व्याख्यानमाला-१९७६-६

या ठिकाणी विचारासाठी एक मुद्दा मांडतो की एखादा विचार पराजित झाला म्हणजे तो विचार खोटा असतो असे कृपा करून कोणी समजू नये. विचार पराजित होण्यामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती कार्यान्वित होऊ शकतात. तो ते विचार मागे खेचू शकतात आणि त्यामुळे विचार कदाचित मागे गेल्यासारखा वाटतो. परंतु तो मागे गेलेला नसतो. तो ढगाळलेला असतो, काजळलेला असतो. स्वच्छ करण्याची संधी मिळाल्यास तो पुन्हा स्वच्छ करायचा असतो. भारतीय समाजाच्या पुनर्रचनेमध्ये, परिवर्तनामध्ये पंडितजींनी हे जे समन्वयवादाचे, सर्वसमावेशकतेचे, जे तत्त्व आणले त्यामध्ये त्यांची स्वत:ची विज्ञाननिष्ठ दृष्टी होती. पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वाचा जर अभ्यास केला तर पंडितजी म्हणजे उत्तुंग बुध्दिमत्तेचा एक बुध्दिनिष्ठ आविष्कार होय. कलावंत प्रवृत्तीचा सौर्द्यवादी (Romanticist) आणि मानवतेवर उत्कटपणे प्रेम करणारा असा मानवतावादी असे त्यांचे रूप होते. त्यांच्या मध्ये धर्मशीतलता, जी काही विशिष्ट संकेतांच्या चौकटीत बंदिस्त असते अशा कल्पनेतून जन्मलेली धर्मनिष्ठता त्यांच्याकडे नव्हती. विश्वाच्या उत्पत्तिलयाची कारणमीमांसा करणारी धर्मनिष्ठ आध्यात्मिक वृत्ती नव्हती आणि असंतानासुध्दा पू. गांधीजीसारखा महापुरुष त्यांचा मार्गदर्शक गुरू असल्यामुळे त्या आध्यत्मिकतेचा स्पर्श त्यांना राजकारणाला द्यावा लागला, दयावासा वाटला. एका बाजूला आधुनिकाचा पुरस्कर्ता आणि बुध्दिप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ असतानाच त्यांनी गांधीजींच्या ग्रामोद्योगाची, रामराज्याची, ग्रामस्वराज्याची कल्पना आपल्या नियोजनामध्ये, घटनेच्या मसुद्यामध्ये स्वीकारली होती हे लक्षात घेण्यासारखं आहे.

पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वासंबंधी एक गूढ मला नेहमीच वाटत आलेलं आहे की पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अशा प्रकारचे अनेक गुण प्रकर्षाने असतानासुध्दा या माणसाने या गुणांवरती असं काही एक सुंदर नक्षीकाम करून ठेवलं होतं की त्यांच्यातून निश्चित असा एक आकृतिबंध, आकार रंग रुप कोणतं हेच निश्चित समजणं कठीण होतं. असा जो एक समाज त्यांच्या डोळ्यांसमोर जो आदर्श स्वरुपात उभा व्हायचा होता त्या समाजामध्ये जगातल्या या सगळ्या सुंदर तत्त्वांच संमीलन त्यांनी पाहिलं होतं. त्यांची लोकशाहीवर अनन्य निष्ठा असल्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याला या समाजात त्यांनी महत्त्वाचे स्थान दिलेलं होतं. लोकशाहीवरती त्यांची निष्ठा असल्यामुळेच राजकिय समानतेपेक्षा त्यांना समाजिक समानता जास्त महत्वाची वाटत होती. काही विरोधाभास त्यांच्या विचारांत आपल्याला वरकरणी दिसतात की कदाचित त्यांना अल्पसंख्यांकांविषयी बहुसंख्यांकां पेक्षा जास्त प्रेम वाटत होतं, त्यामध्ये त्यांची लोकशाहीवादी वृत्ती होती. ब-याच वेळा त्यांच्यावर असा आरोप करण्यात येतो की त्यांनी अल्पसंख्यांकांचे फारच लाड केले. गोव्याच्या प्रश्नासंबंधानं, मुसलमानांच्या प्रश्नासंबंधान अशी भूमिक ते प्रत्येक वेळेला घेत असत की, त्यामुळे काही बहुसंख्य समाजाच्या प्रतिनिधींना राग यावा. ही वृत्ती स्वीकारण्यामागे पंडितजींची कल्पना ही इतकी संकुचित नव्हती तर उदारमतवादातून निर्माण झालेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा विकसित झालेला विचार त्यांच्या मनामध्ये होता. आणि म्हणून लोकशाहीत बहुसंख्यांकांचे जरी राज्य चालत असले तरी बहुसंख्यांकांच्या हुकूमशाहीखाली अल्पसंख्यांक दबले जाऊ नयेत अशा प्रकारची लोकशाही विचारांची धारा त्या कृतीमागे होती.

अल्पसंख्यांकांवरती आभ्यासात्मक जरी अन्याय होत असला तरी तो आभासात्मक अन्याय होऊ देणार नाही यासाठी ठाम उभे राहण्यामागे त्यांची लोकशाहीवरची आत्यंतिक निष्ठाच होती. हे आपल्या लक्षात येते.  त्यांच्या जीवनातील विरोधाभास समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येते की ते तळमळीचे समाजवादी होते. मार्क्सला गुरु मानण्यापर्यंत ! मार्क्सचे जे समाजवादाचे तत्त्वज्ञान शोषक आणि शोषित भांडवलदार आणि कामगार, शेतकरी आणि भांडवलदार किंवा जमीनदार यांच्या संघर्षातून शेवटी नव्या समाजाची रचना होते आणि त्यानंतर मग कोणतेही वर्ग शिल्लक राहत नाहीत. दंडशक्तीसुध्दा शेवटी शिल्लक रहात नाही – ही कल्पना त्यांना पूर्ण मान्य होती. असं असतानासुध्दा त्यांनी त्या विचारांचा प्रयोग या देशामध्ये केला नाही. त्यांच्या जीवनावर भाष्य करणा-या अनेक लेखकांनी असं लिहून ठेवलं आहे, की पंडितजींनी जर मनात आणले असते की सर्व सत्ता आपल्या हातात घ्यायची, तर त्याला कोणीही विरोध केला नसता. इतकी लोकप्रियता त्यांना लाभलेली होती. पाश्चात्य विचारवंतांनी आणि या देशातील विचारवंतांनीदेखील हे मान्य केलेलं आहे की सगळी सत्ता आपल्या हातात घेऊन आपल्या मनाला येईल ते या देशाचे करीन त्यांनी ठरविले असते तरी त्या काळच्या लोकांनी त्यांना विरोध केला नसता. लोकांचे इतके प्रेम पंडितजींना मिळालेलं होतं. गांधीजीनंतर इतकी लोकप्रियता मिळालेला नेता या देशात त्यावेळी दुसरा कोणी नव्हता. हे जर लक्षात घेतलं तर लोकसत्ताक पध्दतीवरती त्यांची श्रध्दा ही या भारतीय समाजाला मिळालेली एक फार मोठी दिशा होती.