व्याख्यानमाला-१९८९-३

'महात्मा फुले सामाजिक विचार आणि आजचे सामाजिक संदर्भ'

प्रारंभी मी स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतो. कराड नगरपालिकेचे अध्यक्ष आदरणीय श्री. पी. डी. पाटील, यशवंतरावजी चव्हाण यांचे सहकारी आणि आमचे काका श्री. संभाजीराव थोरात. ज्यांचा आज आपण 'यशवंतराव चव्हाण पुरस्कार' देऊन गौरव केला ते माझे मित्र प्रा. केशव मेश्राम, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमचे स्नेही श्री. शांताराम पुरोहित, प्रा. गो. मा. पवार सर, या मंडळाचे सचिव श्री. विद्याधर गोखले, कराड शहरातील सुजाण, जाणत्या रसिक बंधू आणि भनिनींनो !

खरं म्हणजे पी. डी. पाटील साहेबांना मला या पूर्वीच भेटायचं होतं. कारण गेल्या सतरा वर्षांपासून अव्याहतपणे यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला नगरपालिकेच्या वतीने त्यांनी चालू ठेवलेली आहे. नगरपालिकेचे काम शहराचे रस्ते स्वच्छ ठेवणं, सांडपाण्याची व्यवस्था करणं, लोकांच्या नागरी सुविधा यांची पूर्तता करणं इतकंच मर्यादित न मानता, लोकांची मनं, बुद्धी, भावना, कल्पना स्वच्छ करण्याचं काम, येथे ही यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याच्या नांवाने त्यांनी जे चालू ठेवलेलं आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या सर्व विचार वंतांच्या व साहित्यिकांच्यावतीने त्यांचे अभिनंद करतो. त्याच बरोबर ज्यांनी १९४८ साली कविता लिहिली त्या वेळेला माझा जन्म झालेला होता त्यांचा सत्कार  व पुरस्कार माझ्या हस्ते देऊन ( वितरण करुन ) माझा जो आपण सन्मान केलेला आहे आणि त्याचा भाग म्हणून माझे मित्र प्रा. केशव मेश्राम यांचे महाराष्ट्रातल्या सबंध साहित्यिकांचेवतीने मी अभिनंदन करतो.

आमचे मित्र श्री. विठ्ठलराव पाटील, नगरपालिकेच्या ग्रंथालयाचे फार सुजाण असे मुख्य ग्रंथपाल त्यांनी मला एका वर्षापूर्वीच कळविलें होत की, तुम्ही यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत आलं पाहिजे. मध्यंतरी शारदीय व्याख्यानमालेत आलो, शिवाजीमहाराजांचे संबंधी विचार मी मांडले होते. त्यावेळीसुद्धा त्यांनी सागितलं होतं. त्यावेळी श्री. पी. डी. पाटील साहेबांना भेटायची इच्छा होती. पण ते त्यावेळी कामाचे गडबडीत होते त्यामुळे भेट होऊ शकली नाही.

यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने आपण ही व्याख्यानमाला चालू ठेवलेली आहे. आणि कराड पुरस्कारचं नांवही 'यशवंत पुरस्कार' केलेलं आहे. आणि आपली सामान्य स्तरातील, खालच्या तळातील माणूस केवळ स्वत:च्या कष्टावर, स्वत:च्या बौद्धिक पराक्रमावर एक उत्कृष्ट साहित्यिक होऊ शकतो अशा प्रा. केशव मेश्राम यांचा आपण इथं सत्कार केलेला आहे, गौरव केलेला आहे. यशवंतरावजी साहित्यिक होते, विचारवंत होते, राजकारणी होते, मुत्सद्दी होते, आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचणारे ते शिल्पकार होते. त्यांच्या नावाने हा जो पुरस्कार त्यांना दिला तो पुरस्कार मिळवून त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. त्यांच्यावरची आता जबाबदारी वाढलेली आहे. हा पुरस्कार आपल्या समोर त्यांना देण्यात आला हे जोतिराव फुल्यांच्या विचारांनी आणि यशवंतरावांच्या डोळ्यांनी आपण हे पाहायला पाहिजे. त्यांनी किती मोठं काम केलेलं आहे.