भाग १ विधानसभेतील भाषणे-८१

यानंतर अध्यक्ष महाराज, आणखी काही व्यक्तींच्या मृत्यूबद्दल आम्हाला दुखवटा जाहीर करावयाचा आहे. सर रेजिनॉल्ड स्पेन्स ह्यांच्या मृत्यूसंबंधाने आम्हाला दुखवटा जाहीर करावयाचा आहे. हे गृहस्थ १९२२-२३ साली हिंदुस्थानात आले. ते जरी एका व्यापारी कंपनीत काम करण्यासाठी हिंदुस्थानात आले तरी नंतर त्यांनी आपले इतर क्षेत्रात काम वाढविले आणि ते या शहराच्या सामाजिक कार्यक्षेत्रात काम करू लागले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ वर्षांचे होते. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली नव्हती, पण मला माहीत आहे की, त्यांनी शिक्षण क्षेत्रात आणि विशेषतः नॅचरल हिस्ट्री या विषयात बरेच काम केले आहे. ते बरेच दिवस मध्यवर्ती कायदेमंडळाचे सभासद होते व येथे जेव्हा कौन्सिल स्थापन झाले तेव्हा येथील सभासदत्वसुध्दा त्यांना मिळाले होते. त्यांच्या मृत्यूबद्दल दुखवटा प्रदर्शित करणे आमचे कर्तव्य ठरते.

यानंतर श्री. नानासाहेब भोईर यांच्या मृत्यूबद्दल दुखवटा प्रदर्शित करावयाचा आहे. या विधानसभेचे ते बरेच दिवस सभासद होते. त्यांनी मुख्यतः ठाणे जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात प्रमुख कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे त्यांची सहकारी क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय आहे. ते स्वतः शेतीच्या कामात देखील मन घालीत असत. म्हणजे ते जातीने शेतीच्या कामात भाग घेत असत. ते बॉम्बे स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे डायरेक्टर होते, त्याचप्रमाणे ते ठाण्याच्या जिल्हा सहकारी बँकेचेदेखील डायरेक्टर होते. ठाणे डिस्ट्रिक्ट जिल्हा लोकल बोर्डाचे बरेच दिवस ते अध्यक्ष होते. त्यांच्या मृत्यूमुळे ठाणे जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.

यानंतर डॉ. एम्. यु. मस्कारेन्यास यांच्या मृत्युबद्दल आपल्याला दुखवटा प्रदर्शित करावयाचा आहे. ते मुंबई शहरात एक डॉक्टर म्हणून जरी काम करीत होते तरी त्यांना मुंबईच्या सामाजिक जीवनात फार मोठे स्थान होते. ते मुंबई कायदेमंडळाचे सभासद होते. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांना मृत्यू आला.

अध्यक्ष महाराज, या सर्व मृतात्म्यांना शांती मिळो, अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो.
------------------------------------------------------------------------
On 27th November ,1961, Shri Chavan, Chief Minister made condolatory references to the deaths of Shri B.S.Hiray,Sir Reginald Spence, Shri L.N.Bhoir and Dr.M.U.Mascarenhas. He said that all these distinguished men had contributed their mite in enriching the social and cultural life of the State.