व्याख्यानमाला-१९९५-९६-१२

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मराठ्यांनी हिरीरीने चालविली. पण महाराष्ट्र निर्मितीनंतर मराठी मनाची एकात्मता साधून सामुहिक संघशक्तींवर विद्या, सत्ता, संपत्तीच्या क्षेत्रांत मराठी माणूस का आघाडीवर जात नाही? ही सामुदायिक मनांतील एकात्मतेची भावना जोपासून भरभक्कम करणे हीच महाराष्ट्राच्या जडण घडणीची आधारशीला आहे हे यशवंतरावांनी आग्रहाने दाखवून दिले असतानाही नंतरच्या राज्यकर्त्यांनी, विद्वानांनी, साहित्यिक विचारवंतांनी, त्यासाठी काही भरीव उपक्रम राबवले का? कित्येक शतकानंतर एकत्र आलेली मराठी मने, पूर्ण विश्वासाने, प्रेमाने, आदराने, भावनिक जिव्हाळ्याने, एकात्मता साधून, एक डोळस शक्ती म्हणून, राष्ट्र उभारणीच्या विविध आघाड्यावर समर्थपणे उभी राहील यासाठी आम्ही काही केले का? “हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री धावला” एवढे म्हणून आम्ही यशवंतरावांच्या संरक्षणमंत्री म्हणून झालेल्या निवडीचे कौतुक केले. पण त्या संरक्षण क्षेत्रांत तरी महाराष्ट्र आघाडीवर राहील यासाठी काही विचारपूर्वक पावले टाकली का? स्वतःच्या अहंकारांत बुडवून घेऊन आम्ही आत्मघातकी दंभाचे जगणे उराशी कवटाळून बसतो. आणि महाराष्ट्राबाहेर, उघड्या जगांत आत्मविश्वासाने वावरायला कुचराई करतो. मराठ्यांची ही स्वयंकेंद्री मानसिकता महाराष्ट्राला फार महागात पडते. विविध आघाड्यावर सर्वांपुढे उभे राहण्याची कुवत असूनही आम्ही या मानसिकतेमुळे मागे राहिलो आहे. इतरांच्या दुराव्याच्या भावनेस खतपाणी घालतो आहे. ही आत्मसंतुष्ट स्वयंकेंद्री संकुचित भावना घालवण्यासाठी, संयुक्त महाराष्ट्रातील आपल्या सा-या मराठी मनांतही परस्पर बंधुतेची, विश्वासाची भावना परिदृढ करण्यासाठी गेल्या ३०-३५ वर्षात आम्ही काही केले नाही. उलट आम्ही वाटणीची भांडणेच सुरू केली. विभागीय भावना जोजावण्याचा तर काहींनी विडाच उचलला. ऐतिहासिक काळापासून चालत आलेले दुरावे, जातीजमातीचे दुरावे, परस्पर संपर्क टाळल्यामुळे गैरसमजुतीमुळे निर्माण होणारे दुरावे, विभागीय असमतोलामुळे उमाळणारे दुरावे, असे सारे दुरावे जोपासून परस्पर भेदाभेद, विद्वेष वाढेल असेच उद्योग आम्ही करीत राहिलो आहे. राष्ट्रीय एकता आणि महाराष्ट्राची अस्मिता जोपासणेसाठी जी एकात्म मानसिकता लागते, तिचा आम्हाला पूर्ण विसर पडलेला आहे. “भावनिक, मानसिक एकात्मतेची ऐसी-तैसी” याच नावाचे नाटक, महाराष्ट्र निर्मितीनंतर मराठी मंडळीनी चालू ठेवले आहे.

स्वातंत्र्यासाठी पडेल ती किंमत देणारी, कोणताही त्याग करणारी पिढी संपली. स्वतंत्र राष्ट्रउभारणीसाठी खरं म्हणजे स्वातंत्र्य चळवळीपेक्षाही देशाला प्रत्येकाने अधिक काहीतरी देण्याची, त्याग करण्याची, वाहून घेण्याची गरज आहे. परंतु स्वातंत्र्य म्हणजे समाजात, देशांत जे काही आहे ते ओरबडून घेण्याचे स्वातंत्र्य असा अर्थ आज झाला आहे. इंग्रजी ज्या वसाहतवादी मनोवृत्तीने हा देश ओरबडून नेत होता, त्याच पद्धतीने आम्ही आमच्यातले तथाकथित “सुशिक्षित” हा देश ओरबडून खात आहेत. ते जेवढे देतात त्यापेक्षा अधिक कितीतरी पटीने अधिक या समाजातून घेतात. मते आणि मदत, सत्ता आणि पैसा हेच साधन मानले जात आहे. राजकीय पक्ष, प्रचार साधने, साहित्यसंघटना, कामगार कर्मचारी संघटना, उद्योग व्यवसाय घराणी, विद्यापीठे, विचारवंत, सारेचजण पक्षीय, जातीय, विभागीय आणि व्यक्तिगतही हितसंबंध जोपासण्यासाठी आपली शक्ती पणाला लावत आहेत. एकमेकांची आम्हाला जणू अडचण वाटते आहे. आम्ही मराठी माणसे एकमेकांचे बंधू मित्र, सहकारी वाटत नाही. आम्ही एकमेकांचे स्पर्धक, वाटेकरी झालो आहेत. आम्हाला आमच्याच घरातली भाऊबंदकी वाढवणेत आनंद वाटतो आहे. या आमच्या मूर्खपणाचा पहिला परिणाम, सीमेवरच्या मराठी बांधवांचा विसर पडण्यात झाला आहे. दुसरा परिणाम, बहुमत मराठी असताही गोवा गमावण्यात झाला आहे. तिसरा परिणाम, मुंबई महाराष्ट्राची राजधानी असली तरी मुंबईत मराठा, भांडी घासणा-या मोलकरणीच्या, गिरणीतल्या कामगाराच्या आणि माथाडी स्वरूपांतच अजून वावरतो आहे. मुंबईतील मराठी माणसांची संख्या अगदीच अल्पमतात घसरली आहे. मुंबईतील कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीच्या लोंढ्याला घाबरून आमचे बोलघेवडे साहित्यिक, लेखक, विचारवंत आपली मुळे परदेशांत पाठवून मुंबई सोडून नाशिक पुण्याकडे पळ काढताहेत. “क्रांतीकारक” मराठी पुढा-यांनी कापड गिरण्या बंद पाडून, हजारो मराठी गिरणी कामगारांना मुंबई सोडून देशावर पळवून लावले आहे.

महाराष्ट्रातील मराठी मनाच्या एकात्मतेची अक्षम्य हेळसांड केल्यामुळे ही मराठी माणसे महत् प्रयासाने महाराष्ट्रात एकत्र आली आहेत. त्यांच्यातच आज विघटनांच्या भावनांचे बीजारोपण झालेले दिसते आहे. महाराष्ट्रात आल्याचा पश्चाताप व्हावा अशी भाषा वापरली जात आहे. राजकारणी जसे या प्रश्नाबाबत बेफिकीर कृतीने वागतात तशीच बेफिकीर राजकारणाबाहेरचेही लोक, संस्था, संघटना दाखवतात. जोडण्याऐवजी मोडण्याकडे, शिवण्याऐवजी उसवण्याकडे, संघशक्तीऐवजी एकांडे शिलेदान होण्याकडे मराठी मनाचा जो कल आहे. तो कसा बजलायचा हाच एक मूलभूत प्रश्न आपल्यापुढे आहे.