटे हे पुण्यातलेच आहेत, त्यांना सगळया गोष्टी माहीत आहेत. प्रश्न असा होता की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पुरे झाले पाहिजे. पण तेथे काम करणार्‍या अधिकार्‍यापुढे असा प्रश्न निर्माण झाला की, रीहॅबिलिटेशन म्हणजे काय करावयाचे? रीहॅबिलिटेशन म्हटले की नुसती घरबांधणी झाली की काम संपत नाही. घरबांधणी बरोबरच रस्तेबांधणी व ड्रेनेज ही आनुषंगिक कामे येतात. तेव्हा आधी घरबांधणी की आधी रस्ते असा प्रश्न निर्माण झाला असता, आधी घरबांधणी पुरी करण्याचा निर्णय अधिकार्‍यानी घेतला, आणि तोच निर्णय बरोबर आहे. हवामान हे काही तुमच्या आमच्या कल्पनेप्रमाणे चालत नाही तेव्हा रस्ते आणि ड्रेनेज हे काम एप्रिलच्या अखेरीस पुरे हाईल. मी असे काही म्हणत नाही रीहॅबिलिटेट् झालेली सर्व माणसे सुखी आहेत. त्यांच्यापुढे अनेक अडचणी आहेत हे मला माहीत आहे. त्यांच्या ज्या काही छोटया छोटया तक्रारी आहेत त्या नेहमीच राहणार आहेत आणि नेहमीच त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. पण त्यामुळे रीहॅबिलिटेशनचे काम हे टोट्ल फेल्युअर आहे असे सन्माननीय सभासद श्री. गोगटे म्हणाले हे बरोबर नाही. त्या ठिकाणी हजारो लोक राहात आहेत आणि त्यांच्या डोक्यावर निवारा आहे. अर्थात हा निवारा शंभर टक्के चांगला आहे असे मी म्हणत नाही. त्यात दोष असतील, पण म्हणून हे टोट्ल फेल्युअर आहे असे म्हणणे बरोबर होणार नाही. श्री. ए.आर्.भट म्हणाले की, पूरग्रस्तांना उद्योगधंदे काढण्यासाठी ज्या सवलती पाहिजेत त्या समाधानकारक रीतीने पुरविल्या जात नाहीत.