व्याख्यानमाला-१९८७-२ (4)

आपल्या धर्माचा एकही धर्मग्रंथ वाचण्याची आवश्यकता त्या धर्माच्या अनुयायांना का वाटत नाही ? हा धार्मिक पुनरूज्जीवनवाद जन्माला येण्याची कारणे धर्मात नाहीत तर सामाजिक आणि आर्थिक राजकीय परिस्थितीत आहेत. पुनरूज्जीवनवादी धर्मवेडाचे आकलन धर्मग्रंथांच्या वाचनाने होणार नाही तर हे धर्मवेड ज्या देशात आणि ज्या परिस्थितीत जन्मलेले असते त्या देशाच्या इतिहासाची आणि त्या परिस्थितीची माहिती करून घेतल्याने होते. अशी माहिती घ्यायला जेव्हा सुरवात होते तेव्हाच धर्मचिकित्सेलाही सुरवात होते. म्हणून तर धर्मवेडे फक्त धर्माची भाषा बोलत असतात. त्यांचे खरे दु:ख सामाजिक, आर्थिक असते परंतु त्यांना सामाजिक, आर्थिक प्रश्नावर लढाई नको असते, त्यासाठी संघर्ष नको असतो. कारण तसे केले तर धार्मिक अहंकारांना तिलांजली द्यावी लागते आणि सर्व धर्मियांना जे मिळेल त्यावर समाधान मानावे लागते. या धर्मवेड्यांना इतरांच्या पेक्षा अधिक हवे असते आणि ते प्राप्त करण्यासाठी किंवा इतरांच्या पेक्षा आपल्याकडे जे जास्त आहे त्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांना परिस्थिती सतत युध्दमान ठेवावी लागते. या कामासाठी धर्माचा अतिशय कौशल्याने उपयोग केला गेलेला आहे. त्यासाठी त्यांना सतत दहशत निर्माण करावयाची असते. सामान्य माणसांच्या मनात सतत भीतीची भावना जागृत ठेवायची असते. कारण हे धर्मवेडे प्रत्येक धार्मिक समुदायात जसे अल्पसंख्य असतात तसेच हितसंबंधीही असतात. या हितसंबंधाचा आणि धर्माचा वस्तुत:काहीही संबंध नसतो. धर्मग्रंथांचा तर सुतराम संबंध नसतो. यासाठीच या धर्मवेडाची कारणे धर्म आणि त्यांच्या धर्मग्रंथांत न शोधता ती त्या कालखंडातील विद्यमान परिस्थितीत शोधावी लागतात. जेव्हा आपण या धर्मवेडाची कारणे सामाजिक, आर्थिक परिस्थितीत समाजशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून शोधू लागू त्यावेळी आपल्याला हा सारा वर्तमानकाळ समजावून घेण्यासाठी अपरिहार्यपणे इतिहासाचाही मागोवा घ्यावा लागेल. कारण कोणतीही विद्यमान परि्स्थिती सुटी, स्वतंत्र कधीच नसते. ती समाज विकासाच्या टप्प्याचे एक अंग असते म्हणूनच तिला इतिहासाची एक विशाल पार्श्वभूमी प्राप्त होते. यासाठीच सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय वास्तव सुध्दा ऐतिहासिक दृष्टीच्या मदतीनेच समजावून घेता येते. त्यासाठी तर आजवरचे इतिहास लेखनही तपासावे लागते आणि ते कोणकोणत्या दृष्टीकोनातून लिहिले गेले याचाही विचार करावा लागतो. म्हणूनच या पहिल्या व्याख्यानात आपण धर्माचा, धर्मसंस्थेचा, तिच्या विकासाचा विचार करणार आहोत आणि उद्याच्या व्याख्यानात इतिहास लेखनाचा आणि त्याच्या विविध दृष्टीकोनाचा विचार करणार आहेत. हा विषय मी आपल्यासमोर सूत्ररूपाने मांडीत आहे त्यामुळे त्यात काही उणीवा राहणे शक्य आहे. जेव्हा पुढे कधी वेळ मिळाला तर तो विस्ताराने ग्रंथरूपाने संदर्भासहित मांडण्याचा विचार आहे.