व्याख्यानमाला-१९८९-३९

गव्हर्नरनी कळवलं ठीक केलं. शाळा बंद पडत असेल तर प्रवेश नको. शाळा चालू ठेवा. पण तो या मुख्याध्यापकापेक्षा कायद्याचं राज्य मानणारा इंग्रज होता. त्याला वाटलं आपण चुकीचं पत्रं पाठविलं. म्हणून त्यांनी मद्रासला व्हाईसरॉयला पत्र पाठवलं की धारवाडच्या शाळेत एका अस्पृश्य समाजातल्या मुलाला प्रवेश पाहिजे आहे. मुख्याध्यापकांच पत्र अस आहे अस्पृश्य समाजातील मुलाला प्रवेश दिला तर शाळा बंद पडते. प्रवेश देऊ नये तर अन्याय होती. आपण ब्रिटीश  कायद्यासमोर सगळे नागरिक समान असे म्हणतो. मार्गदर्शन करा. आताप्रमाणे तेव्हा सुद्धा श्रेष्ठी होते, तेव्हा मद्रासच्या व्हाईसरॉयनी गव्हर्नरला लिहिलं तुम्ही मूर्ख आहात. आणि त्यांनी सातासमुद्राच्या पलिकडे असलेल्या इंग्लडमधील कॅबिनेटला पत्र लिहिलं की भारतातल्या शाळेमध्ये अस्पृश्य मुलांना प्रवेश मिळत नाही. अस्पृश्य मुलं ज्ञानापासून वंचित राहतात. निर्णय द्या. १८५७ सालच्या इंग्लंडच्या कॅबिनेटचा निर्णय आहे. भारतातील कोणत्याही शाळेमध्ये ज्या शाळांना सरकारची ग्रॅंट मिळते. ग्रॅटेबल सगळ्या शाळेमध्ये अस्पृश्य मुलांना जर प्रवेश दिला नाही तर ग्रॅंट बंद केली जाईल.

राष्ट्र म्हणजे एकत्रच लोक. लोकलफंडातून जमा होणारा पैसा कुणाच्या शिक्षणावर खर्च केला जात होता. पाश्चीमात्यकरण होणा-या ब्राह्मणावर. म्हणून जोतिराव फुल्यांना दोन्ही पातळ्यावर लढायचं होतं. सातामुद्राच्या पलिकडच्या ब्रिटीशांशी लढायचं होतं. तो विदेशी वसाहतवाद होता. पण हा विदेशी वसाहतवाद असलेला इंग्रज कायद्यासमोर सगळे नागरिक समान आहेत असं म्हणत होता.  सतीची चाल बंद करावी म्हणून कायदा करीत होता. विधवांचे विवाह लागले पाहिजेत म्हणून कायदा करीत होता. म्हणून जोतिराव फुले समाजाला म्हणायचे अरे इंग्रजांचं राज्य आहे तोपर्यंतच शिकून सवरून मोकळे व्हा आणि आर्यभटांच्या दास्यातून मोकळे व्हा. समजणार नाही ही लढाई.

इग्रज आल्यावर विदेशी वसाहतवाद म्हणून इंग्रजांची सत्ता आणि इथली पुरोहितशाही इंग्रज नोकरशाहीत रुपांतरीत झाली. पुरोहितशाहीचं रुपांतर अलगत नोकरशाहीत झालं. पेशवाई बदलली, पुरोहित सगळे बदलले. पण दोन्हीची एक गुणवत्ता असलेली एक नवीन नोकरशाही निर्माण झाली. ती सर्वसामान्यांपर्यंत कायदे जाऊ देत नाही. आजही आमचे मंत्री म्हणतात,काय करावं हो, सचिव ऐकत नाहीत. आज त्यांच्या सचिवांच्या हातात राज्य आहे आणि म्हणून जोतिराव फुल्यांना ब्राह्मणांचा देशी वसाहतवाद मोडून काढावयाचा होता आणि सर्वसामान्य माणसांच्या स्त्रियांच्या हातामध्ये ज्ञानाची साधने पोहोचवायची होती.

हे करीत असताना जोतिराव फुल्यांना खालच्या तळातल्या माणसांनी ब्राह्मणांच अनकरण करु नये. ब्राह्मणांसारखं त्यांनी होऊ नये. कारण नवे ब्राह्मण हे जास्त भयंकर आहेत हे आज दिसत आपणाला. दारूच्या दुकानातसुद्धा आज सत्यनारायण होतो. तुमच्याकडे होतो की नाही मला माहित नाही. औरंगाबादला होतो. मी इथलं बोलत नाही. तर दारुच्या दुकानाचं ओपनिंगसुद्धा सत्यनारायणानं. गणपतीत तर अगदी सत्यनारायण आणि 'माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी' गाणं. मला कळत नाही आमच्या देवाला सुद्धा ही कधीपासून आवड लागलं. इथं तिथं हे आज आमचं अज्ञान आहे. तर त्यांना संस्कृतीकरणाची प्रक्रिया थांबवून ठेवावयाची होती की हे भ्रष्ट डोके नको, इथ काय ज्ञान होतं?

मी नेहमी सांगतो ज्ञान हे रातराणीच्या फुलासारखं असतं. ज्ञानाचं कार्य रातराणीच्या फुलासारखं असतं. ज्ञान हे रातराणी ही अशी अंधारातही फुलते तसं ज्ञानी माणूस जिथं आहे त्याला गंध येतो. रातराणीच्या फुलाच्या वासाची झुळूक लांब येते. दोन चार फर्लांगावर येते. ज्या माणसाजवळ नवं ज्ञान आहे त्या माणसाच्या कर्तृत्वाचा गंध सुद्धा समाजापर्यंत तसा पोहोचतो. पण ज्याला आम्ही ज्ञान म्हणत होतो ते ज्ञानच नव्हते. बहुसांख्यिक लोक पारतंत्र्यात होते. त्यांच्या हातामध्ये ज्ञानाची सत्ता नव्हती. म्हणून जोतिराव फुल्यांना या सर्वसामान्य माणसाच्या मुक्तीचे एकमेव अमोघ शस्त्र सापडलं होतं. - एज्युकेशन, शिक्षण.

शिक्षण हा जोतिराव फुल्यांनी ज्या ज्या चळवळीचा विचार केला त्या चळवळीचा पाया होता, आधार होता. आणि त्यातून कृतिशीलता होती. "नॉलेज प्लस अॅक्शन इज इक्वल टू कल्चर" असं ते सूत्र होतं. जोतिराव फुले एका बाजूला विचार मांडत होते. दुस-या बाजूला चळवळी करीत होते. नवमानवतावादाचं आंदोलन ते चालवत होते. सर्वसामान्य माणसापर्यंत ज्ञान हा त्याचा प्राथमिक  अधिकार आहे. तो पोहोचला पाहिजे हे सांगत होते. हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनामध्ये जोतिराव फुल्यांनी सांगितलं प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं पाहिजे. प्राथमिक शिक्षण हे सरकारच्या हातात पाहिजे आणि प्राथमिक, माध्यमिक सगळं शिक्षण हे प्रत्येक माणसाचा अधिकार पाहिजे.