व्याख्यानमाला-१९८७-२ (17)

देवाचा उद्य हा प्रामुख्याने व्यक्तीपूजेतून झालेला असावा असे समाजशास्त्रज्ञ सांगतात. जगाच्या पाठीवर असे धर्मपंथ होऊन गेले की त्यांना देवाची आवश्यकता वाटली नाही. देवांचा उद्य हा व्यक्तीपूजेतून झाला असावा हे सिध्द करण्यासाठी हिंदू देव आणि देवता पुरेशा आहेत. इन्द्र हा आपल्या पूर्वाजांचा पहिला देव. तो तर सप्तसिंधचा पहिला सम्राट. आपला ऋग्वेद तर इन्द्राने व्यापलेला आहे. हा इन्द्र त्याच्या आईचे कुमारी अवस्थेत जन्मलेले अपत्य आहे. ऋग्वेदाच्या चौथ्या मंडलाच्या अठराव्या सूक्तात आपल्या इन्द्राची माहिती मिळते. त्यातल्या पाचव्या, दहाव्या आणि बाराव्या ऋचा वरून असे दिसते की कौशिक गोत्री कोण्यातरी लहानशा संस्थानिकाला एका कन्येपासून हा मुलगा झाला परंतु जन्माच्या वेळी त्या कन्येचा त्याने स्वीकार केला नाही. म्हणूनच ऋग्वेद आपणास सांगतो की,

कस्ते मातरं विधवामचक्रच्छयुं कस्त्वामजिद्यांसच्चरन्तं |
कस्ते देवो अधि मार्डिक आसीद्यत्प्राक्षिणा : पितरं पादगृह्य ||
ऋग्वेद ४।१८।१२

“तुझ्या आईला विधवा कोणि केले ? निजला असता आणि फिरत असता तुला मारण्याला कोण पहात होता ? ज्या तू पित्याला पायाला धरून ठार मारलेस, त्या तुझ्याहून अधिक सुख देणारा अन्य दुसरा देव तरी कोणता आहे ?” अशा प्रकारची ही इन्द्राची माहिती आहे. “आपल्या अब्रूला हानीकारक अशा समजुतीने आईने त्या सामर्थ्यसंपन्न इन्द्राला लपविले” असे याच सूक्तातील पाचवी ऋचा सांगते आणि दहावी ऋचा “ गाईने वासराला जन्म दिला तव्दत इन्द्राला आईने दिला”  असे म्हणते. याचा अर्थ असा कोणी करू नये की एकटा इन्द्रच गोठ्यात जन्मला. परम कारूणिक येशू ख्रिस्ताचा जन्मही यापेक्षा वेगळ्या पध्दतीने झालेला नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. अशा या पराक्रमी राजाची स्तोत्रे तत्कालीन ब्राह्म्यणांनी आपल्या उपजीविकेसाठी रचली आणि आश्रयदात्या राजांच्या दरबारात ती गाऊन आपला उदरनिर्वाह केला. याचाच परिणाम इन्द्र राज्यपदावरून देव पदावर गेला.

इन्द्रानंतर ब्रह्म्यदेव आले. ऋग्वेदांत ब्रह्म म्हणजे प्रार्थनेचा मंत्र व ते मंत्र गाणारा तो ब्रह्मा. पुढेपुढे तर यज्ञ करणा-या प्रमुख पुरोहितालाच ब्रह्मा हे नाव पडले. कालोघात जसजसे इन्द्राचे साम्राज्य नष्ट होत गेले तस तसे इन्द्राचे महत्व कमी झाले आणि त्याच्या जागी ब्रह्माचे नाव आले. पुढे त्याची इतकी स्तुती झाली की त्यालाच जगाचा कर्ता बनविले. एकदा देवांच्या स्तुतीचा उपयोग चरितार्थाचे एक साधन म्हणून करायचे ठरविले की या पेक्षा वेगळे काय होणार ? आपला महादेव हे तर शकांचे कुलदैवत होते. त्यालाही पुरोहित मंडळीनी जगाचा कर्ता बनवून पुजारीपण सुरक्षित ठेवले. आपल्या समाजातील विविध देवतांची स्थित्यंतरे आणि त्यांच्यातील बदल याचा आढावा घेतांना त्यांच्यावर पुरोहित वर्गाचा चरितार्थ अवलंबून होता याकडे दुर्लक्ष होऊ नये. राजा कोणताही येवो, तो कोणत्याही देशाचा असो, त्याचा धर्म कोणताही असो, त्याला जो देव रूचेल त्याची स्तुती करत राहणे व त्यादृष्टीने साहित्य निर्मिती करणे हेच आपल्या पुरोहितांचे काम होते. त्यावरच त्यांचे जीवन आणि समाजातील स्थान अवलंबून होते. त्यांच्यात स्वत:ला परिस्थितीप्रमाणे बदलण्याची कला असल्यामुळे व ही कला त्यांना उपजीविकेसाठी प्राप्त करून घेणे भागच असल्यामुळे त्यांचे स्थान समाजात अढळ राहिले. मुसलमानी कालखंडातही अल्लोपनिषद लिहून हे स्थान त्यांनी कायम ठेवले.