व्याख्यानमाला-१९९०-४ (23)

पुढे जाऊन मी असेही म्हणेन की, द्विपक्ष पद्धती असल्याशिवाय स्थिर सरकार मिळत नाही हाही एक भ्रम आहे. बहुपक्ष पद्धती असली तरीदेखील जर त्या पक्षांचे परस्परांशी असलेले संबंध सलोख्याचे असले, मतैक्याचे क्षेत्र आणि मतभेदाचे क्षेत्र हे जर त्यानी आपापसामध्ये स्पष्ट करून विभागून घेतलेले असले आणि त्याच्या मर्यादेत त्यांचे राजकीय व्यवहार होत राहिले तर बहुपक्ष पद्धतीमध्ये ही संयुक्त सरकारे स्थिरावू शकतात. एकाच संयुक्त सरकारने म्हणजे दोन-तीन पक्षांच्या संयुक्त सरकारने पंचवीस-पंचवीस वर्षाचा कालखंड निर्वेधपणे पार केलेला आहे. असे आपल्याला युरोपातल्या काही देशांमध्ये दिसून येते. म्हणून आपल्याला भारतीय राजकारणामधल्या ऐक्याच्या शक्ती आणि विघटनाच्या शक्तींचा विचार निवडणुकीच्या संदर्भातही करता येईल. आपली विद्यमान निवडणूक पद्धती जी आहे तिची पक्ष पद्धती सुधारायला काही मदत झालेली नाही. अर्थात असा कोणी आक्षेप घेऊ शकेल की, आदर्श निवडणूक पद्धती आणली की लगेच आदर्श पक्ष पद्धती त्याच्यातून अपरिहार्यपणे जन्म घेते का? नाही. कारण पक्षदेखील समाज जीवनातूनच मूळ धरून वर येत असतात. त्याच्यामुळे निवडणूकपद्धत कितीही आदर्श केली तरी तेवढ्यावरून आदर्श राजकीय पक्षपद्धतीचा उदय आपल्याला घडवून आणता येईल हे खरे नाही. पण काही प्रमाणात तरी निवडणूक आणि पक्ष यांचे परस्पर संबंध असल्याकारणाने इष्ट अशा प्रकारची पक्षपद्धती निर्माण करण्याला, ती भक्कम करण्याला निवडणूक पद्धतीचा उपयोग होऊ शकतो. ती सहाय्यभूत होऊ शकते. आणि त्यादृष्टीने निवडणूक पद्धतीमध्ये अनेक प्रकारचे बदल करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्याच्या तपशीलात मी जाणार नाही. कारण तो एक स्वतंत्र विषय होईल. भारतीय राजकारणाच्या अभ्यासाची ती एक दिशा आहेच. पण मग तो अधिक खोलात जाऊन स्वतंत्रपणे मांडण्यासारखा विषय आहे. मुंबईमध्ये मी परवा १२ तारखेला यशवंतरावांच्या जयंतीच्या दिवशी हा विषय मांडलेला आहे. पण मला त्याच्यामध्ये जे प्रमुख दोष दिसतात तेवढ्याचे दिग्दर्शन करतो. त्याच्या अनुषंगाने जरी तुम्ही आणखी खोलात अभ्यासाला लागलात तरी भारतीय राजकारण आणि पक्षपद्धती आणि निवडणूका यांच्या संदर्भाबद्दल आपणाला काही यथार्थ आणि सखोल असे ज्ञान त्याच्यामधून होऊ शकेल.