भाग १ विधानसभेतील भाषणे-३ english

नुसते बिल सभागृहापुढे मांडून किंवा ते पास करून हा हेतू साध्य होणार नाही. ज्यांनी हे बिल आणले आहे त्यांना गायीबद्दल खरे प्रेम दिसत नसून त्यांचा हेतू काहीतरी निराळाच दिसतो. त्यांनी सांगितले की गाय ही कम्युनल नाही. चार पायाचा कोणताही मुका प्राणी कम्युनल असू शकत नाही ही साधी गोष्ट त्यांच्या लक्षात यावयास पाहिजे होती. आपले दूध मुसलमानाला जाणार आहे, पारशाला जाणार आहे की हिंदूला जाणार आहे याबद्दल गाय शंका घेत नाही. तिच्या मनात सर्वांबद्दल सारखीच भावना असते, पण दुर्दैवाने गायीवर धार्मिक प्रेम करण्याचा आव आणणार्‍याच्या मनात मात्र तशी भावना निर्माण होत नाही. गायीपासून आपल्याला पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि आम्ही त्या थोडयाफार शिकलो आहोत. आपल्याजवळ जे उत्कृष्ट असेल ते समाजाला द्यावे ही गायीची वृत्ती गांधीजींनी स्वीकारली होती आणि ती चालू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. अध्यक्ष महाराज, सभागृहापुढे असलेल्या बिलाबाबत मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे आणि माझ्या मित्रांना गोमातेच्या कृपेने सद्बुध्दी होवो अशी इच्छा मी व्यक्त करतो.

या बिलावर बोलताना त्यांनी भांडवलशाहीचा याच्याशी संबंध नाही असे म्हटले होते. मला त्यांना विचारावयाचे आहे की, मग दुसर्‍या कोणाचा याच्याशी संबंध येतो ? आज या ठिकाणी श्रीमंतांच्या प्रतिनिधींना आणि राजेमहाराजे यांना गायीचा अचानक पान्हा फुटलेला दिसत आहे. आज हे सगळे राजेरजवाडे जणू काय दिलीप राजाचेच आपण आधुनिक वारसदार आहोत या थाटात गायींचे आपण रक्षण केले पाहिजे असा मुक्तकंठाने आक्रोश करू लागले आहेत. परंतु आजपर्यंत त्यांच्यापैकी कोणी गोशाळा किंवा पांजरपोळ काढल्याचे आपल्या फारसे औकिवात नाही. उलट, रेससाठी असलेल्या घोडयांचे तबेले त्यांच्याकडे असल्याचे मात्र जगजाहीर आहे. तेव्हा यात राजकीय प्रतिगामी वृत्तीचे जे प्रतीक आहे त्याला सरकारचा विरोध आहे, गोवधाला सरकारचा विरोध नाही, एवढेच मला म्हणावयाचे आहे.

आतापर्यंत सरकारची भूमिका मी मांडली आहे व सरकारतर्फे मी या बिलाला विरोध करीत आहे. मी सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सन्माननीय सभासद श्री. पुरुषोत्तमभाई पटेल (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यांनी आपले बिल परत घ्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. परंतु त्यांनी जर ते परत घेतले नाही तर सन्माननीय सभागृह ते एकमुखाने नामंजूर करील अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे भाषण पुरे करतो.
-------------------------------------------------------------------------------
On 2nd  April 1953, a non-official Bill No. XL of 1952 to provide for the Prevention of Cow Slaughter in the Bombay State was introduced by the Opposition Members, Maharaj Kumar Daljitsinghaji Himatsinghaji, Jaswantlal Saubhagyachand Shah, Shanubhai, M.A.Patel, etc. who spoke on the Bill in Gujarati. Thereafter Shri Y.B.Chavan, Minister for Civil Supplies, replied to the discussion in Marathi and drew the attention of the House to Article 48 of the Constitution which states that the State shall take steps for preserving and improving the breed, and prohibiting slaughter of cows and calves etc. He defended the Government's action for not entertaining such kind of Bill.