व्याख्यानमाला-१९९५-९६-८

भूतकाळांत डोके खुपसून, मागे पहात पुढे चालणारे सनातनी दुराभिमानी लोक, आणि पाश्चात्याच्या चकाकणा-या सुखवादी गतिमान भौतिक जीवनाचे भारावून गेलेले तथाकथित पुरोगमी सुशिक्षित पण भोगवादी साहेब लोक. या दोघांनाही आधांतरी करणारा, सत्य शिव सुंदर जीवन मार्ग, म. गांधींनी सत्याचे प्रयोग करीत शोधून काढला. संस्कृत पंडित आणि इंग्लिश पंडित, या पढीत पंडितांची, या सत्यशोधक सत्याग्रही कर्मयोग्याने, मोठी पंचायत करून ठेवली. सामान्य जनगणमन मात्र म. गांधींच्या सत्याग्रही जीवनमार्गांच्या दर्शनाने भारावून गेला.

म. जोतीबा फुले ते म. गांधी हा सुमारे शंभर वर्षाचा कालखंड मराठी जनगणमन जागरणाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या दृष्टीने फार महत्वाचा ऐतिहासिक कालखंड आहे. महाराष्ट्राच्या आनंदवनांत जी विवेक विचार तरुंची घनदाट पुष्पवाटिका बहरली. त्या सा-या बगिच्यातील मधुकण गोळा करीत, भरलेल्या मधाच्या कांद्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण हे आपुले आयुष्य जगले. चव्हाणसाहेब हा एक इतिहासातील लोकराज्याच्या वळणावरचा दीपस्तंभ आहे.

आपसांतील भाऊवंदकी, दैववादी मनोवृत्ती, जन्माधिष्ठित उच्चनीचता, जुलमी सुलतानशाह्या, मुघलशाह्या, यांच्या वरवंट्याखाली पिचलेल्या लोकांना स्वतंत्र करून, राजेशाहीतही हिंदवी लोक स्वराज्य कसे साधता येते, याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला. इंग्रजी नजर कैदेत, आणि फितूर स्वकीयांच्या पहा-याखाली मिळालेल्या, तुटक्याफुटक्या मांडलिक सत्तेचा उपयोग करून, दलीत, पिडीत अंधश्रद्धा, जनतेच्या कल्याणाचे राज्य, संस्थानी काळांत कसे उभे करता येते? याचा नमुना राजर्षी शाहू महाराजांनी उभा करून दाखवला. लोकशाहीच्या जमान्यांत, सामान्यातून असामान्य लोकनेतेपण आकाराल आणून, लोकशाही राज्यकारभार कसा करावा याचा आदर्श यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केला.

स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच, पाश्चात्य जगांत विकसित झालेली प्रातिनिधिक लोकशाही राज्यव्यवस्था, प्रौढ मतदान, निवडणुका, राजकीयपक्ष असे राजकारणातले  “पुरोगामी” मानले गेलेले विचार इथल्या सुशिक्षितांनी स्वीकारले. भांडवलशाही, समाजवाद, साम्यवाद, उदारणतवाद, मुक्त अर्थव्यवस्था हे अर्थशास्त्रीय विचारही इथे अनुकरणीय वाटले. इंग्रजी राज्य चालवायला स्थानिक मनुष्यबळ हवे होते ते तयार करणा-या शिक्षण संस्थाही इथे स्वीकारल्या गेल्या. इंग्रजी भाषा, इंग्रजी पोषाख, इंग्रजी संस्कृति आणि रीतीरिवाज, सारे काही आदर्श समजून इथल्या नवशिक्षितांनी अनुसरले. स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानांत कोणती राज्यपद्धती, कोणती अर्थपद्धती, कोणती समाजपद्धती स्विकारकायची, या संबंधीचे सारे संदर्भ पाश्चात्य जगातून घेतले. मतभिन्नता होती पण ती बरीचशी पाश्चात्य जगातले हे स्वीकारायचे की ते स्वीकारायचे, एवढ्यापुरतीच मर्यादित होती. इंग्रज जेते, आम्ही पराभूत, त्यांचे सारे काही अनुकरणीय अशीच मनोधारणा इथल्या शिक्षितांची झाली होती.

स्वातंत्र्यानंतर नवभारताच्या जडणघडणीचा जो आराखडा भारतीय राज्यघटनेत सर्वमान्य म्हणून स्वीकारला गेला तो चांगला साडेतीन वर्षाच्या वादविवादातून साकार झालेला आराखडा आहे. देशातले बहुतेक सारे कर्ते, नेते, विद्वान त्या वादविवादात सहभागी झाले होते. इंग्रजी राजवटीत जी वैचारिक आंदोलने झाली त्या सर्व विचार मंथनाचे नवनीत म्हणून भारतीय राज्यघटनेकडे पाहिले पाहिजे. पाश्चात्य संस्कृतीच्या संपर्कात आल्याने जे राजकीय, आर्थिक, सामाजिक असे ऐहिक जागरण झाले, त्यातून पाश्चात्यांचे सांस्कृतिक श्रेष्ठत्वही मान्य करणारी मनोवृत्ती शिक्षितांनी मान्य केली आणि तीच या देशापुढे अनुकरणीय, आदर्श म्हणून ठेवली गेली. भारतीय राज्यघटनेचा सरनामा ही नवभारताच्या उभारणीची वैचारिक बैठक अतिशय सुस्पष्ट करणारी उदघोषणा आहे.

“आम्ही भारतीय लोक निर्धारपूर्वक असा संकल्प करतो की, आम्ही आमच्या स्वतंत्र भारतात सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक लकशाही राज्यव्यवस्था मांडून चालवू, आणि इथे जन्माला आलेल्या प्रत्येक नागरिकास, न्याय, स्वातंत्र्य, समता, प्रतिष्ठा आणि बंधुभावानर आधारित राष्ट्रीय एकता याची अनुभूती देणारे जीवन देण्याची हमी देऊ.’