व्याख्यानमाला-१९९२-२

आपल्या विकासाची दिशा आणि लोकशाहीचे भवितव्य
१२ मार्च १९९२

‘मा. यशवंतराव चव्हाण यांची विकासविषयक संकल्पनाः अपेक्षा व फलश्रुती
- डी. भा. ल. भोळे
नागपूर विद्यापीठ, नागपूर

कराड नगरपरिषदेचे नगराध्य आणि आजच्या सभेचे अध्यक्ष माननीय श्री. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा श्रीमती अश्विनी डुबल आणि श्रोतृवृंदात बसलेले आमचे मित्र श्री. ठोके, श्री. ढोले, श्री. पाटील आणि कराडवासीय नागरीक बंधु-भगिनींनो, गेल्या अनेक वर्षांपासून मला या व्याख्यानमालेसाठी संयोजकांनी निमंत्रण दिले. पण त्यांनी वारंवार बोलावूनही आणि माझी येण्याची प्रामाणिक इच्छा असूनसुद्धा मला येता आले नाही. या वर्षी मात्र खरोखरच मी ठरवून टाकलं होतं की यंदा कराडला जायचंच. किंवा खरं सांगायचं तर मी वाट पहात होतो आपल्या निमंत्रणाची असं म्हटले तरी चालेल. ज्यांच्य स्मृतीप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला गेल्या वीस वर्षांपासून सुरु आहे, त्या यशवंतराव चव्हाणांच्याबद्दल मला अत्यंत मनापासून आदर आहे. साधारणतः राजकीय नेते, आजच्या अध्यक्षांची क्षमा मागून मी असं म्हणेन, राजकीय नेते, कुठल्याही पक्षाचे असोत, राजकीय नेते आणि मी यांच्यातला आकडा नेहमी छत्तीसचा असतो. फार सख्य असं माझं कोणत्याही नेत्याशी नाही आणि सामान्यतः राजकारणात क्रियाशील असलेल्या लोकांच्यापासून चार हात लांब रहावं असा माझा सवभाव आहे. पण त्याला अपवाद चव्हाणसाहेबांचा आहे. या माणसाच्या व्यक्तीमत्त्वाने मला अनेक अर्थांनी भुरळ घातली आहे. केवळ राजकीय नेता म्हणून नाही तर एक अत्यंत संवेदनाक्षम असा कलाकार म्हणूनसुद्धा, लेखक म्हणून, चतुरस्त्र असा वक्ता म्हणून आणि एक अत्यंत मूलगामी अशी दृष्टी असलेला लोकनायक या अर्थाने सुद्धा. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या जन्मभूमीला आणि कर्मभूमीला जाऊन त्यांच्या स्मृतीला अभिवादन करणं हा मी माझा गौरव समजतो. ही संधी मला या व्याख्यानमालेनं मिळवून दिली ही अत्यंत आनंदाची गोष्ट वाटते. मी याप्रसंगी यशवंतरावांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाचा प्रारंभ करतो.

आपल्या विकासी दिशा आणि लोकशाहीचं भवितव्य या विषयाची मांडणी मी तीन व्याख्यानांतून करणार आहे. पहिल्या भाषणात आज मी माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या विकसविषयक कल्पना, अपेक्षा आणि त्याची फलश्रुती अशी मांडणी करणार आहे. उद्याच्या व्याक्यानामध्ये आपण आतापर्यंत केलेल्या विकासाच्या संदर्भात “विकासाचा विनाशकारी नमुना” अशी मांडणी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि मग या विकासाच्या वाटचालीला पर्यायी अशा प्रकारच्या विकासाचं प्रतिमान असू शकतं काय याचा विचार मी तिस-या व्याख्यानामध्ये करीन. अशारीतीने प्रतिपाद्य विषयाची विभागणी मी तीन भागांत केलेली आहे.

यशवंतराव चव्हाण यांची एक विकास कल्पना होती आणि ती विकासकल्पना त्यांना कुठल्या प्रबंधातून, पुस्तकातून वा कुठल्या सूत्रातून सुचण्याऐवजी प्रत्यक्ष जीवनक्रमातून सुचलेली होती. या संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन यशवंतराव चव्हाण आले आणि मुंबईच्या त्या समुद्रकाठी मावळत्या सूर्याल साक्ष ठेवून त्यांनी महाराष्ट्रामध्ये समाजवादाचा पहिला पाळणा हालेल असे सांगितले. ‘सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला’ अशा शब्दांत त्यांनी त्या सोहळ्याचं वर्णन केले. तो जो क्षण होता तो यशवंतरावांच्या मनातल्या महाराष्ट्राच्या एका नीलचित्राला प्रत्यक्ष साकार करण्याच्या संकल्पाचा मंगलदिन होता. त्यांच्या मनामध् संयुक्त महाराष्ट्राचं एक चित्र होतं. इथल्या आर्थिक विकासाचं, राजकीय विकासाचं एक चित्र होतं. आणि त्याची मांडणी त्यांनी वेळोवेली केलेली आहे असं आपल्याला दिसून येतं.

स्वायतंत्र्यपूर्वकाळापासूनच त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं एक सूत्ररूप बीजारोपण झालेलं आपल्याला दिसून येते. कुठेतही तेव्हाच्या राष्ट्रीय नेत्यांना स्वातंत्र्याचा अभिप्रेत असलेला अर्थ हा फार वरवरचा आहे, हा शहरी वर्गीयांचा आहे, उच्चवर्णियांचा आहे. खेड्यात राहणा-या, शोषणाला बळी पडणा-या, वंचित असणा-या कितीतरी तळागाळातल्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा आशय काय असेल याची मांडणी राष्ट्रीय नेत्यांच्या स्वातंत्र्याविषयक चिंतनात नाही याची खंत यशवंतरावांना होती. “कृष्णाकाठ” मध्ये त्यांनी ती व्यक्तही केली आहे. स्वातंत्र्य आंदोलनाच्या व्यासपीठांवरून जी स्वातंत्र्याविषयी भाषणं व्हायची त्यात व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक सुधारणा, राजकीय स्वातंत्र्य अशा गोष्टींची चर्चा होत असे. परंतु ग्रामीण
शेतक-याचे प्रश्न, दारिद्र्याचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न यांची मांडणी फारशी होत नसे. खेड्यांतून पसरलेला जो अफाट मोठा समाज आहे त्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांची मांडणी त्यात नसे याची खंत त्यांनी नमूद केली आहे.