व्याख्यानमाला-१९७५-१४

आगरकरांनी सुद्ध समाजसुधारणेच्या कार्यामध्ये स्वत:ला वाहून घेतलं होतं पण त्यांच्याबरोबर समाज पुण्यातील मर्यादित होता. फार मोठा समाज नव्हता. पण आगरकरांनी समाज सुधारण्याची समस्या सोडविताना एक जी दृष्टी दिली होती ती महत्त्वाची आहे आणि ती आजसुद्धा आपल्याला आवश्यक दृष्टी आहे. ही दृष्टी म्हणजे बद्धीची परंपरा. ही फार मोठी देणगी आगरकरांनी दिली. त्यांच्याजवळ बुद्धीची परंपरा आहे. ज्या संस्थेचे फायदे आहेत त्यांनी आमचे प्रश्न सोडविले पाहिजे. समाजसुधारणेच्या प्रश्नावर पुष्कळ लोक सांगतात की, आमचे संतसुद्धा समाजसुधारक होते. त्यांचा मानवतावाद होता हे मी मान्य करतो. परंतु संतांच्या शिकवणुकीमध्ये भूतदया अनुकंपा असल्या प्रकारची होती. एक प्रकारची लोकांवर उपकार करण्याची वृत्ती काही ठिकाणी आढळते. आगरकरांच्या बुद्धिवादाच्या परंपरेच्या दृष्टीने तर्कशास्त्राच्या कसोटीवर काही समस्या सोडविता आल्या असत्या. पण आगरकरांचे विश्व हे थोडे मर्यादित होते.

आगरकर काय, किंवा त्यांचे अनुयायी काय, त्यांनी समाजात सुधारणा करण्याकरिता काही गोष्टी घडवून आणल्या पण त्यानंतरचे जे समाजसुधारक झाले त्यांनी समाजाला वेगळ्या दृष्टीने पहाण्यास सुरुवात केली आणि ह्यांमध्ये आंबेडकरांचा उल्लेख करावा लागेल. डॉ. आंबेडकरांचे विचार पाहिले तर ते अगदी खरे होत गेले आहेत. मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करणारे डॉ. आंबेडकर चवदार तळ्यावर आम्हाला पाणी पिण्यासाठी मिळाले पाहिजे असा आग्रह धरणारे डॉ. आंबेडकर आणि मी हिंदू म्हणून जन्मास आलो आहे पण हिंदू म्हणू मरणार नाही असे जाहीर करणारे डॉ. आंबेडकर. डॉ. आंबेडकरांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या हिंदू समाजाने पु-या केल्या नाहीत ही खरी शोकांतिका आहे. हे मी सांगितलेच की ज्योतिरावांचे जे चित्र होते ते हिंदू समाजाने पुरे केले असते तर डॉ. आंबेडकरांना जो मार्ग स्वीकारावा लागला तो स्वीकारावा लागला नसता पण आमच्यामध्ये हा दोषच आहे कोणालाही मोठे करायचे, देव्हा-यामध्ये बसवायचे, मोठे करावयाचे. जसे आम्ही गांधीजींच्या बाबतीत करतो. गांधी जयंतीला आणि ३० जानेवारीला महात्मा म्हणून त्यांचा आदर करतो, पूजा करतो, नमस्कार करतो आणि घरी जाऊन त्यांची शिकवणूक विसरून जातो. हा दोष कसा जाईल. याचे विवेचन मी नंतर करणारच आहे. आपण सगळे आमचे कोणी जे होऊन गेले आहेत त्यांची पूजा आम्ही केलेली आहे तत्त्वे मात्र अंमलात आणण्याचे टाळले आहे. ही आमच्या समाजाची शोकांतिका आहे डॉ. आंबेडकरांनी मंदिरात प्रवेश करण्याकरिता सत्याग्रह केला पण नंतर मात्र त्यांनी विचार केला की त्यांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. पण त्याच्यापुढे जाऊन पहिली गोष्ट जी आंबेडकरांनी केली ती अशी की अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळाले पाहिजेत आणि समाजसुधारणेचा एक भाग म्हणून अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळणार हे उघड झाले. ते आमचे हक्क आहेत. ते आम्हांला मिळाले पाहिजेत ते कोणाच्याही कृपेवर अवलंबून नाही, तर ते मानव म्हणून आमचे हक्क आम्हाला पाहिजेत. समाजसुधारणेच्या इतिहासामध्ये ही एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे, टप्पा आहे. १९३९ चा पुणे काराराच कायदा पाहिला तर पुण कराराला आमचे डॉ. आंबेडकर अस्पृश्याना कायदा वगैरे गोष्टींना फारसे महत्त्व देत नाहीत. याशिवाय तुम्ही आम्हांला राष्ट्रीय हक्क कोणते देणार? राऊंड टेबल कॉन्फरन्स घेऊनसुद्धा त्यांनी हा प्रश्न विचारला होता. पुणे काराराच्या बाबतीतील भूमिका ही अशी होती आणि ती भूमिका पुढे काम ठेवली होती हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. तर समाजवादाचा विचार करताना अस्पृशता नष्ट कार. या विचाराला आंबेडकर तयार नव्हते. तर मानव म्हणून आम्हाला जे हक्क आहेत ते राष्ट्रीय हक्क आम्हाला द्या. आणि असा पुढे त्यांच्या समाजवादाचा प्रवाह सुरू झालेला आहे. ते घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी संविधान तयार करताना त्यांनी जे शेवटचे भाषण केले ते भाषण समाजधूरिणांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते. ते म्हणाले, मी ज्यावेळी घटना समितीमध्ये आलो तेव्हा अत्यंत कोत्या रीतीने आलो, स्वार्थी भावनेने आलो की मला माझ्या जमातीचे कल्याण साधावयाचे आहे पण नंतर माझ्यावर जी जबाबदारी टाकण्यात आली त्यामुळेच संविधान करण्यामध्ये मला हिस्सा मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. त्यांनी सांगितले की ज्यावेळी भारतातील प्रत्येक नागरिक स्वतःचा धर्म, स्वतःचा पंथ, स्वतःची जात, स्वतःची भाषा याला दुय्यम स्थान देईल आणि भारताचा नागरिक या दृष्टीने त्याचे कर्तव्य करील आणि त्या उद्देशाने वागेल त्याच वेळेला या संविधानाचे साफल्य झाले असे म्हणता येईल. पण हे जर आम्ही केले नाही तर परमेश्वर करो तसे न होवो जे स्वातंत्र्य आम्ही एवढ्या कष्टाने मिळवले आहे त्या स्वातंत्र्याला पण जखम होण्याची पाळी न येवो. शेवटच्या अंकात त्यांनी सर्वच सुधारणेचे सार आणले आहे.