व्याख्यानमाला-१९९०-४ (4)

आर्थिक विषमता, शारीरिक विषमता आणि त्याच्यामुळे जो बलिष्ठ त्याने उत्पादनाची साधने आपल्या मालकीची करून घेतली आणि दुस-यांना त्यांचे श्रम विकण्यावाचून दुसरा काही पर्याय ठेवला नाही, रूसो आपल्या सोशल कॉन्ट्रॅक्ट पुस्तकामध्ये म्हणतो, “की एक दिवस पहाट झाली, जग जागं झालं आणि त्यानं पाहिलं तर आदल्या रात्रीपर्यंत मोकळ्या असलेल्या जमिनींच्या भोवती काटेरी कुंपणे रात्रीच्या रात्री घालण्यात आली.” आणि पुढे जाऊन तो असं म्हणतो की, “ज्यांनी ती कुंपणे घातली व इतरांकडून मान्य करून घेतली ते संस्कृती संस्थापक आहेत.” त्यांनी ही संघर्षाची संस्कृती सुरू केली. कारण तेवढी शारीरिक शक्ती त्यांच्याकडे होती. समाजामधले जे वरिष्ठ होते त्यांनी तोपर्यंत म्हणजे आदल्या दिवसापर्यंत समाईक मालकीचे जे होते ते आपल्याच मालकीचे करून घेतले. केवळ दंडुकेशाहीच्या जोरावर करून घेतले आणि दंडुकेशाहीच्या जोरावर पचविले, काहींनी बुद्धीच्या जोरावर इतरांना अंकित करून घेतले. काहींनी आर्थिक बळाच्या जोरावर आर्थिक बळ नसलेल्यांना अंकित करून घेतले. त्यातून संघर्ष ही समाजातली वस्तुस्थिती बनली आहे आणि म्हणून जेथे जेथे मतभेद आहेत, जेथे जेथे संघर्ष आहेत तेथे तेथे राजकारण आहे. राजकारणाला जर तुम्ही आग म्हणणारच असाल तर हे जे संघर्ष आहेत त्यांच्यामुळे ती निर्माण झालेली आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. ही धुमसती असंतोषाची आणि संघर्षाची परिस्थिती समाजात असते आणि म्हणून राजकारण आहे हे मुद्दाम एवढ्याकरता सांगायचे की, काही लोक आणि आम्हीसुद्धा विद्यार्थी असताना राज्य संस्था आणि तिची कार्ये हा सगळा राजकरणाचाच भाग आहे म्हणून शिकलो. इथं जर कोणी राज्यशास्त्राचे प्राध्यापक असतील किंवा शिक्षक असतील तर त्यांना सुपरिचित अशी एक व्याख्या आहे. राज्यसंस्थेची वेगवेगळी रूपे इतिहासकाळात कशी बदलत गेली, कशी उत्क्रांत होत गेली आणि तिच्या कार्यक्षेत्रामध्ये कशी वाढ क्रमाक्रमाने होत गेली या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे राज्यशास्त्र. याच्यात एक मोठी अडचण अशी आहे की राज्यसंस्थेच्या अनेक कार्याचे स्वरूप असे असते की, तिथे संघर्ष आणि मतभेद होतातच असे नाही. आणि म्हणून अनेक कार्ये अशी आहेत की, जी राजकारणात येत नाहीत. तुम्ही पोस्ट ऑफिसात जाता, तुम्ही बँकेत जाता, तुम्ही रेल्वे स्टेशनमध्ये तिकिट ऑफिससमोर जाऊन उभे राहता, तुम्ही पैसे देता, तिकिट घेता. तुम्ही चेक फाडता, पैसे घेता, तुम्ही पैसे देता आणि पोस्टाचे तिकीट किंवा पाकिट मिळवता यात कोठेही संघर्ष नाही. आणि म्हणून सगळी कार्ये शासन संस्थेची असली तरी राजकीय नाहीत.

याकरिताच मी दुस-या व्याख्येकडे आलो. कॉन्फ्लिक्ट नसेल तर राजकारण नाही आणि म्हणून राजकारण नाही असे एकही क्षेत्र नाही. भारतासारख्या आशियाई आणि आफ्रिका किंवा इतर विकसनशील देशांमध्ये तर राजकारणाची प्रक्रिया ही एक मध्यवर्ती प्रक्रिया बनलेली आहे आणि त्याचे हे मध्यवर्तीत्व लक्षात घेतल्याशिवाय राजकारणाचे यथार्थ ज्ञान होत नाही. थोडक्यात, राजकारण ही समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी किंवा होऊ घातलेला बदल रोखण्यासाठी केलेली कृती असते.