व्याख्यानमाला-१९८०-४६

एखाद्या गावातील १०० शेतकरी जर आपण तपासले, मग ते गाव संपन्न असो, बागाईत असो, मध्यम प्रतीचे असो नाहीतर आणखी दुष्काळी भागातील असो; त्या शंभर शेतक-यांपैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त शेतक-यांच्या ‘७।१२’ वर आता लिहायला जागा नाही. त्यासाठीही एक सन्माननीय पदवी आहे, ‘थकबाकीदार’! या यादीतून हा ८० टक्के शेतकरी सुटलेला नाही. तुम्ही कोणतही गाव पाहिल तरी अशा परिस्थितीमध्ये एकीकडे व्याजाचा बोजा वाढतो आहे, शेतमालाच्या किंमती कमी व्हायला लागल्या आहेत, उत्पादनाचा खर्च वाढतो आहे, कारण खतांच्या किंमती एकसारख्या वाढवाव्या लागतात. पेट्रोलियम्स आणि तज्जन्य पदार्थापासून निर्माण होणारी रासायनिय खते दिवसे दिवस महाग होत आहेत. शेतीच्या उत्पादनाचा भांडवली खर्च भरमसाठ वाढत आहे. त्यामुळे सामान्य शेतक-याला शेती करणे परवडत नाही, असी खरी अवस्था आहे. त्यासाठी खताचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. तो प्रश्न सोडविताना शेतक-यांना जर एखादा पूरक धंदा मिळाला, तर तोही त्यांच्या हितावह ठरणार आहे. असी ही शेतक-यांची अवस्था बिकट बनत चालली आहे, तिला जर दुसरा पर्यायच नसेल तर त्यासाठी काही मार्ग शोधण्याची आवश्यकता समाज म्हणून, सरकार म्हणून, समाजातील जाणते लोक म्हणून, किंवा समाज शिक्षणाच्या संस्था म्हणून, शेतीला कुठले तरी जोड धंदे उपलब्ध करून दिले पाहिजेत. शेतक-यांना जो मोकळा वेळ मिळतो, तो वाचविला पाहिजे. त्याला कुठेतरी काम करायला लावले पाहिजे. त्या मोकळ्या वेळामध्ये उत्पन्न म्हणून त्याच्य प्रपंचाला उपयोगी पडणारे, काही तरी मिळाले पाहिजे. अशा प्रकारचा विचार करण्याची आवश्यकता तुमच्या-आमच्या समोर निर्माण झालेली आहे.

याबाबतीत मी खूप विचार केला, कारण मी एक तपभर शेती केलेला माणूस आहे. म्हणून शेतीच्या संदर्भात येणा-या अडचणी, एक अभ्यासक म्हणून शेतीच्या व्यवसायाकडे मी पाहिले आहे. ऐन उमेदीमध्ये शेती केली. शेतीचा व्यवसाय हा डोळसपणाने केला पाहिजे. त्याला एखादा पूरक धंदा असला पाहिजे. असे माझे मत बनले. आणि मग पूरक धंदा कोणता असला पाहिजे, असा विचार करण्यासाठी मी या देशामध्ये, आणि जेथे जेथे शेती संशोधन केंद्रे व सेती संदर्भातल्या शेतक-यांच्या जोड धंद्याला पूरक अशा अनेक ठिकाणी ज्या योजना चालू आहेत, तेथे जाण्याचा प्रयत्न त्यावेळी केला. इज्जतनगर पासून बंगलोपरपर्यंत सर्व शेती आणि शेतीचे पूरक धंदे असणारी क्षेत्रे पाहिली. प्रथम अनेक प्रांतांतील विद्यपीठे पाहिली. कृषिविद्यापीठापासून होणारे संशोधन पाहिले. अनेक ठिकाणच्या प्रगत शेतक-यांचे शेतीफार्म्स पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु बोटावर मोजण्या इतक्या दोन पाच लोकांची शेती समर्थपणे चाललेली आहे, असे दिसले. आणि म्हणून पुन्हा नुसती शेती पहाण्याऐवजी, मी नंतर शेतीच्या पूरक धंद्यांची जी निरनिराळी केन्द्रे आहेत ती, मग सरकारी क्षेत्रातील असोत, सहकरी क्षेत्रातील असोत किंवा कोणा उद्योगपतीची असोत, ती पहाण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर माझे असे मत बनले आहे की, आपल्या महाराष्ट्रामधल्या शेतक-यांना जोड धंदा म्हणून दुधाचा व्यवसाय देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि तोच एक उत्तम व्यवसाय आहे, असे माझ्यारख्या शेतक-याचे मत बनले आहे.

दुधाचा धंदा हा खरोखर ‘डेअरी’ साठी म्हणून आहे. या धंद्यासाठी जर शहाणा माणूस असेल, शिकलेला माणूस असेल तर उत्तम. तो आणखी जाणतेपणाने, शहाणपणाने, थोडा शास्त्रीयदृष्ट्या विचार करून हा व्यवसाय करू शकतो. परंतु तसे नसेल तर अगदी अडाणी माणूससुद्धा, आंगठेबहाद्दर माणूससुद्धा, मग पुरुष असो वा स्त्री असो, ती सुद्धा दुधाचा व्यवसाय करू शकते. असे एक सिद्ध झालेले आहे की, जनावरे जोपसणे व दूध उत्पादन करणे, ही आपल्याकडे पूर्वपरंपरेने चालत आलेली व्यावसायीक बाब आहे, तो पूर्वापार धंदा आहे. या धंद्याकडे पाहताना त्याकडे आपण कोणत्या पद्धतीने पहाणार आहोत, मोकळा वेळ आहे म्हणून चार म्हशी पाळावयाच्या, की दुसरं काही काम नाही म्हणून दोन गायी पाळायच्या, अशाप्रकारे या व्यवसायाकडे पाहून आज चालणार नाही. त्याला थोडासा शास्त्रीय दृष्टीकोण स्वीकारून, नव्या नव्या जातींचा शोध घेऊन, नवनवीन प्रकारचे संकर घडवून, त्या व्यवसायामध्ये उतरण्याची आवश्यकता आहे. मी असेही पाहिले आहे की, अनेक पदवीधर महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने डेअरी धंदा करू शकतात. त्यात ते यशस्वी होऊ शकतात. त्याविषयीच्या शास्त्रीय चर्चामध्ये ते बोलू शकतात.