व्याख्यानमाला-१९७९-५३

निवडणुकीच्यासाठी उमेदवार निवडण्यापासून जातीचे राजकारण सुरु होतं ते थेट अगदी मंत्री म्हणून घेण्यापर्यंत चालतांना दिसतं तेव्हा एक बाजूला पक्ष फुटलेले आहेत त्याच्यात काही साधर्म्य नाही. दुस-या बाजूला अस दिसतं की जातीच राजकारण मताचा अधिकार अतिशय महत्त्वाचा आहे पण मताच्या अधिकाराचा जातीच्या तत्त्वावर वापर व्हावा याच्यासाठीच प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात चालू आहेत. प्रत्यक्षात श्रीमंत जास्त श्रीमंत झालेले आहेत. गरीब जास्त गरीब झालेले आहेत. पूर्वी होती त्याच्यापेक्षा विषमता वाढलेली आहे. आणि सामाजिक बाबतीत जर जास्त भयावह अशी परिस्थिती आहे. सामाजिक परिस्थितीची परिणती राजकीय आणि आर्थिक परिस्थितीत होती. इथल्या लोकशाही मूल्याबद्दलची निष्ठाच काही कमी होतेय. आपण काही वेळेला अतिशय भाबडेपणाने म्हणतो की १९७७ साली मतदारांनी लोकशाहीच्या बाजूने कौल दिला वगैरे वगैर खरं सांगायच तर इतकं सोपं ते नाही. हा कौल लोकशाहीच्या बाजूने आहे का लोकांना एक राजवट नको होती तिच्या विरुद्ध तिने दिलेला कौल आहे? लोकशाही मूल्ये लोकांपर्यत पोहोचली आहेत का याचा जर आपण शोध घ्यायला लागलो तर आपल्याला असं दिसतं की सामाजिक बाबतीत तर आपण जास्त मागे गेलो आहोत. सामाजिक बाबतीतला ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी राजा राममोहन रॉयांपासून ते म. जोतिबा फुल्यांपर्यंत, नंतर म. गांधी पर्यंत झालेली जी सामाजिक क्रांती असते तिचा विचार करतो. त्या क्रांतीच्या बाबतीत कुठली भावना होती? फुल्यांनी ज्यावेळी प्रस्तापितांवर कोरडे ओढायला सुरुवात केली त्यावेळी ते एका सामाजिक पद्धतीवर तुटून पडत असत. आणि आज आपल्याला असं दिसतंय की त्या सामाजिक पद्धतीवर कोरडे ओढायचे तर सोडा पण त्या सामाजिक पद्धतीचं आपण समर्थन करतो आहोत. धर्माच्या नावाखाली जुन्या अंध:श्रद्धा पुन्हा अतिशय मोठ्या प्रमाणावर फोफावत आहेत. तुम्हाला धर्म पाळावयाचा असेल तर जरूर पाळा. आपल्या घरात जरूर पाळा पण प्रश्न असा आहे की सामाजिक वर्तणुकीवर जर त्या धर्माचा परिणाम होत असेल तर तेथे धर्माला थोडासा पायबंद बसायला पाहिजे.

या देशातल्या कला काय, सिनेमा काय, नाटक काय यांना जर प्रचार करायचा असला, यांना जर काही करायचं असलं, लोकामध्ये नवीन मूल्ये घडवायची असली तर लोकांना दैववादावरून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. ले लोकशिक्षण आहे. मध्यंतरी मी एक सिनेमा पाहिला, भयंकर सिनेमा की त्याच्यावर काहीतरी शेवटी असं आहे की त्या गावावर पुराचं संकट येतं आणि कोणी म्हणतं पाटलाची सून ओली बाळंतीण असून तिला जर बळी दिलं तरच हा पूर ओसरेल आणि ती सून जाऊन आत्महत्या करते. आणि लोकसमुदाय तिला अतिशय साध्वी म्हणून थिएटरच्या बाहेर पडतो. मला असं वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. त्या बाईनं आत्महत्या केली. त्याला एक प्रकारची ग्लोरीफिकेशन दाखवितो. ही गोष्ट जुन्या अंधश्रद्धांना खतपाणी देण्यासारखं आहे. आणि आज हा प्रकार अतिशय मोठ्या वाढलेलं आहे. मोठे मोठे श्रीमंत लोक अगदी ज्यांच्या घरात रिफ्रेजिटर आणि टेलिव्हिजन असतो ते लोकसुद्धा या सगळ्या गोष्टींच्या मागे असत त. माणूस आधुनिक बनलेला नाही. त्यांनी काही वागायच्या पद्धती घेतलेल्या आहेत. घरात अगदी संबंध अद्वितीय. आधुनिक सुसज्जता असते आणि माणसं विचाराने अतिशय बुरसटलेल्या आणि जुन्या मताची असतात. मला परवा कुणीतरी सांगितलं की अमेरिकेत राहिलेले किंवा इंग्लंडमध्ये राहिलेले आपले लोक ( तो मला अतिशय अभिमानाने सांगत होता ) तिथं सुद्धा मुलांच्या मुंजी करतात आणि सगळे धर्मविधी बरोबर पार पाडतात. एवढच नाहीतर तिथं भटजी लोकांना अतिशय मोठी मागणी आहे. आता मला प्रश्न असा आहे जातिपद्धतीवर आधारलेल्या या समाजात ख-या अर्थाने जर क्रांती करायची असेल तर जातीची जी जी सिंबॉल्स आहेत त्याच्यावर आपणाला तुटून पडायला पाहिजे. असं असताना ही माणसं परदेशात राहिलेली, इंग्रजी बोलणारी ही माणसं मात्र आपले सगळे जुने विचार तसेच्या तसेच ठेवतात. त्यांचे कपडे बदललेले असतात, त्यांचे आचार, विचार बदललेले असतात. चमच्याने ते खातात. हातांनी ते खात नाहीत. आणि तरीसुद्धा त्यांचे विचार मात्र अतिशय जुने असतात. जुन्या परंपरा जपणारे असतात. माझा परंपरेवर आक्षेप असा आहे की ज्या परंपरांमुळे भारताच्या सामाजिक परिवर्तनाला खीळ बसते त्या परंपरा आपण निश्चितपणे त्याज्य समजायला पाहिजेत आणि त्या त्याज्य करण्यासाठी सारखा प्रयत्न व्हायला पाहिजे. मला एक समजतं की एखादा साधा माणूस जर असं करत असेल तर ते ठीक आहे. पण ज्यांनी लोकांच्या समोर आदर्श ठेवायचे त्यांनीच जर या गोष्टीचा पाठ पुरावा केला तर या समाजाला बदलणारे कोण?