व्याख्यानमाला-१९७५-१८

कराड नगरपालिकेचे पदाधिकारी श्री. करंबेळकर, श्री. खंडकर आणि जिज्ञासेने या व्याख्यानासाठी आपण जमलेले पदाधिकारी.

कराड नगरपालिकेतर्फे यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला सुरू झाली व तिचे ३रे वर्ष आहे. या नगरपालिकेतर्फे आयोजित केल्या जाणा-या व्याख्यानामालेमध्ये मला निमंत्रण देण्यात आले आणि एक व्याख्यान पुष्प गुंफण्याची संधी मला मिळाली हे माझे मी भाग्या समजतो. भाग्य समजण्याचे कारण असे की ज्या श्रेष्ठ व लोकप्रिय नेत्याच्या नावे ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे त्या लोकप्रिय नेत्याबद्दल श्री. यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल, व्यक्तिशः मला अतिशय नितांत आदर आहे. त्यांच्याबरोबर बोलण्याची, त्यांच्याबरोबर बसण्याची, त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची अनेक वेळा मला संधी प्राप्त झाली आहे. संधी मिळाली आहे. ज्या ज्या वेळेला मी त्यांच्याशी बोललो आहे त्या त्या वेळेला त्यांची सूक्ष्म निरीक्षण पद्धत सगळ्यांशी विचारपूर्वक व संयमाने बोलण्याची वृत्ती आणि विशेष म्हणजे सगळ्यांना आकर्षित करून घेणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व यामुळे मी प्रभावित झालो आहे. प्रसंग कोणताही असो त्यांची वृत्ती सतत प्रसन्न असते. लहान मूल असो, मोठा माणूस असो, विरोधक असो, सहकारी असो, ज्या ज्या वेळेला त्यांना जवळून किंवा लांबून पाहण्याचा योग आला आहे. मी ज्या वेळेला त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी गेलो होतो विद्यार्थ्यांना घेऊन गेलो होतो. एकटा गेलो होतो. सहका-यांना घेऊन गेलो होतो आणि त्या वेळेला वृत्तपत्रांतून त्यांच्याबद्दल आदराने परदेशामध्ये ज्यांच्याबद्दल बोलले जाते अशी महनीय व्यक्ती आपल्याला जवळून कशी दिसते हे पाहाण्याची मला अनेक वेळेला संधी मिळाली आणि म्हणून मी म्हटले एक मरब्बी राजकारणकुशल, एक मुत्सद्दी, एक विचारवंत म्हणून भारतातल्या सगळ्या नागरिकांना श्री. यशवंतरावांच्याबद्दल आदर वाटतो. हे स्वाभाविक आहे. एक नागरिक म्हणून त्यांच्या सहवासात गेल्यानंतर त्यांच्याविषयी वाटणा-या आकर्षणामध्ये आदरामध्ये भरच पडते. म्हणून तर मला नेहमीच वाटत आले आहे की जे माझे काही मित्र कराडचेच आहेत, त्या सर्वां नेहमीच या गोष्टींचा खरोखरच मोठा अभिमान वाटत असेल की आपल्यामधला शेतकरी कुटुंबातील एक सामान्य मुलगा, पूर्वी लहान असलेला एक मुलगा पुढे फार मोठा होतो आणि भारतातले राजकारण भारताचे आणि परराष्ट्राचे राजकारणसुद्धा आज मोठ्या भारी दक्षतेन आणि यशस्वीतेने हाताळतो हे कौतुकास्पद आहे. आणि आपल्या गावाचा अभिमान वाटावा असेच फार मोठे कार्य यशवंतरावांनी केले आहे. परवाच त्यांच्या सत्कारानिमित्त ग. दि. माडगूळकरांनी एक अतिशय मार्मिक अशी उपमा वापरली होती की चंद्र हा आकाशामध्ये लांब असतो तो काही आपल्याजवळ नसतो. परंतु चालणा-या माणसाला असे वाचते की चंद्र हा आपल्याबरोबर चालत आहे. अगदी मार्मिक अशी उपमा माडगूळकरांनी वापरली आहे.

यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व इतके लोभस आहे की- त्यांच्याजवळ असणा-यांना आणि त्यांच्याशी विरोध करणारांनासुद्धा मनामध्ये यशवंतरावांबद्दल आकस वाटत नाही. यशवंतराव हे केव्हाच पंतप्रधान होऊन शकले असते आणि होतीलही. परंतु त्यांनी जे उदगार काढले तेही मोठे मार्मिक होते की ह्याच्या पेक्षा अधिक मोठ्या पदाची मला अपेक्षा नाही. मी अतिशय नम्र भावाने या देशाची सेवा करतो आहे आणि याच्यातच त्यांच्या यशाचे रहस्य आहे. खरोखरच अंतःकरणपूर्वक, नम्रतापूर्वक कुठल्याही पदाच अपेक्षा न धरता त्यांनी सतत सेवा केलेली आहे. आणि माझ्या मनात कित्येक वेळा असे येते की असा एक सुदिन उगवावा की आपले यशवंतराव आपल्या कराडच्या नागरिकांना आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून पाहायला मिळतील. अशा या ज्येष्ठ नेत्याशी संबंधित अशा या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान देण्याची संधी मला मिळाली त्या वेळेला मी अतिशय नम्र भावनेने त्यांच्याविषयी वाटणा-या आदराने मी या ठिकाणी आलेलो आहे. मला जे दुसरे कारण या ठिकाणी यायला आनंददायक वाटते ते हे की या गावामध्ये गेली ३ वर्षे आणि त्याही पूर्वी अन्य व्यासपीठावरून या नगरपालिकेतर्फे आणि इतर संस्थातर्फे एक प्रकारचे आपण ज्ञानपीठ आपण उघडले आहे. आणि अनेक तज्ञांची व्याख्याने होत आलेली आहेत. आणि कराडमधील नागरिक लोक अशा या व्याख्यानांना उत्तम प्रकारचा प्रतिसाद देत आलेले आहेत. दूरदूरच्या गावी गेल्यानंतर पुण्यामुंबईकडल्या आमच्यासारख्या शिक्षकांना हा अनुभव येतो की अतिशय जिज्ञासेने हे त्या विषयावरील प्रेम ज्ञानावरचे प्रेम ठेवून हे नागरिक लोक अगदी विद्यार्थाची भूमिका ठेवून व्याख्यानांना येत असतात आणि म्हणून आमचे असे कर्तव्य आहे की तितक्याच श्रद्धेने आणि तितक्याच अभ्यासू वृत्तीने जे काही आपल्यजवळचे विचारधन असेल ते आपण इतरांना वाटण्याचा प्रयत्न करावा.