व्याख्यानमाला-१९८७-२ (30)

वास्तव घटना आणि ऐतिहासिक घटना
राजवाडे यांच्या इतिहास विषयक दृष्टीचा विचार करतांना व्हाल्टेअर, रांके आणि ऑगष्ट कोम्ट यांच्या दृष्टीशी ती बरीच मिळती जुळती होती असे त्यांच्या लेखनाच्या काही अभ्यासकांचे मत आहे. या मताची यथार्थता तपासण्यासाठी एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात जागतिक पातळीवर इतिहासाच्या तत्व मीमांसेचा विचार कसा विकसित होत होता हे पाहणे उपयुक्त ठरेल. या मीमांसेच्या विकासाचा तपशील इ. एच. कार यांनी आपल्या इतिहास म्हणजे काय ? व्हाट इज हिस्टरी ? या पुस्तकात अतिशय सूत्रबध्दरीतीने आणि ओघवल्या भाषेत दिलेला आहे.
 
राजवाडे ज्याला ‘ झालेल्या प्रसंगाची विश्वसनीय हकीकत निर्लेप व निरहंकारपणाने कोणतेही पूर्वग्रह न ठेवता देणे ’ असे म्हणतात त्यालाच तो प्रसंग घडतांना ज्या वास्तव घटना इतिहासामध्ये घडल्या, त्या जशा घडल्या तशाच सांगणे असे म्हणता येईल. आजही सामान्य माणसे ‘ पण फॅक्ट काय होती ’ असे विचारतात. इतिहासलेखनाच्या दृष्टीने एकोणिसावे शतक हे फॅक्ट्सचे, वास्तव घटनांचे शतक मानले जात होते. ‘ जीवनात फक्त वास्तव घटनाच हव्या असतात ’ असे जेव्हा ग्रॅडग्रींड म्हणत असत. त्यावेळी त्यांना घटना जशा घडतात तशाच हव्या होत्या. आणि सारे इतिहासलेखन या घटना शोधण्यात गर्क झाले. इतिहास लेखनात एक नवा विचार आला. एक नवी लाट निर्माण झाली. इतिहास वाचतांनाही माणसे ‘ खरे काय आहे?’ याचा चौकसपध्दतीने विचार करू लागली. फॅक्ट्सचे आकर्षण वाढले. परंतु हे घडण्याला कारणही तसेच होते. या काळात इतिहासाला नीतीच्या आस-याने उभे करण्याचे जोरकस प्रयत्न चाललेले होते. या नीतीच्या दास्यातून इतिहासाला मुक्त करण्याची चळवळ म्हणजेच इतिहासात वास्तव घटनांच्या शोधाची सुरवात आहे. ही इतिहासाला नीतीशास्त्राने बध्द केल्याविरूध्दची प्रतिक्रिया होती. प्रसिध्द इतिहासकार लिओपोल्ड रांके हा या प्रतिक्रियेतील अग्रणी लेखक होता. ‘ अमूक एक घटना करोखर खशी होती ’ केवळ एवढे नोंदविणे हेच इतिहासकाराचे एकमेव कर्तव्य आहे. हेच त्याचे इतिहास लेखनासंबंधी आग्रही प्रतिपादन होते. हा त्याचा विचार इतिहासलेखकांचा मंत्रवाक्य झाला. जर्मन, फ्रेंच आणि ब्रिटीश इतिहासकारांच्या जवळ जवळ तीन पिढ्या इतिहासलेखन करतांना रांकेने दिलेला हा मंत्र घोकीत होत्या. आपले राजवाडे सुध्दा म्हणूनच ‘ मूल्यमापन ’ हे इतिहासाचे काम नाहीच तर ते नीतीशास्त्राचे आहे आणि नीतीशास्त्र आणि इतिहास यांचा संबंधच तोडला पाहिजे हे सांगता सांगताच नीतीशास्त्राच्या मर्यांदांच्याकडे ही बोट दाखवितांना दिसतात.
 
एकोणीसाव्या शतकात इतिहासलेखनात वास्तव घटनांची ही जी टूम निघाली होती, कल्ट ऑफ फॅक्टसने जो प्रभाव निर्माण केला होता त्यातून एक महत्वाची गोष्ट घडलेली आहे. या टूमीनेच इतिहासाला विज्ञानाचा दर्जा प्राप्त करून देण्यात मोलाचे योगदान केलेले आहे. एक स्वतंत्र शास्त्र म्हणून समाजविज्ञानात इतिहासाला उभे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कामी त्या काळात लेखन करणा-या प्रत्यक्ष ज्ञानवादी, पॉझिटीवीस्टस मंडळींचा पढाकार होता. या प्रत्यक्षज्ञानवाद्यांनी इतिहास लेखनाचे एक सूत्र दिले. त्यांचे असे होते की, पहिल्यांदा इतिहासात प्रत्यक्ष घडलेल्या घटना निश्चित करा आणि या घटनांच्या अनुषंगाने निष्कर्ष काढा. ब्रिटनमध्ये इतिहासाच्या या सूत्राचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होणे साहजिक होते. कारण इतिहासासंबंधीचे हे सूत्र जॉन लॉक यांच्यापासून तो बट्रॉन्ड रसेल यांच्या पर्यंतच्या अनुभववादी परंपरेत ते चपखल बसणारे होते. त्यामुळे आता या अनुभववादासंबंधी थोडी माहिती बघितली पाहिजे.