व्याख्यानमाला-१९८७-२ (16)

धर्माने माणसाला कशी गुंगी आणलेलीआहे हे मार्क्सने त्यावेळी मोठ्या साहित्यिक भाषेत सांगितलेले आहे. तो म्हणाला होता, “धर्माचे रूप घेतलेली दुर्दशा ही त्याचवेळी ख-या जीवनातील दुर्दशेचा आविष्कार असतो आणि तो ख-या दुर्दशेविरूध्द व्यक्त झालेला निषेधही असतो. धर्म हा दु:खी मानवी प्राण्याचा निदिध्यास असतो. तो ज्याप्रमाणे चैतन्यहीन अवस्थेचे चैतन्य असते तसाच तो हृद्यशून्य जगाचे अंत:करण ही असतो. धर्म ही लोकांची अफू असते.” मार्क्सने सांगितलेली ही वस्तुस्थिती फार महत्वाची आहे. धर्म आणि देवांच्या निर्मितीनंतरही माणसाला सुख मिळाले नाही कारण त्याचे दु:ख इथल्या सामाजिक व आर्थिक आणि राजकीय परिस्थितीतून जन्माला आलेले आहे. धर्माने माणसांना या परिस्थितीची विस्मृती होण्याइतपत गुंगी आणलेली आहे. माणसाला काल्पनिक सुख देण्याचे, आभासात्मक सुख देण्याचे जे सामर्थ्य धर्माजवळ आहे त्याकडे मार्क्सने कधीच दुर्लक्ष केलेले नाही.

म्हणून तर तो म्हणाला, “जो धर्म माणसाला काल्पनिक सुख देतो तो नष्ट करणे म्हणजे माणसाच्या ख-या सुखाची मागणी करणे होय. माणसाने काल्पनिक सुखाचा त्याग करण्यास सिध्द होणे होय. ज्या समाजपरिस्थितीत या काल्पनिक सुखाची दु:खी मानवप्राण्यांना गरज वाटते ती समाजपरिस्थितीच नाकारण्यास सिध्द होणे होय. म्हणून धर्म ज्या दु:खितांच्या जगाचे आकर्षण असते अशा जगाच्या चिकित्सेचाच आरंभ बिंदू असते.”

आपल्या इतिहासात आपण फार चुका केलेल्या आहेत. एकोणीसाव्या शतकांच्या उत्तरार्धात आपण जी राजकीय स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली ती तर सुरवातीला सामाजिक परिषदेच्या बरोबरच काम करीत होती. आपल्याकडे सामाजिक सुधारणेचीही चलवळ थोड्याफार प्रमाणात झालेली आहे परंतु आपण या सामाजिक सुधारणेच्या चळवळीलाही वास्तवाचे सम्यक आकलन झाले नाही. जर राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा आणि सामाजिक सुधारणेचा धर्मचिकित्सेशी सांधा जुळला असता तर हिंदु आणि मुसलमान, यांच्यात झालेल्या कत्तली टाळता आल्या असत्या. भारतीय राजकारणाला धार्मिक आधार प्राप्तच झाला नसता. शिख आणि असपृश्यांचेही सवते सुभे निर्माण झाले नसते. या धर्मं चिकित्सेने आपल्या वास्तवाच्या चिकित्सेचे भान दिले असते आणि आपण आपल्या इतिहासाची सम्यक चिकित्सा करू शकलो असतो. सा-याच धर्माच्या सामान्य माणसांना वेठीस धरल्याचे स्पष्ट झाले असते. सा-याच धर्माच्या राजांनी या सामान्य माणसांना कसे पिळले याचे आकलन झाले असते आणि ही चळवळ सामान्य जनतेची चळवळ झाली असती आणि ती राजकीय स्वातंत्र्याबरोबरच समाजव्यवस्थेतही परिवर्तन स्थापणारी चळवळ झाली असती. दुर्दौवाने हे झाले नाही. या उलट उलट. आपण हिंदूंच्या इतिहासाची ‘सात सोनेरी पाने’ शोधू लागलो आणि मुसलमान आपल्या इतिहासात ‘सुवर्ण युग’ बघू लागले. हिदु राजांनी आपल्या गरीब जनतेच्या किती तरूण मुली आपल्या जनानखान्यात ठेवल्या आणि मुसलमान राजांनी गरीब मुसलमान मुसलमान मुलींना आपल्या जनानखान्यात कसे डांबले याकडे आपले लक्षच  गेले नाही. ही सोनेरी पानें सामान्य जनतेने आपल्या कष्टाने घडविली परंतु ती मुठभर राजांनी राजांनी मोडून खाल्ली. हे सुवर्ण युग सामान्य जनतेने आपल्या घामाने घडविले परंतु हे सारे सोने, राजे, त्यांच्या बेगमा आणि त्यांचे सरदार यांनीचल वाटून घेतले. हा सारा वेडेपणा आपण इतिहासात केलेला आहे. तो सुधारण्याची हीच वेळ आहे. धर्म आणि देव यांनी माणसामाणसात एकत्वाची भावना निर्माण करण्याऐवजी त्यांच्यात दुरावा निर्माण केला