व्याख्यानमाला-१९८७-२ (10)

याला कोणताही संस्थात्मक धर्म अपवाद नाही. ख्रिस्ती धर्मांत सिनाई पर्वतावर परमेश्वराने मोझेसला ज्या दहा आज्ञा दिल्या, ‘दि टेन कमांडमेन्टस्’ दिल्या त्यांचे स्वरूप तरी काय आहे. या सा-या गोष्टी त्यावेळी समाजाच्या धारणेसाठी आवश्यक होत्या, ही आवश्यकता त्या त्या प्रदेशात, त्या त्या कालखंडात, त्या त्या धर्माने पूर्ण केली. यासाठी तर विल्यम जेम्सला सुध्दा धर्माचे संस्थात्मक आणि व्यक्तिगत असे दोन भाग पाडूनच धर्माचा विचार करावा लागला. व्यक्तिगत धर्माला त्याने ह्रद्याच्या धर्माला देवाची, यज्ञाची, कर्मकांडाची आणि पुरोहित वर्गाची काहीही आवश्यकता नसते. तो जर ह्रद्याने ह्रद्याशी केलेला संवाद  असेल तर त्या ह्रद्याशी ज्याचे ह्रद्य संवादी होवू शकते त्यालाच त्या ह्रद्याची भाषा समजण्याची शक्यता आहे. ही भाषा न समजणारे जेव्हा आपले पांडित्य दाखवितात तेव्हा त्यांचे पांडित्य ह्रद्याला स्पर्श करणारे कसे असेल ? हे सारे पांडित्य परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल किंवा कोणत्या मंत्रात काय सामर्थ्य आहे किंवा परमेश्वराकडे जाण्यासाठी पुरोहित वर्गाची किती नितांत आवश्यकता आहे याचे प्रदर्शन करणारे असते. या सा-या पंडितांना आपल्या विद्वत्तेचे आणि ज्ञानाचे प्रदर्शन करावयाचे असते. या सा-या पढीक विद्वानांनीच धर्म संस्था कमी अधिक प्रमाणा भ्रष्ट करण्यास हातभार लावला आहे.
प्रसिध्द तत्ववेता बट्रॉंड रसेल यांनी आपल्या ‘रिलिजन अँड सायन्स’ या ग्रंथात एक सूचक वाक्य यादृष्टीने लिहिलेले आहे. त्याच्या मताप्रमाणे निव्वळ वैयक्तिक स्वरूपाचा धर्म विज्ञानाने खोटा ठरविता येईल अशी आग्रही मते मांडण्याचे टाळण्यात समाधान मानून राहील तो पराकोटीच्या विज्ञानयुगात निर्वेधपणे राहु शकेल. परंतु अलिकडे आपल्या प्रत्येक क्षेत्रात असहिष्णू वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाला आपलेच म्हणणे चिरंतन सत्य आहे असे वाटू लागले आहे. एवढेच नव्हे तर आपले म्हणणे इतरांनी स्वीकारलेच पाहिजे असा आग्रही आणि आक्रमक पवित्राही माणसे घेतांना दिसतात. सत्यशोधनाचे अनेक मार्ग असू शकतात यावरील विश्वास दिवसेंदिवस कमी होतांना दिसतो आहे. हे सर्व घडण्याची कारणें आपल्या बिघडत चाललेल्या समाज परिस्थितीत आहेत. ही परिस्थिती जितकी अधिक बिघडेल तितके विविध हितसंबंधी गट अधिक आक्रमक होतील. त्यासाठी ते धर्माचा, भाषेचा, प्रदेशीचा आधार घेतील. हे सारे आधार अंतिमत:तकलादू स्वरूपाचे असतात. परंतु विशिषट परिस्थितीत ते भयंकर काही घडवून जातात. धर्माला पाकिस्तानच्या निर्मितीचे एक हत्यार म्हणून वापरता येते. धर्माला ‘इस्लाम खतरेमें हे ’ अशा घोषणा देवून किंवा ‘हिंदू  राष्ट्राचा’ पुरस्कार करून राष्ट्र अस्थिर करण्याचे एक साधन म्हणून वापरता येते. याचा व्यक्तिगत धर्माशी काडीचाही संबंध नाही. याचा संबंध संघटीत राजकारणाशी आहे. यासाठी तर आपल्याला संघटीत धर्माचे स्वरूप आणि त्यांचा विकास समजावून घ्यावयाचा आहे. तो समजावून घेतला म्हणजे धर्माच्या नावाखाली आज काय चालू आहे याची आपल्याला कल्पना येईल. ती कल्पना आपल्या देशातल्या जनलेला जितकी लवकर येईल तितके लवकर आपल्याला हे राष्ट्र वाचविण्याच्या योजना आखता येतील. नाहीतर आज आपले राष्ट्र एका प्रचंड ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहे. सर्वच धर्माचे धर्मवेडे गट ज्या प्रकारे आज धर्माच्या नावाने राजकारण खेळत आहेत तो प्रकारच राष्ट्र उध्वस्त करणारा आहे. म्हणून या संस्थात्मक धर्मांची आपण थोडक्यात माहिती तरून घेतली पाहिजे. खरे तर हे सा-याच सेक्युलर म्हणविणा-या राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी करण्याचे काम आहे. हे काम स्वातंत्र्यपूर्व कालखंडात झाले नाही. त्याची किंमत आपण मोजलेली आहे आणखी किंमत मोजण्याची क्षमता आता सामान्य जनतेत उरलेली नाही. जर ती त्यांना कोणी मोजणे भाग पाडणार असेल तर तो सर्वनाश ठरेल.