भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-३८

४४

डॉ. बिधनचंद्र रॉय व श्री. पुरुषोत्तमदास टंडन यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव* (९ जुलै १९६२)
--------------------------------------------------------------------

रील दोन प्रमुख आणि मान्यवर नेत्यांच्या मृत्यूबद्दल दुखवटयाचा ठराव मा. यशवंतराव चव्हाण यांनी सभागृहात मांडला.

*M.L.C. Debates. Vol. VII, Part II, 9th July 1962, pp. 390-391

अध्यक्ष महाराज, या महिन्याच्या पहिल्या तारखेला या देशातील दोन प्रमुख आणि पहिल्या दर्जाचे नेते मृत्यूने आपल्यातून ओढून नेले आहेत. डॉ. बिधनचंद्र रॉय आणि श्री. पुरुषोत्तमदास टंडन यांच्या निधनामुळे देशाची अपरिमित हानी झाली आहे. दोघेही थोर नेते ''भारत रत्‍न'' या अत्युच्च पदवीने विभूषित झाले होते. अशी दोन थोर माणसे आपल्यातून गेली याबद्दल दुःख होते.

श्री.पुरुषोत्तमदास टंडन हे खर्‍या अर्थाने पुरुषोत्तमाला साजेसे जीवन जगले. त्यांच्या जीवनाची ओळख प्रत्येकाला आहे, त्यांनी आपले सबंध जीवन देशासाठी समर्पित केले होते. १९३० सालापासून त्यांनी देशातील विविध चळवळीत भाग घेतला आणि मोठा त्याग केला. ते संपूर्णपणे राष्ट्रीय जीवन जगले. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीतच भाग घेतला असे नव्हे तर इतर महत्त्वाच्या चळवळीचेही त्यांनी नेतृत्व केले. लाला लजपतराय यांच्या बरोबर त्यांनी काम केले. हिंदी साहित्य सम्मेलनाचे ते अध्यक्ष होते आणि ह्या क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी ही हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याइतकी महत्त्वाची आहे. हिंदी भाषेबद्दलचा त्यांचा अभिमान जाज्वल्य होता आणि त्या क्षेत्रात त्यांनी फार मोठी कामगिरी केलेली आहे. त्यांनी आपले जीवन ज्याला आपण डेडिकेटेड लाइफ म्हणजे त्यागमय जीवन म्हणतो असे घालविले आहे. १९३७ साली जेव्हा पहिल्या प्रथम काँग्रेस पक्षाने अधिकार-ग्रहण केले त्यावेळी उत्तरप्रदेशच्या विधानसभेचे ते अध्यक्ष होते आणि स्वतंत्र हिंदुस्थानमध्ये आजच्या पार्लमेंटरी क्षेत्रामध्ये जे काही काम झालेले आहे त्यामध्ये काही मौलिक परंपरा निर्माण करण्याचे अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी चांगल्या रीतीने केलेले आहे. ते अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते आणि खर्‍या अर्थाने हिंदुस्थानच्या पहिल्या प्रतीच्या राजकारणात त्यांनी कार्य केले होते. गेली कित्येक वर्षे ते आजारी होते आणि ३-४ वर्षे अंथरुणाला खिळून होते, परंतु त्यांचे लक्ष देशहिताच्या दृष्टीने निरनिराळया गोष्टींकडे होते. ८० वर्षांचे संपूर्ण जीवन त्यांनी राष्ट्रोपयोगी कार्याकडे खर्च केले असून त्यांचे त्यागमय जीवन भारताला आदर्श असेच होते.

दुसरे नेते बंगालचे मुख्यमंत्री कै. डॉ. बिधनचंद्र रॉय यांच्या मृत्युमुळे बंगालचीच काय पण भारताची हानि झालेली आहे. त्यांचे सबंध जीवन हे राष्ट्रसेवा करण्यासाठी खर्च झालेले आहे. गेल्या १५-१६ वर्षांत त्यांनी बंगालच्या राजकारणात खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले आणि बंगालच्या राजकारणात समतोलपणा राखण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. डॉ. बिधनचंद्र रॉय हे बंगालचे मोठे पुढारी असून राष्ट्रपुरुष होते. गेल्या ३०-४० वर्षांत राजकीय क्षेत्रात काम करणारी जी मंडळी होती त्यामध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य होते. डॉ. बिधनचंद्र रॉय हे एक नाणावलेले डॉक्टर होते आणि त्या क्षेत्रात त्यांनी मोठे मानाचे स्थान मिळविलेले होते. कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या क्षेत्रात त्यांनी विधायक स्वरूपाचे काम केलेले आहे आणि भारताच्या इतिहासातही त्यांनी बहुमोल कामगिरी केलेली आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यांच्यासारखा थोर पुरुष ज्या दिवशी जन्मास आला त्याच दिवशी म्हणजे ८१ व्या वाढदिवसादिवशी मृत्यु पावला हा एक योगायोग आहे.

ह्या दोन थोर पुरुषांच्या मृत्युमुळे आपली असीम हानि झालेली आहे. तेव्हा त्या बाबतीत दुःख प्रदर्शित करावे आणि ह्या सभागृहाच्या भावना त्यांच्या नातेवाईकांना आणि ते ज्या क्षेत्रात काम करीत होते तेथील प्रमुखांना कळवाव्यात अशी मी विनंती करतो.
----------------------------------------------------------------------------
On 9th July 1962, Shri Y. B. Chavan, Chief Minister, paid tributes to the memory of Dr. Bidhanchandra Roy and Shri Purushottamdas Tandon, in the Maharashtra Legislative Council and observed that in their death the country had lost two stalwarts of freedom struggle and added that they fully deserved the title ‘Bharat Ratna’.