व्याख्यानमाला-१९८७-२ (6)

हा व्यक्तीचा व्यक्तीगत प्रवास असतो. म्हणूनच त्यांना धर्म हे मानवी जाणिवेचे सर्वोच्च उड्डाण वाटते, सत्यशोधनाचा तो वैयक्तिक मार्ग वाटतो, ती व्यक्तिगत अनुभूती वाटते. तुम्हाला व्यक्तीच्या बाह्य जीवनाची चर्चा करता येईल, त्याची चिकित्साही होवू शकेल, त्याचे वेगवेगळे अर्थही लावता येतील परंतु व्यक्तीच्या अंतर्मनाच्या अनुभूतीची तुम्ही चर्चा करूच शकमार नाही. हा मुळी चर्चेचा विषयच होवू शकत नाही, तो तर अनुभूतीचा विषय आहे. म्हणूनच ही अनुभूती, हे अंत:सत्य सामान्यज्ञानाचा विषय नाही. ते संवादापलिकडे आहे. ज्ञानेश्वरांनी तर त्याला ‘शब्देविना संवाद’ मानले आहे. जर शब्दच नसतील तर चर्चा आणि चिकित्सा कशाची करणार ? त्यांचे निरूपण आणि अन्वयार्थाचे सारे प्रयत्न निष्फळ आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा ‘बुध्द आणि त्याचा धम्म’ या ग्रंथात जो बुध्द उभा केलेला आहे तो सुध्दा ज्ञानप्राप्ती नंतर मौनात जावू इच्छित होता. कारण त्याला जी ज्ञानप्राप्ती झाली ती सामान्य जनतेला सांगण्यापलीकडची वाटत होती. परंतु या बुध्दाला ब्रह्मासंहपतीने बोलते केले. कशासाठी ? तर या जगाची पुनर्रचना करण्यासाठी, जग अधिक चांगले करण्यासाठी. या जगाची पुनर्रचना साधन संपत्तीच्या संबंधातील पुनर्रचनेत असते. त्यासाठी विविध संस्था उभ्या कराव्या लागतात. धर्माने सुध्दा आपल्या नावाखाली अशा संस्था निर्माण केल्याचा इतिहास आहे परंतु जगाची पुनर्रचना करण्यात आजपर्यंत तरी कोणत्याही धर्माला यश आलेले नाही. धर्म जेव्हा संस्थात्मक रूप धारण करतो त्यावेळी तो राजकीय संस्थांच्यापेक्षा गुणात्मक दृष्ट्या अजिबात वेगळा नसतो. संस्थात्मक धर्माचेच दुसरे नाव राजकारण असते, समाजकारण असते. या संस्थात्मक धर्माचा आणि व्यक्तिगत अनुभूतीचा काडीचाही संबंध नाही. धर्म जेव्हा एखाद्या संस्थेचे, संघटनेचे रूप धारण करतो त्यावेळी त्याचे स्वरूप राजकीय होते. म्हणूनच स्वत:ला ख्रिस्ती समजणारे सत्यशोधक होवूच शकत नाहीत. सत्य त्यांच्यापासून खूप मैलांच्या अंतरावर असते तरीही सत्य शोधल्याचा त्यांचा दांभिक दावा सतत चालू असतो. सारी प्रचारमाध्यमे त्यांच्या ताब्यात असतात. खरा धर्म हा हिंदू, मुसलमान किंवा ख्रिस्ती यांनी स्थापिलेल्या धर्मसंस्थेत नसतोच. त्या संस्था तर राजकीय असतात. त्यांची नावे धर्म सदृश असली तरी अंतरंग राजकीय असते. म्हणून तर त्यांनी युध्दांची निर्मिती केली. राजकारण्यांनी केली तशी. म्हणून तर त्यांनी देवांच्या नावावर लढाया केल्या, कोणाचा देव श्रेष्ठ आहे यावरून. आज उत्तर भारतात देवांच्या देवळावरून जो वाद सुरू आहे रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा तो मुळी धार्मिक नाहीच आहे. तो तर राजकीय आहे. म्हणूनच धर्माचा विचार दोन पातळ्यावर करावा अशी काही विद्वानांची सूचना आहे. एक व्यक्तिगत पातळीवर आणि दुसरा सामाजिक पातळीवर. जोपर्यत व्यक्तिगत पातळीवरच्या धर्माचा प्रश्न आहे तोपर्यत तो चर्चेच्या पलिकडचा विषय मानावा तो व्यक्तिगत अनुभूतीचा विषय मानावा. परंत जोपर्यंत धर्म हा समाजधारणेचा विषय आहे तोपर्यत त्याची चर्चा, त्याची चिकित्सा आवश्यक मानावी. कारण समाजधारणा ही समाजात व्यक्तीचे सामाजिक, आर्थिक स्थान निर्धारीत करीत असते. मार्क्स सुध्दा धर्म चिकित्सेला सर्वाधिक महत्व देतो तेव्हा त्याच्यापुढे हा संस्थात्मक धर्म आणि त्याचा ऐतिहासिक विकास असतो. धर्म हा एक ख-या अर्थाने मनोव्यापार आहे. हा मनोव्यापार जसा वैयक्तिक अंतस्थ असतो तसाच तो सामुहिकही असतो.