व्याख्यानमाला-१९८९-२२

हे गाडगे महाराज आम्हा कुणाला भाषाप्रभू वाटले नाहीत. ज्यांनी स्त्रियांना त्यांच्या दास्यातून मुक्त केले, स्पृश्य-अस्पृश्य समाजाला शिक्षणाची गंगा त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचविली ते जोतिराव फुलें आम्हाला क्रांतीकारी वाटले नाहीत. आणि म्हणून आम्हाला या संबंध चळवळीचा विचार करतांना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. इंग्रज आल्यानंतर आमच्या देशांत जे नव्या बदलाचं वातावरण निर्माण झालं, नवीन महाराष्ट्राची, नवीन भारताची मागणी जोतिराव फुल्यांसारखी माणसं मांडू लागली. आणि त्यातून नवीन जीवन आकाराला आलं पाहिजे हा जो विचार पुढें आला, त्यात जोतिराव फुले या संबंध समाजक्रांतीच्या चळवळीचे सेनापती होते. त्यांनी सबंध समाजाला धक्का दिला.

माणूसपणाला तुम्ही नाकारता आहांत तुम्ही माणसाला प्रतिष्ठा दिली पाहिजे. आमच्या सर्वसामान्य माणसाला माणूसपणाचे तुम्ही अधिकार दिले पाहिजेत एवढ्यासाठी त्यांनी फार मोठी आंदोलने केली. ती वैचारिक आंदोलने होती. आणि वैचारिक आंदोलने करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, सत्यशोधक समाजाचा पाया सत्यवर्तन होता. सदाचार, सदसत विवेकबुद्धी होती. आणि माणस येथून तेथून समान आहे हे सूत्र होतं. माणूस एक आहे म्हणून धर्मं अनेक कशाला? माणसांचा एकच धर्म पाहिजे आमि तो सत्यवचनी सत्यधर्म. जीवनातील महान सत्याचा शोध, जीवनातील महान सुंदरतेचा शोध, जीवनातील असत्याचा तिरस्कार.

जोतिराव फुल्यांच्या विचारांचं फार मोठं सामर्थ्य आहे.  आणि त्यांनी सांगितलेलं "पशू पक्ष्यामध्ये जाती आहेत काय?" जोतिराव फुले म्हणाले 'नाही! मग माणसामध्ये जाती असण्याचं कारण नाही. माणसामध्ये असल्याच जाती तर दोन. एक स्त्री आणि एक पुरुष, आणि या दोहोमध्ये जर श्रेष्ठ कोण असेल तर स्त्री ! कारण माणूस तिच्यातून येतो. जगातील महान त्त्ववेत्ते आपण पाहिले. ज्या आईच्या उदरातन आम्ही येतो. नऊ महिने नऊ दिवस त्या पोटात राहतो. ती आम्हाला वाढविते ती आम्हाला घडविते. ती आम्हाला भाषा देते. आम्ही तिला मातृभाषा म्हणतो.  त्या आईला आमच्या संस्कृतीने शूद्र केले. तिला जीवनाचे सगळे सुंदर अधिकार नाकारले. म्हणून जोतिराव फुले म्हणायचे 'पुरुष शिकला, ऑफिसमधला शहाणा झाला, स्त्री शिकली तर कुटुंब सुबुद्ध' आणि समाज म्हणजे असतोच काय ? अनेक कुटुंबांचं सुंदर संघटन म्हणजे समाज' जोतिराव फुल्यांनी व्यक्तीच्या पातळीवर , कुटुंबाच्या पातळीवर, माणसाच्या पातळीवर शिक्षणाचा संबंध आणला.

ते सामाजिक-सांस्कृतिक विचार करतात. अॅक्शन करतात. जीवनसंबंधी सत्त्याचं महान ज्ञान त्यांना झालेलं होतं.  ज्या माणसाला हे महान ज्ञान होते तोच माणूस समाजामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतो. कॉर्लमार्क्स यांनी एका ठिकाणी म्हटलंय 'प्रत्येक गोष्टीबद्दल शंका घ्या' जोतिराव फुल्यांनी आमच्या समाजव्यवस्थेमधल्या प्रत्येक गोष्टीबद्दल शंका घेतलेली आहे. परशुराम आहे काय? वराह अवतार काय आहे, पोथ्या काय आहेत, वेद काय आहेत, हे अपौरुष आहेत काय? शंका ! म्हणून भारतीय समाजाच्या पुनर्रचनेचं नवं ज्ञान ते मांडू शकले.

त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या चळवळीचा विचार करतांना मला लेनिनचं वाक्य आठवलं लेनिन आपल्याला माहिती आहे. मार्क्सवादाच्या सुंदर बिया त्याने आपल्या रशियाच्या मातीत पेरल्या आणि ज्ञानावर जगणारा सुसंपन्न अशा संस्कृतीवर जगणारा आज एक महान रशियन समाज निर्माण केला. तो लेनिन म्हणतो -"तुमची समाजपरिवर्तनाची चळवळ यशस्वी झाली किंवा नाही याचा निकष काय? आणि त्याचं उत्तर देतो ' तुमच्या समाज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये किती स्त्रिया सहभागी झालेल्या आहेत त्यांच्यावर ते यश अवलंबून आहे. मला फक्त दलित चळवळ ही एकच चळवळ दिसते. या चळवळीमध्ये दलित पुरुषांच्या बरोबर नव्हेच पुरुषांच्या पेक्षा जास्त चढाओढीनं दलित स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला चळवळीचं स्वरुप आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला चळवळीचं स्वरुप आलं आहे. खालच्या तळातल्या समाजाचं वैचारिक अभिसरण चालू आहे ते मी उद्या सांगणार आहे.