व्याख्यानमाला-१९८९-३७

माझ्या लहानपणचं माझं गांव. ज्या गांवाच्या भोवती विहिरी, तळी, मळे भरलेले होते. आमच्या गांवच्या चिरेबंदी वाड्याला ऊसाचे, केळीचे मळे लगडलेले होते आमच्या गांवातील स्त्रिया तुप्त मनाने विहिरीमधील पाणी भरत होत्या.  गांवात ताकाचे डेरे घुमत होते. त्यावर लोणी येत होतं. तूप येत होतं. आता फक्त आमच्या गावाच्या शाळेवर लिहिलंय. 'आजचा बालक उद्याचा राष्ट्रचालक' त्याच्या ओठांतलं दूध पळवितो दूध संचालक. आमच्या गावातल्या शाळेत लिहिलंय 'आजचा शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार आहे' पगार वाढवतांना हाहा:कार आहे. काय चाललयं हे ! स्वातंत्र्याची बेचाळीस वर्षें आम्ही प्रवास करुन सुद्धा आम्हाला प्राध्यापकांचं वर्कलोड किती असावं हे ठरविता आल नाही. कुठले शिक्षण तज्ञ?

शेतकरी समाजाचे-कष्टकरी समाजाचे, सत्त्याण्णव टक्के माणसांच-स्त्रियांचं अंत:करण घेऊन जेव्हा जोतिराव फुले लिहितात. आमचे काही स्कॉलर त्यांचे भाषेतील व्याकरण शोधतात. त्यातलं अंत:करण पहात नाहीत. व्याकरण अवघड प्रतिमांचा आकृतीबंध, व्यामिश्र, अनुभूतीची प्रतिकारिता, कळलं का? विद्वान माणसांनाही कळत नाही. मी पाहिलं माझ्या कंधार तालुक्यामध्ये प्रत्येक गांव  तिथं पाटी लागलेली आहे बीज गुणन प्रक्षेप. बीयांचं शेत म्हटलं असत तर यांना पोलिसांनी पकडून नेलं असतं का? भू विकास बॅंक-कुठला शेतकरी असा म्हणतो की, मी आता सकाळी भूवर चाललो आहे. 'शेती विकास बॅंक' म्हटलं असतं तर काय नुकसान झालं असतं ! राष्ट्राचं बोलायचं नाही. संस्कृत भाषा नंतर इंग्रजी भाषा आणि महाराष्ट्रात मराठीला अवदसा. आणि जी मराठी आहे ती अशी बीज गुणन प्रक्षेत्र, समकर्ता कार्यालय, कळलंच नाही काय म्हणालेत? काय म्हणालेत? काय चाललय!

म्हणून जोतिराव फुल्यांनी आपल्या सोप्या, सरळ, काळजाला भिडणा-या भाषेमध्ये सामान्य माणसाचे दु:ख, अश्रू, व्यथा, यातना, त्यांचे मनोगत, प्रश्न सगळ्यांना अतिशय व्यवस्थित शब्दबद्ध केलं. जे आम्ही आज वाचतो किंवा  जोतिरावांनी त्यावेळी जे जे सांगीतलं, त्याच्या पैकी कितीरी काय व्हायचं. शेतक-याच्या आसूड मध्ये सरकारला शिफारसी करतांना जोतिराव फुल्यांनी सांगीतलं की, शेतक-यांच्या बांधावर तुम्ही बंडिग करा, ज्यामुळं पडणा-या पावसाचं पाणी विहिरीना जाईल. हे तेव्हा सांगीतलं होतं. आज जे पाझरतलाव नावाची गोष्ट आपण बांधतो ना, पाझर तलाव शेतक-यासाठी रोजगार हमीची योजना जोतिराव फुल्यांनी त्याकाळी सूचित केलेली आहे. शेतक-यांच्या मुलांना परदेशी पाठवून त्यांना नवं शेतीचं प्रगत तंत्रज्ञान शिकवा. उपकारकर्त्या सरकारनं हे करावं.

शेतकरी समाजाला तलाठ्याच्या, कुलकर्ण्यांच्या जाचातून वाचवावं, शेतक-यांच्या पैशातून जमा होणारा लोकल फंड फक्त आर्यभट्टांना शिकविण्यासाठी वापरू नका,तो शेतक-यांच्या मुलांसाठी वापरा हे त्यावेळी जोतिराव फुल्यांनी सांगीतलं. मित्र हो, जोतिराव फुले  ज्यांना आर्यभट्ट म्हणतात आणि आर्यभट्टांनी क्षत्रियापासून, वैश्यापासून सर्वाचं द्विजत्त्व काढून घेतलं म्हणतातना त्याचा नवा सामाजिक संदर्भ असा आहे. तुम्हाला पटतो की नाही तो पहा. वैद्यकीय, खाजगी वैद्यकीय आणि इंजिनियरींग कॉलेजेस काढणे म्हणजे सर्व सामान्य मुलांचे द्विजत्व काढून घेणे. द्विजत्व म्हणजे ज्ञानाचा विचार. तोच जर एकदा काढून घेतला तर तुम्हाला रानामाळातून भटकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आज सुद्धा जोतिराव फुल्यांचा पुतळा ज्या महाराष्ट्राच्या विधान भवनासमोर उभा आहे. त्या जोतिराव फुल्यांच्या पाठीमागून निघणारी परिपत्रके काय सांगतात?

प्रवरानगर, वारणानगर, कृष्णा सहकारी सा. कारखाना, खाजगी वैद्यकीय महाविद्यालये या वर्षी नवीन वैद्यकीय महाविद्यालयास परवानगी मिळाली. तुमच्या एरियातल्या पतंगराव कदमांना. त्याची ट्यूशन फी गरिबांच्या मुलांना परवडावी म्हणून फक्त दीड लाख ठेवलेली आहे. बी. शंकरानंद काल जे शिवाजी विद्यापीठात बोलते 'ही दुकाने थांबवा', कोणाला बोलले ? स्वत:शी ! कोणी थांबवा ? अहो सत्तेवर तुम्हीच आहात ना? आमचे जुने समाजवादी काँग्रेसचे लोक विनोदी बोलू लागलेत ते म्हणतात "अन्यायाचा प्रतिकार करा, कुणी 'गांव तेथे शाळा नेऊ या !' कुणी ? अहो तुम्ही आता विरोधी पक्षात नाही. सत्ताधारी पक्षात आहात. बी. शंकरानंद दिल्लीहून शिवाजी विद्यापीठात येतात आणि युवक महोत्सवात बोलतात की ही खाजगी इंजिनिअरींग आणि वैद्यकीय दुकाने बंद करा. मी त्यांचे अभिनंदन करतो. खाजगी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय कॉलेजेस काढणे म्हणजे द्विजत्व काढून घेणं. ही लोकशाहीतली वतनदारी आहे. मोंगलाई आहे. सर्व सामान्यांच्या मुला-मुलींचा शिकण्याचा अधिकार काढून घेणं. व्यावसाईक शिक्षणापासून त्यांना दूर ठेवणं, म्हणजे उद्याच्या शिक्षण संधीपासून दूर ठेवणं. आपणाला पटलं तर बघां.